पुस्तक ओळख - पश्चिमप्रभा

on रविवार, मार्च १५, २००९

जवळजवळ दर भारतभेटीत काही ना काही पुस्तकं विकत घ्यायचा प्रयत्न असतो. तिथे गेल्यावर वेळ थोडा असतो, त्यामुळे जायच्या आधीच काही पुस्तकांची यादी तयार करून सुसज्जच जावे लागते. तीन - चार महिन्यांपूर्वी असाच योग आला. काही पुस्तकांची नावं सुचव असं कळवल्यावर मुक्तसुनीतनी महेश एलकुंचवारांच्या 'पश्चिमप्रभा' या पुस्तकाचं नाव अग्रक्रमाने घेतलं. त्यामुळे पुस्तक घेतलेच.

हे पुस्तक, एलकुंचवारांनी 'लोकमत' मधे २००४-०५ साली साधारणपणे वर्षभर पाश्चिमात्य साहित्याची तोंडओळख मराठी सामान्य वाचकाला व्हावी अशा हेतूने चालवला होता. यामधे इंग्रजी बरोबरीनेच इतर युरोपिय भाषामधल्या काही उत्कृष्ट कलाकृतींचाही अतिशय धावती पण नेमकी अशी ओळख करून दिली आहे. वृत्तपत्रिय स्तंभलेखन या स्वरूपातले हे लेख अगदी छोटेखानी आहेत आणि ते त्या कलाकृतीची केवळ ओळख करून देणे एवढ्याच पुरते मर्यादित आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर एलकुंचवारांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. ते म्हणतात,

".... गेली पन्नास वर्षे मी पाश्चात्य वाङ्मय वाचत आहे. त्याबद्दल बोलावे, त्याच्याबद्दल ऐकावे असा योग सहसा येत नाही. त्यामुळे.... मला विशेष आवडलेल्या पुस्तकांची... तोंडओळख वाचकांना करून द्यावी असे मला वाटले.

हे छोटे लेख टिपणवजा आहेत. ते समीक्षा नव्हेत. ते फार विवेचकही नाहीत.

.... ही सर्वच पुस्तके इतकी मोठी व अभिजात आहेत की एकेका छोट्याशा टिपणात त्यांना गवसणी घालणे शक्य नाही. पण ज्यांनी ती वाचलेली नाहीत त्यांना ती वाचावीशी वाटावीत व ज्यांनी ती वाचलेली आहेत त्यांना पुनःप्रत्यय मिळावा एवढाच मर्यादित हेतू हा स्तंभ लिहिताना मी मनाशी वागवला होता."

खरं म्हणजे लिहिणारे एलकुंचवार, विषय त्यांना आवडलेल्या साहित्यकृती आणि त्याही अभिजात वगैरे, तेव्हा इतक्या छोट्या टिपणवजा लेखांतून त्या त्या कलाकृतींचे समग्र दर्शन घडवणे ही एक तारेवरचीच कसरत होती. पण त्यांनी ती यशस्वीपणे निभावून नेली आहे. पुस्तकात जागोजागी प्रत्येक कलाकृतीतलं नेमकेपण टिपण्याचा त्यांचा गुण जाणवतो.
हेन्री मिलर, व्हॅन गॉफ, चेकोव, मॉम, टी. एस. एलियट, ग्रॅहॅम ग्रीन, पिरांदेलो, इब्सेन अशी बरेच वेळा कानावर पडलेली नावं तर त्यात आहेतच. पण रँबो, सोग्याल रिंपोचे, वॉल्ट व्हिटमन, लोर्का, ज्याँ जेने, सिल्विया प्लाथ अशी माझ्या सारख्याला कधीच माहित नसलेली नावं पण आहेतच. यातले काही लेखक तर रूढार्थाने साहित्यिकही नाहीत. उदाहरणार्थ तिबेटन लामा सोग्याल रिंपोचे हे धर्मगुरू. त्यांच्या 'तिबेटन बुक ऑफ लिव्हिंग अँड डायिंग' बद्दल खूप छान ओळख आहे. तसेच दाग हामरस्कोल्ड, हे गृहस्थ तर युनोचे सरचिटणीस. राजनयिक. पण त्यांचे 'मार्किंग्ज' हे काय जबरदस्त ताकदीचे असावे हे त्यांच्यावरचा लेख वाचताना जाणवते. पॉल ब्रंटनचे 'अ सर्च इन सिक्रेट इंडिया' हे एकमेव पुस्तक असे की जे मी आधी वाचले होते, आणि पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळाला.

