माझं खोबार... भाग ५

on रविवार, नोव्हेंबर ०९, २००८

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४

*************

मित्रहो, आत्तापर्यंत मी माझ्या खोबारपर्यंतच्या प्रवासाबद्दल (जो माझा पहिला परदेश प्रवास होता) लिहिलं. 'केल्याने देशाटन...' या उक्तिची सत्यता पटायला खरं म्हणजे हा एक प्रवासच पुरेसा होता. सौदी अरेबिया मधे वास्तव्य करताना तर खूपच अनुभव आले, माणसं भेटली. निरनिराळ्या विचारधारा जवळून बघायला मिळाल्या. लोक कसे विचार करतात, त्यांच्या विचारांमागची भूमिका काय असते हे कळले. आता मी काही अनुभव सांगत पुढे जाणार आहे. हे अनुभव केवळ विचित्र (आपल्या दृष्टीने) समजूती आणि चालीरिती वगैरे तुमच्या पुढे मांडायचे म्हणून नव्हे तर तेथिल जीवनावर किंवा त्यांच्या विचारपद्धतीवर थोडा प्रकाश पडावा म्हणून लिहिणार आहे. मागेच लिहिल्या प्रमाणे मी जे काही लिहिणार आहे ते संपूर्ण पणे सत्य असेल, आपल्या भारतिय मनाला त्यातल्या काही गोष्टी 'सुरस आणि चमत्कारिक' वाटतील नक्कीच, पण हेच तर आहे 'अरबस्तान'... सुरस आणि चमत्कारिक.

चला तर मग...

*************

.... मस्त पैकी आंघोळ केली आणि बेडवर येऊन पडलो. मनात विचार चालू होते, कसं असेल ऑफिस? कसे लोक भेटतील? बाजूलाच खिडकी होती. सहज लक्ष गेलं, आकाश निरभ्र होतं. छान चांदणं होतं. चंद्राची सुंदर कोर दिसत होती. खूपच प्रसन्न वाटलं... मी त्या उबदार अंथरूणात सुखावत होतो, सगळा शीण जात होता. डोळे कधी मिटले ते कळलंच नाही....

*************

सौदी अरेबिया प्रमाण वेळ आणि भारतिय प्रमाण वेळेत फक्त अडिच तासाचाच फरक असल्याने (सौदी वेळ मागे) जेट लॅग वगैरे तसा फारसा जाणवत नाही. पण थोडा फरक जाणवतोच. सकाळी तशी लवकरच जाग आली. उजाडायला अजून थोडा वेळ होता, मिट्ट काळोख होता. थंडी मात्र खूप होती. मला आश्चर्यच वाटलं. आपली अशी समजूत असते की अरबस्तानात वाळवंटंच आहेत सगळीकडे त्या मुळे कायम गरमी असणार. पण तसे नाही. इथे ऋतू दोनच. उन्हाळा आणि थंडी. आणि दोन्ही अत्यंत भयानक, एक्स्ट्रीम. उन्हाळ्यात तापमान ५०डिग्री सेंटिग्रेडच्या वर गेलेले मी अनुभवले आहे. तसेच हिवाळ्यात तापमान ५ डिग्री सेंटिग्रेडच्याही खाली जातं. पण थंडीची खासियत म्हणजे वारा. भयानक वेगाने हा वारा वाहत असतो. रस्त्यावरून चालताना वार्‍याच्या विरूद्ध दिशेला चालणं जवळपास अशक्य. मग एखाद्या इमारतीच्या आडोश्याला उभं राहायचं थोडा वेळ. आणि जर का २ इमारती खूप जवळ जवळ असतील तर त्या चिंचोळ्या चॅनेल मधून जाताना तर त्या वार्‍याला भयानक जोर यायचा आणि आवजही चढायचा त्याचा.

हिवाळ्यात अजून एक वाईट प्रकार म्हणजे 'वारा'. आणि त्यामुळे उठणारं 'सँडस्टॉर्म'. कुठल्यातरी एका चित्रपटात दाखवल्याचं आठवतंय की नायक वाळवंटातून जात असतो आणि प्रचंड वारा वगैरे सुटतो. वाळूचं वादळ वगैरे होतं. अगदी तसंच नाही पण बर्‍यापैकी जवळपास जातं हे शहरातलं सँडस्टॉर्म. खरं तर ही वाळूची वादळं १२ महिने मधून मधून चालूच असतात (आणि साली नेमकी गुरूवारी / शुक्रवारीच होतात, वीकेंड सगळा नासतो :( ). तिथे सगळ्या खिडक्या अगदी पॅकबंद असतात, धूळ आत येऊ नये म्हणून आणि घरात सतत एसी किंवा हीटर चालू असतात त्यामुळे. पण एकदा का असं वादळ सुरू झालं की, अतिशय बारीक धूळ घरात शिरतेच शिरते. संपूर्ण घरात एक तलम असा धुळीचा थर जमतो. बाहेर रस्त्यांवर व्हिजिबिलिटी खूपच कमी होते. तरी सुध्दा सौदी लोक आपापल्या गाड्या जोरात पळवत असतात. अश्या वातावरणात खूप आणि भयंकर असे अपघात होत असतात. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. मी जेव्हा गाडी चालवायला लागलो तेव्हा अश्या वातावरणात गाडी कशी बघताबघता नियंत्रणाबाहेर जाते याचे खूप अनुभव घेतले आहेत. म्हणजे, आपण असे हायवेवरून १००-१२० कि.मी. वेगाने जात असतो. अचानक वारा सुटतो, धूळ उडते आणि १-२ मिनिटांच्या आत काही दिसेनासं होतं. त्यातच वार्‍याच्या प्रचंड झोतामुळे (जर का तो वारा गाडीच्या डावी-उजवी अश्या दिशेने असेल तर) गाडी सारखी एका बाजूला ढकलली जाते. स्टीअरींग व्हील गच्च धरून ठेवावं लागतं. नाहीतर क्षणात गेलीच गाडी रस्त्याच्या बाहेर. वार्‍याचा जोर प्रचंड असतो, विशेषतः शहराबाहेर पडलं आणि मोकळा भाग सुरू झाला की वार्याणने घातलेला धुमाकूळ सहज लक्षात यायचा. एकदा मी एक खूपच खतरनाक दृश्य बघितलं. हायवे वरून जात होतो आणि एका ठिकाणी जाहिरातींची होर्डिंग्ज लावायला मोठे मोठे स्टीलचे खांब उभे केले होते. एक दिवस जोराचं वादळ झालं आणि दुसर्‍या दिवशी ते खांब जागोजागी वाकलेले होते. दिवसच्या दिवस सूर्यदर्शन होत नसे. मी पुढे जेव्हा माझ्या स्वतःच्या घरात राहायला गेलो तेव्हा काढलेली छायाचित्रं खाली देत आहे.


दुपारी बारा - साडेबाराला काढलेला सूर्याचा फोटो.




असंच एक वादळ ऐन भरात असताना बल्कनीतून काढलेले फोटो. वेळः भर माध्याह्नीची.


वरील ४ फोटोंपैकी पहिल्या फोटोत जी मशिद अंधुक दिसते आहे तिचा स्वच्छ सूर्यप्रकाशात काढलेला फोटो.

*************

तर मी असा जागा होऊन अंथरूणात लोळत होतो. खूपच फ्रेश वाटत होतं. तेवढ्यात एक खतरनाक रामसे चित्रपटांसारखा भयानक आवाज यायला लागला. एखाद्या भयाण निर्मनुष्य अश्या जागी एक भूतबंगला असतो आणि तिथे कसा एक प्रकारचा शिट्टी मारल्या सारखा भेसूर आवाज येतो थेट तसा. माझी झोप पूर्ण उडाली. (त्या वेळी प्रियालीला ओळखत नव्हतो, नाही तर तिचीच आठवण आली असती ;) ) काही केल्या कळेना. थोड्या वेळाने एक सहकारी उठला तेव्हा त्याला पहिला हाच प्रश्न केला. तो खूप हसला. म्हणाला, 'अरे या खिडक्या एकदम एअरटाईट नसतात रे. त्या मधे कुठेतरी गॅप राहते आणि मग बाहेर हवेचा वेग खूपच असल्याने ती हवा या फटीतून आत घुसत राहते त्या मुळे असा आवाज येतो'. बाप रे.... असला आवाज? कधी एखाद्या ठिकाणी एकटं रहावं लागलं तर आफतच आहे, (दैवयोगाने तो पण प्रसंग आला माझ्यावर २-३ वेळा. तेव्हाची माझी अवस्था पूर्ण आठवते आहे अजूनही.)