पुस्तकात जागोजागी एलकुंचवाराच्या चौफेर वाचनाची कल्पना येते. रिंपोचेंच्या पुस्तकाच्या ओळखीत ते लिहितात, "गुरू रिंपोचे सांगतात ते भारतीय माणसाला नवीन नाही. योगसूत्रातला समाधीपाद आणि साधनपाद वाचलेल्या माणसाला तर नाहीच नाही." !!! तर बरेच ठिकाणी पाश्चात्य कलाकृतीशी समांतर अशी भारतीय किंवा मराठी साहित्यातली उदाहरणं ते देतात. ललित, कादंबरी, कविता, नाटक असे सगळेच साहित्यप्रकार हाताळले आहेत. शेवटी, "या माणसाने आयुष्यात फक्त वाचनच केले आहे का?" असे वाटायला लागते.

पण हे साधारण तीसेक लेखांचे पुस्तक वाचल्यावर माझी मात्र गोची झाली आहे. 'एकदा तरी वाचायची आहेत' या यादीत एकदम इतक्या पुस्तकांची भर पडली आहे. म्हणजे, एकंदरीत पुस्तकाचा मूळ उद्देश नक्कीच साध्य झाला आहे.

***

पश्चिमप्रभा
महेश एलकुंचवार

पहिली आवृत्ती (२००६)
चक्षू प्रकाशन, औरंगाबाद.

मूल्य : रू. १४०/-

माझं खोबार... भाग ८

on शुक्रवार, मार्च १३, २००९

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७

*************

असं सगळं असलं तरी, सौदीतल्या कट्टरपणाबद्दल, विशेषतः अरब मुसलमानांच्या कट्टरपणाबद्दल नुसतं ऐकलंच होतं. एक ते 'देहांत शासन' प्रकरण सोडलं तर तसा धार्मिक कट्टरपणा आणि अतिरेकी वागण्याचा प्रत्यक्ष कधीच त्रास झाला नव्हता.

पण एकदा काय झालं....


*************

मित्रहो, मागच्या भागात मी मला भेटलेल्या काही पाकिस्तानी मित्रांबद्दल लिहिले. अभारतिय मुसलमान व्यक्तींशी इतक्या जवळून आलेला हा पहिलाच संबंध. पण तो तसा संमिश्र असाच अनुभव म्हणावा लागेल. किंबहुना काही तुरळक अपवाद वगळता, बव्हंशी चांगलेच अनुभव आले. पण व्यक्तिशः असे असले तरी, सामाजिक जीवनावर, हिंडण्या फिरण्यावर एक हलकी का होईना पण वेगळी छाप पडलीच होती. मी पुढे काही अनुभव देणार आहे, जे अगदी पूर्णपणे नाही तरी बर्‍याच प्रमाणात प्रातिनिधिक आहेत.

*************

सौदी अरेबिया मधली एक प्रसिद्ध ज्युसचा ब्रँड बनवणारी कंपनी आमची कस्टमर होती. माझे तिथे नेहमी जाणे येणे असे. तिथले सगळेच लोक मला चांगले ओळखायला लागले होते. माझा संबंध तिथे विशेषकरून तिथल्या अकाउंट्स / फायनान्स डिपार्टमेंट मधे येत होता. त्या डिपार्टमेंटला तीन माणसं आणि तिघेही इजिप्शियन (स्थानिक भाषेत 'मसरी', अरबीत इजिप्तला 'एल मिस्र' असे म्हणतात.), त्यामुळे एकंदरीत सगळाच घोळ होता. पूर्ण अरब जगात इजिप्शियन्स हे चक्रम आणि सणकी म्हणून ओळखले जातात. मला या तिघांनी हे अगदी व्यवस्थित पटवून द्यायचे असाच जणू काही चंग बांधलेला होता. ;) कोणतीही गोष्ट धडपणे होऊ देत नव्हते. पण हळू हळू त्यांच्याशी नीट ओळख वाढवून वातावरण जरा सुसह्य केले. एखादी गोष्ट कशी समजावली तर त्यांना समजेल याचा अंदाज आला. त्यांचा मुख्य होता अश्रफ आणि अजून एक होता नासर. (या नासरची भली मोठी दाढी होती. नेहमी मला धार्मिक गप्पा मारायला उद्युक्त करायचा. एकदम कट्टर होता. एक दिवस हा पठ्ठ्या दाढी सफाचट करून आला. कारण विचारलं तर म्हणे स्किन वर रॅश आली. नंतर कळलं की त्याला अमेरिकन व्हिसा साठी अर्ज करायचा होता. दाढी वगैरे असल्याने त्याला वाटले की एखाद वेळेस व्हिसा मिळणार नाही, म्हणून मग धर्म गेला उडत आणि दाढी झाली गायब. ;) ) तिसर्‍याचं नाव विसरलो. हळू हळू चांगली मैत्री झाली त्यांच्याशी. पण धार्मिक बाबतीत जरा कडवटपणा जाणवायचाच. कंपनीचा मुख्य अधिकारी इशफाक नावाचा एक पॅलेस्टिनियन होता. हा म्हणजे धर्मात जे जे करू नका असे सांगितलेले ते सगळे करणारा. दर विकेंडला स्वारी बाहरीनमधे मुक्काम ठोकून असायची. हा साहेब आणि ती मसरी गँग एकदम ३६चा आकडा. मी मध्यममार्गी धोरणाने कोणत्याही भानगडीत न पडता आपले काम कसे उरकेल त्या प्रमाणे रहायचो. इथेच माझा एक भारतिय मुस्लिम सहकारी पण येत असे.