लगेच आंघोळ वगैरे करून तयार झालो. इथे आयता नाश्ता मिळणार नव्हता. घरी म्हणजे कपडे वगैरे करुन तयार झालं की तो पर्यंत आई / बायको ब्रेकफास्ट समोर ठेवत असे. इथे सगळे तयार होऊन एकदम बाहेर पडत असत. जवळच एक 'कॅफेटेरिया' होता. तिथे चहा / सँडविच वगैरे खाऊन मग सगळे आपाआपल्या कस्टमरकडे जात असत. काही लोक ऑफिसमधे जात. कंपनीने एक गाडी आणि ड्रायव्हर ठेवला होता सगळ्यांच्या दिमतीला. बाकीच्यांचं आटोपेपर्यंत वाट बघत बसलो. समोरच पेपर पडला होता. रोज सकाळी मस्त ब्रेकफास्ट करत करत पेपर वाचायची सवय होतीच, इथे आधीच पेपर पडला होता हातात. इथले पेपर कसे असतात हे कुतूहल होतंच. अरब न्यूज हे तिथलं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र. सहज चाळता चाळता एक बातमी नजरेस पडली. आदल्या दिवशी विमानतळावर बघितलेल्या सुरक्षेचा आणि एका पाकिस्तानी कुटुंबाला पकडून नेताना पाहिले होते त्या घटनेचा उलगडा झाला.

अंमली पदार्थांच्या बाबतीत सौदी अरेबियाचे कायदे फार म्हणजे फारच कडक आहेत. अंमली पदार्थ देवन करणार्‍याला किंवा त्यांची तस्करी करणार्‍याना 'देहांत' हे एकमेव शासन आहे. आणि या शिक्षेची अंमलबजावणी अगदी पुरेपूर होते. अजिबात हयगय होत नाही. या प्रकारामुळे तस्करी करणारे नविन नविन युक्त्या वापरतात. असाच एक प्रकार आदल्या दिवशी घडला होता. अफगाणिस्तानात अंमली पदार्थांचं उत्पन्न खूप होतं आणि तो देश संपूर्ण जगात या बाबतीत पहिल्या तीन क्रमांकात आहे हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. तिथे गरिबी पण खूप आहे. त्याचाच फायदा हे तस्कर घेतात. ज्या माणसाला आयुष्यात कधीही पोटभर खायला नाही मिळालं त्याला जर काही रकमेची लालूच दाखवली तर तो कितीही धोकादायक कामं करायला सहजी तयार होतो. जिवंत सहीसलामत आलाच परत तर पैसा मिळतो. पकडला गेला आणि मेला तर कमीत कमी आई बाप / बायकापोरं तरी सुखात जगतील असा हा साधा सोपा पण भयानक हिशेब असतो.

तर झालं होतं असं. सौदी अधिकार्‍यांचं पाकिस्तान / अफगाणिस्तान कडून येणार्‍या प्रवाश्यांकडे तसं विशेष लक्ष असतंच. तसंच या वेळीही होतं. एक मोठं कुटुंब उतरलं होतं विमानातून. बरीच विमानं थोडीफार आगेममागेच आल्यानं विमानतळावर झुंबड उडाली होती. तशातच विमानतळावरच्या एका भागातलं वातानुकूलन बंद पडलं होतं. या कुटुंबातल्या सगळ्या बायका प्रथेप्रमाणे नखशिखांत काळ्या बुरख्यामधे झाकलेल्या होत्या. त्यातल्या एकीकडे एक अगदी छोटं असं लहान मूल होतं आणि तिने त्याला हातात आडवं धरलं होतं. इमिग्रेशन वगैरे चालू होतं. वातानुकूलन बंद पडल्यामुळे थंडी असून सुद्धा आत मधे बर्याधपैकी उकडत होतं. मुलं रडत होती. पण एका अधिकार्यानच्या लक्षात आलं की त्या बाईच्या हातातलं मूल अजिबात रडत नाहिये आणि काही हालचालपण करत नाहिये. तो मुद्दाम तिच्यावर पाळत ठेवून राहिला. बराच वेळ तसाच गेला मुलाची काहीच हालचाल नाही आणि त्या बाईने पण त्याला दूध पाजणे वगैरे काही नाही. त्याला काहितरी संशयास्पद वाटले. अजून बराच वेळ गेल्यावर त्या पूर्ण कुटुंबाला एका बाजूला नेण्यात आलं आणि पूर्ण झडती घेण्यात आली. तेव्हा कळलं की ते मूल मेलेलं होतं आणि त्याच्या शरिरात आत मधे अंमली पदार्थ भरण्यात आले होते. (पेपर मधे असे आले होते की तो इतका निर्ढावलेला अधिकारी सुद्धा टॉयलेट मधे जाऊन ओकला होता!!!) त्या पूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली. (पुढे असे कळले की त्या बायका आणि इतर मुले यांना काही काळ तुरुंगात टाकून मग डीपोर्ट करण्यात आले. पण त्या सगळ्या पुरूषांना मात्र देहदंड झाला. मारून टाकलं.) पहिल्याच दिवशी सकाळी असलं काही वाचून खरं तर थोडी खिन्नता आली मनाला. पण हळू हळू सवय झाली पुढे असलं काही तरी वाचायची. मी पण निर्ढावलो. :(

नंतर सगळे बाहेर पडलो. पोटभर न्याहारी झाल्यावर ऑफिसकडे निघालो. पहिलाच दिवस असल्याने ऑफिस मधे काही सोपस्कार पार पाडायचे होते. क्लायंट कडे दुसर्‍या दिवसापासून जायचे होते. गाडी ऑफिसच्या दिशेने निघाली. सगळ्यात पहिल्यांदा मनात काय भरलं असेल तर मोठे रस्ते, एक प्रकारचा 'मोकळेपणा' आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर असलेली हिरवळ आणि फुलझाडं. पूर्ण रस्ताभर जांभळ्या, निळ्या, पिवळ्या फुलांचे ताटवेच्या ताटवे पसरले होते. जेवढी हिरवळ मी भारतात नाही बघितली तेवढी सौदी अरेबिया सारख्या वाळवंटात बघितली. छान प्रसन्न वाटत होतं. मला प्रश्न पडला की या वैराण भागात अशी हिरवळ आणि ताटवे बनवायचे आणि त्यांची निगा राखायची म्हणजे किती पाणी लागत असेल. थोडं पुढे गेलं तर एक भला मोठा पाण्याचा टँकर दुभाजकाच्या बाजू बाजूने अगदी हळू हळू जाताना बघितला. त्याच्या मागोमाग एक माणूस हातात पाईप घेऊन त्या टँकर मधलं पाणी त्या झाडांना आणि हिरवळीला घालत होता. आपल्या कडे लाखो लोकांना साधे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. आणि इथे वाळवंटात या लोकांनी अक्षरशः नंदनवन फुलवले होते. मी आमच्या ड्रायव्हरला विचारले की हे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतं कुठून? उत्तर ऐकून मी अजूनच चाटच पडलो. सौदी अरेबियाला खूप मोठा समुद्र किनारा लाभला आहे. इथे बर्‍याच ठिकाणी 'वॉटर डीसॅलिनेशन प्लँट्स' आहेत. तेल आणि नॅचरल गॅस मुबलक आणि अतिशय स्वस्त प्रमाणात उपलब्ध असल्याने असे प्लँट्स चालवणे खूपच सोपं आणि किफायतशीर पडतं. तर अश्या प्रकारे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. एका क्षणात पेट्रोडॉलर्सची ताकद समजली. शिवाय हेही लक्षात आलं की भले तिथे लोकशाही नसेल पण येणार्‍या पैश्यामुळे सरकारने प्राथमिक सुविधा म्हणजे रस्ते, पिण्याचे पाणी वगैरे खूपच उत्तम रितीने पुरवले आहे. त्या बाबतीत तरी कोणाला नावं ठेवायचा काहीच चान्स नाही लोकांना.



आमचं ऑफिस 'पेट्रोलियम सेंटर' नावाच्या कमर्शियल सेंटर मधे होतं. बर्यारच मोठ्या मोठ्या तेल धंद्याशी निगडीत कंपन्यांची कार्यालयं या इमारतीत आहेत. ऑफिस अगदी प्रशस्त होतं पण तिथे भयानक शांतता असायची. क्वचित कधी एखादा माणूस दिसायचा. ऑफिसातले बहुतेक लोक बाहेरच असायचे. दर गुरूवारी मात्र सगळे ऑफिसमधे असायचे. त्या दिवशी नुसतं गजबजून जायचं. सगळे सोपस्कार पूर्ण करे पर्यंत दुपार उलटून गेली. पहिलाच दिवस असल्यामुळे काम काहीच नव्हतं. मस्त आरामच चालला होता. कुठल्या प्रोजेक्टवर मला काम करायचं हेही ठरलं होतं त्या मुळे त्या बद्दल थोडी माहिती वाचत होतो. निवांत गेला दिवस. एक गंमतीची गोष्ट घडली. तिथला एक सहकारी खूपच चांगला होता. छान गप्पा वगैरे मारत होता. त्याने खूप गंमतिदार चित्र दाखवलं. म्हणाला "मला अजून दोनच वर्षं झाली आहेत. तू किती दिवस रहायचं ते, हे चित्रं पाहून ठरव." :)



संध्याकाळी लवकरच हॉटेलवर परत आलो. एक एक जण येत होता परत. जेवायला एका जवळच्याच ठिकाणी गेलो. खरं तर नॉन व्हेज खात नसल्यामुळे मला इथे आपल्या जेवणाची कशी सोय होईल अशी एक शंका होतीच मनात. पण जिथे जेवायला गेलो होतो त्या भागात बरीच भारतिय रेस्टॉरंट्स दिसली. आणि बहुतेक ठिकाणी थाळी आणि शाकाहारी पदार्थ मिळतात हे ऐकून बरे वाटले. मस्त जेवून वगैरे हॉटेलवर आलो परत. आत्ताशी कुठे ८.३० / ९ च वाजले होते. हॉटेलच्या लॉबीत जरावेळ गप्पा मारत बसलो. रिसेप्शनवर पण कालचा इजिप्शियन नव्हता. एक कोणीतरी हैद्राबादीच दिसत होता. आमच्याच वयाचा पोरगा होता. तो पण आमच्यात येऊन गप्प मारयला लागला. बोलता बोलता तो आमच्या बॉसला म्हणाला, 'क्या मियां, इत्ते दिनो से बोल रहा हूं, कुछ अच्छासा जॉब दिलाओ. आप कुछ नाही कर रे.' आमचा बॉस म्हणाला त्याला, 'अरे हमारा सॉफ्टवेअर डेवलपमेंट इधर नही है, वो सब इंडिया मे है. फिर भी ट्राय करता हूं.' मी विचार करत होतो की हा रिसेप्शनिस्ट पोरगा, सॉफ्टवेअर डेवलपमेंट मधे काय करणार?" त्यालाच विचारले. त्याची हकिकत ऐकल्यावर मात्र नसते विचारले तर बरे झाले असते असे वाटले. कमीतकमी पहिल्या दिवशी तरी नको.

त्याची कहाणी अशी. तो राहणारा हैद्राबादचा. घरची गरिबी. ६-७ भावंडं. घरी कमावणारे वडिल एकटे. हा शिकला. पदवीधर झाला. ओरॅकलचे वगैरे कोर्स केले आणि एका छोट्या कंपनीत नोकरी पण मिळाली. पण डोक्यात गल्फ मधे जायचे वेड घुसले. पैसा कमवायचा, बस्स्स. एक एजंट भेटला. म्हणाला १ लाख रुपये लागतील, तुला सौदी अरेबियाचा व्हिसा आणि नोकरी देतो. याच्या डोक्यात तर पक्कंच घुसलं. पण एक लाख रुपये आणायचे कुठून? याची तळमळ बघून त्याच्या बापालाही वाटलं, पोरगं जाईल तिकडे तर कमवेल व्यवस्थित आणि पैसा दिसेल आपल्याला पण. बापने घर गहाण टाकलं आणि उभे केले पैसे. त्या एजंटने व्हिसा मिळवला. आणि नोकरी पण. एका मोठ्या हॉटेलमधे काँप्यूटरशी संबंधित काम करायचे. हा खूष झाला. त्याच धुंदीत आला इथे. पहिल्याच दिवशी दणका बसला. इथल्या पध्दतीप्रमाणे त्याचा पासपोर्ट काधून घेतला त्याच्या मालकाने आणि सरळ एक बांधकाम चालले होते (तेच ते मोठे हॉटेल जिथे हा काँप्यूटरचे काम करणार होता :) ) तिथे नेऊन लाद्या बसवायच्या कामावर लावला. हा पोरगा अक्षरशः कोलमडला. खूप रडला भेकला. २-३ दिवस अन्नपाणी सोडलं त्याने. काही उपयोग झाला नाही. शेवटी चूपचाप तेच काम केलं २-३ महिने. नंतर अजून असंच काही. हळूहळू त्या मालकाशी नीट वागून संबंध नीट बनवले आणि मग या हॉटेलला रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवला त्याला. त्याच दिवशी माझा पण पासपोर्ट काढून घेतला होता कंपनीत. आज ते सगळं आठवून हसायला येतंय. तेव्हा हादरलो होतो. तरी बरं आमचे सगळे सहकारी भारतिय होते आणि तशी काही भिती नव्हती. पण त्या दिवशी अस्वस्थ झालो होतो हे नक्की.

*************

दुसर्‍या दिवसांपासून काम नियमित सुरू झालं. हळू हळू मी पण रूळलो. काही दिवसांनी हॉटेल सोडलं आणि एका भारतिय कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून राहू लागलो. तेवढंच जरा घरच्या सारखं वाटायचं. रुटिन आयुष्य सुरू झालं. एक प्रकारचा सरावलेपणा आला माझ्यात. जी काही अलिखित बंधनं असतात ती सगळी अक्षरशः 'सेकंड नेचर' सारखी अंगात भिनली हळूहळू. सौदी अरेबिया बद्दल जी एक भिती वाटत होती ती गेली.

बंधनं म्हणाल तरी तशी ती फारशी जाचक नव्हती. पण अडचण मात्र नक्कीच व्हायची. दिवसातून पाच वेळा प्रार्थना होते. आपल्या कडे याला नमाज़ म्हणतात, पण खरा अरबी शब्द आहे 'सलाह'. तर ही सलाह ५ वेळा असते आणि प्रत्येक वेळी आधी 'अझान' (मूळ अरबी शब्द 'अधान') होते. ही अधान झाली की पटापट दुकानं बंद होतात, माणसं रस्त्यावरून गायब होतात. सगळीकडे सुनसान शांतता पसरते. प्रार्थना संपली की सगळं पूर्ववत्. सुरूवातीला सवय नसल्याने जरा विचित्र वाटायचं पण नंतर सवय इतकी झाली की प्रार्थनेच्या वेळा सहज लक्षात राहू लागल्या. प्रार्थनेच्या वेळा लक्षात ठेवाव्या लागत कारण, त्या सतत बदलत असतात. नमाजाची वेळ ही आकाशातल्या सूर्याच्या स्थानावर अवलंबून असते. म्हणजे सूर्योदयाच्या आधी केली जाते ती 'फजर', सूर्य बरोबर डोक्यावर आला की 'धुहर', सूर्य कलायला लागला की 'असर', सूर्य मावळला की 'मघरिब' आणि सूर्यास्तानंतर १-१.५ तासांनी 'इशा'... अश्या त्या पाच प्रार्थना. पूर्ण वर्षात दिवस लहान मोठा होत जातो. त्यामुळे या प्रार्थनांच्या वेळा पण बदलत जातात. उन्हाळ्यात खोबारला खूप लवकर म्हणजे सकाळी ४ वगैरे वाजताच उजाडायचे. साहजिकच त्या वेळी सकाळ्ची प्रार्थना ३.३० ला वगैरे व्हायची. आणि संध्याकाळी ७-७.३० ला सूर्यास्त व्हायचा तर त्या वेळी 'मघरिब' आणि मग 'इशा' रात्री ९ वाजता वगैरे. हिवाळ्यात सूर्योदय ६.३० च्या सुमारास आणि सूर्यास्त मात्र संध्याकाळी ४.३० वाजताच. साहजिकच प्रार्थनेच्या वेळा पण पुढे मागे होत, आणि तेवढ्या वेळात बाहेर काहिही करता येत नाही म्हणून त्या वेळा लक्षात ठेवून त्या प्रमाणे सगळे आखावे लागायचे. बरं या वेळी तिथले संस्कृतिरक्षक (मुतव्वा) सगळीकडे फिरत असतात. एखादा मुसलमान प्रार्थनेला न जाता नुसताच उभा असलेला आढळला तर त्याला पायावर वेताच्या छडीचे २-४ फटके मारून जवळच्या मशिदीत पिटाळत. :) (मुसलमान नसलेल्यांना काय करत ते सांगेनच पुढे ;) )

अर्थात ही बंधनं पण स्थळाप्रमाणे कमी अधिक जाचक व्हायची. सौदी अरेबिया हा एक अतिप्रचंड देश आहे. त्यामुळे स्थानिक चालींमधे फरक असणारच. त्यामानाने खोबारला फारसं कर्मठ वातावरण नव्हतं. पण १५ किमी वरील दम्मामला त्या मानाने वातावरण जास्त कडक होतं. रियाध मधे तर खूपच कर्मठपणा आहे आणि अगदी अंतर्भागात काही ठिकाणी कल्पनातीत कर्मठ लोक आहेत.

अर्थात एक प्रकारचा दबले पणा असायचा सतत पण मित्र वगैरे झाले आणि तेवढ्या वर्तुळात आयुष्य सिमीत पण एकंदरीत मजेत जाऊ लागलं. पण तेवढ्यात एक अशी घटना घडली की त्या मुळे मी परत 'सौदी अरेबिया काय चीज आहे' या वास्तवात परत आलो.

एका शुक्रवारी, सुट्टीचा दिवस असल्याने, आमच्या कंपनीच्या ड्रायव्हरला पटवून एका मित्राकडे जायचा बेत बनवला होता. तो जरा लांब राहायचा म्हणून लवकरच निघालो. शुक्रवारी संपूर्ण सौदी अरेबिया पूर्ण पणे बंद असतं. तो अतिशय महत्वाचा प्रार्थनेचा दिवस. इतर दिवशी नमाज न पढणारे (सौदी अरेबियात असा मुसलमान विरळाच) लोक सुद्धा त्या दिवशी न चुकता नियमाने नमाज पढत. दुपारचा नमाज हा अत्यंत महत्वाचा असतो. त्या नमाजाच्या आधी एखादे लांबलचक प्रवचन (अरेबिक शब्द - खुत्बा) असतं. तर आम्ही निघालो सकाळचे लवकरच आणि थोड्या वेळात नमाजाची वेळ झाली. आमचा ड्रायव्हर एके ठिकाणी गाडी उभी करून गेला नमाज पढायला. मी शांतपणे गाडीत एसी लावून बसून राहिलो. नमाज वगैरे झाला तब्येतीत, मी म्हणलं आता येतील चालकसाहेब. तेवढ्यात त्या मशिदी समोरच्या मोकळ्या मैदानात सायर्न वाजवत ५-६ पोलिस व्हॅन्स आल्या. त्यांच्या मागोमाग एक ऍम्ब्युलन्स. मला प्रचंड टेंशन आलं. काय भानगड झाली आहे काही कळेना. सलाह संपवून बाहेर येणारे लोक मात्र त्या व्हॅन्स पाशी जमा होत होते. थोड्या वेळाने एका व्हॅन मधून एका माणसाला बाहेर काढले. तो अर्धवट बेशुद्ध होता, म्हणजे त्याला गुंगीचे औषध देण्यात आले असावे असे वाटत होते. माझी ट्यूब पेटली एकदम. हा काहीतरी फटके वगैरे देण्याची शिक्षा अंमलात आणण्याचा कार्यक्रम असावा. मी गाडीतून उतरलो आणि तिथे थोडा मागे जाऊन उभा राहिलो. माझी उत्सुकता पार ताणली गेली होती. हे असं काही होतं इथे असं खूप ऐकलं होतं पण अचानक बघण्याचा योग आला होता. थोडा वेळ तसाच गेला. गर्दी पण वाढली. त्या गुन्हेगाराला खाली गुडघे टेकून बसायला लावले. त्या पोलिसांपैकी एकाने एक लांबलचक फर्मान उघडले आणि वाचले. (नंतर कळले की ते त्याच्यावरचे आरोप आणि शिक्षेबद्दलचे न्यायपत्र होते). त्या नंतर जवळ जवळ ५-१० मिनिटे परत काहीच नाही. सगळे शांत उभे होते. पोलिस सुद्धा. कोणीच काही बोलत नव्हते. (हे पण नंतर कळलं की न्यायपत्र वाचनाच्या शेवटी असं म्हणलेलं असतं की या गुन्ह्याचा जो कोणी बळी असेल तो / ती किंवा त्यांचे वारस या माणसाला माफ करून किंवा काही पैश्याच्या मोबदल्यात मरणापासून वाचवू शकतात. त्या साठी तो ५ मिनिटांचा वेळ. आणि असे बरेच वेळा घडते की गुन्ह्यात बळी ठरलेले त्या गुन्हेगाराला काही पैसे घेऊन किंवा तसेच माफ करतात. अश्या पैशाला 'दिया' म्हणतात, इंग्लिश मधे 'ब्लड मनी' असा शब्द प्रचलित आहे.) आणि एकदम एका दुसर्‍या व्हॅन मधून एक माणूस बाहेर आला त्याच्या हातात होती एक तलवार. एका क्षणात मी समजलो. हा फटके बिटके मारण्याचा कार्यक्रम नव्हता. मी चक्क एक देहांत शासन अंमलात आणण्याचा कार्यक्रम बघत होतो. मला घाम फुटला. या प्रकाराबद्दल बोलणं सोपं असतं, कल्पना करणं सोपं असतं.... अवचितपणे असं समोर दृश्य उभं ठाकलं तेव्हा मात्र मी हादरलो. डोळे मिटून घेतले. हे सगळं लवकर आटपावं म्हणून देवाची प्रार्थना करत होतो. एक मोठा 'सप्प्प' असा आवाज आला... एक सेकंद सगळेच शांत होते. तेवढ्यात टाळ्या वाजवल्याचा आवाज आला. डोळे उघडले. समोर रक्ताचं थारोळं, एक धड आणि एक मुंडकं. पोलिस आणि काही मुतव्वा टाळ्या वाजवत होते. जगातला एक पापी नष्ट केल्याचा आनंद व्यक्त करत होते. मी काहिही विचार न करता मागे वळलो, धावत धावत गाडीपाशी आलो. ड्रायव्हर आत बसला होता. गाडी चालू होती. तो म्हणाला, "कशाला गेलास तिथे? मी पहिल्यांदा हे बघितलं तेव्हा १५ दिवस जेवलो नव्हतो. काही खाल्लं की उलटी व्हायची. मी तुला जाताना बघितलं, हाका मारल्या तुला पण तुझं लक्षच नव्हतं." मी कसाबसा एवढंच बोललो, "आधी गाडी सुरू कर. इथनं नीघ." आम्ही तिथून निघायच्या आत सगळं मैदान रिकामं झालं होतं आणि दोन माणसं एका मोठ्या टँकर मधलं पाणी टाकून ती जागा साफ करत होते. दुसर्‍या दिवशी तिथनं गेलो तर काल इथे असं काही घडलं असेल अशी शंका सुद्धा येत नव्हती.




http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/SRX69ehf-cI/AAAAAAAAAX8/Rf4PBORuZR8/s400/saudi_law.jpg

(संपादक - इथे दिलेले चित्र हे बघणार्‍याचे मन विचलित करणारे भयावह असे असल्याकारणाने संपादित करुन काढून टाकले आहे. सत्य असले तरी सर्वसामान्य वाचकाला इतक्या भयावह पद्धतीने ते बघणे नकोसे वाटते. लेखकाने संपादनामागच्या भावना लक्षात घ्याव्यात!)

मूळात मला वेगवेगळ्या धर्मांबद्दल, संस्कृतिंबद्दल, लोकांबद्दल कुतूहल फार आहे. पण त्या दिवशी हा प्रकार बघितल्यावर मनात आलं, "नक्की कसे आहेत हे लोक? काय म्हणतो यांचा धर्म? खरंच का असं काही आहे त्याच्यात? जाणून घेतलंच पाहिजे." आणि हळूहळू मी त्याबद्दल वाचायला लागलो. लोकांना प्रश्न विचारायला लागलो.

क्रमशः

(संपादक मंडळासाठी सूचना: या लेखातील काही छायचित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. धन्यवाद.)

3 comments:

Unknown म्हणाले...

आपले अनुभवकथन एकदम अप्रतीम वाटले. ५ भाग बघून आधी विचार केला होता की, रोज एक-एक वाचूया.....
पण थांबवले नाही व एका बैठकीत पाचही भाग वाचले. लिखाणाची उत्त्म शैली, रंजकता, योग्य वेळी घेतलेला ब्रेक...सारेच दाद देण्यासारखे.
आपल्याकडून अजून जास्त वाचायला आवडेल.

क.लो.अ.
क्षितिज पाडळकर

Unknown म्हणाले...

'अझान' (मूळ अरबी शब्द 'अधान') = अज्ञान

असाच एक संस्कृत शब्द द्वार: (उच्चार द्वारहा) आपल्याकडे दार, उर्दूत द्वारहा चे दरवाजा,
उझ्बेक मध्ये द्वेर आणि इंग्लिशमध्ये डोऽर.

बाकी आपण वर्णन केलेली इस्लामी क्रुरता पुस्तकांमधून, दूरदर्शनवरून आणि आता प्रत्यक्ष अनुभवायला येत आहे. मन उद्विग्न झाले आहे.

मी बिपिन. म्हणाले...

क्षितिज, मृदुला... धन्यवाद.