एकदा आम्ही दोघंही तिथे एकदम पोचलो. काही काम चालू होतं. तेवढ्यात दुपारच्या प्रार्थनेची वेळ झाली. अश्रफ एकदम सगळे काम सोडून उभा राहिला. निघाला प्रार्थनेला. माझ्या सहकार्‍याला म्हणाला "चल. आपण प्रार्थना उरकून घेऊ आणि मग पुढचे काम करू." (इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे स्वतःच्या प्रार्थनेचं पुण्य, सव्वाब, मिळतंच पण दुसर्‍यांना प्रार्थनेला उद्युक्त केलं तर त्यांच्या पुण्यातला काही हिस्सा पण मिळतो. त्यामुळेच लोक एक दुसर्‍याला ओढत असतात प्रार्थनेची वेळ झाली की.) माझा सहकारी म्हणाला की "तू हो पुढे, मी एवढी चर्चा संपवून आलोच." अश्रफ हातपाय धुवायला गेला. (प्रार्थनेच्या आधी हातपाय धुणे आवश्यक असते. त्याला वदू (उर्दूत वझू) असे म्हणतात.) तो ते करून आला तरी माझा सहकारी माझ्या बरोबर चर्चा करतच होता. त्याला १-२ वेळा आठवण करून अश्रफ गेला. तेवढ्यात नासरने पण तसेच केले. मागे लागून लागून शेवटी तो पण गेला प्रार्थनेला. दोघेही प्रार्थना संपवून परत आले तरी आमची चर्चा चालूच. माझा सहकारी धार्मिक असला तरी एखादी चर्चा किंवा काम अर्धवट टाकून प्रार्थना करणे वगैरे त्याला चूक वाटायचे. जरा वेळाने हे दोघं परत आले आणि आमचे बोलणे चालूच आहे हे पाहून, अश्रफला वाटले की मीच त्याला प्रार्थनेला जाण्यापासून रोखतो आहे. माझ्या सहकार्‍याला तो मोठ्या दिमाखात म्हणाला, "हे बघ, हा देश आपला आहे. इथे तुला एखाद्या काफिराचे म्हणणे ऐकायची अजिबात गरज नाही. आधी प्रार्थना करून ये." हे ऐकून मी आणि माझा सहकारी काही क्षण अक्षरशः सुन्नच झालो. माझ्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले होते. पण मी त्यातून सावरायच्या आधीच माझा सहकारी एकदम उसळून त्याच्या अंगावर ओरडला, "गप्प बस. काहीही बरळू नकोस. प्रार्थना कधी करायची, करायची की नाही ही, मी आणि अल्ला, आमच्या मधली खाजगी बाब आहे. त्यात तुला दखल द्यायची काहीही गरज नाही. आणि माझ्या मित्राला असं काही बोलशील परत तर याद राख. वाट लावून ठेवेन तुझी. तू अतिशय उद्धटपणे बोलून त्याचा अपमान केला आहेस, आधी क्षमा माग."

हा सगळा प्रकार अक्षरशः काही सेकंदात घडला. मी भानावर यायच्या आत माझ्या मित्राने अक्षरशः त्याच्या नावाने शंख करायला सुरूवात केली. ४-५ लोक गोळा झाले. प्रकरण वाढलं आणि इशफाकसाहेब त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. त्यांना अंदाज आला आणि तिथल्या तिथे त्यांनी स्वत: कंपनीच्या वतीने माझी माफी मागून प्रकरण मिटवले. आता अपमान करणारे मुसलमान, माझ्या बाजूने भांडणारा मुसलमानच आणि माझी माफी मागणारा पण मुसलमानच (तो सुद्धा अभारतिय) आणि मी 'काफिर'. किती फरक वागण्यात!!!

असाच अजून एक प्रसंग मला आठवतोय. माझ्या बाबतीत नाही घडलेला, पण एका चांगल्या स्नेह्यांच्या बाबतीत घडला होता. हे एक मराठी गृहस्थ, खोबारच्या (धाहरान) विमानतळावर एअर इंडियाचे एअरपोर्ट मॅनेजर म्हणून काम करत होते. खोबारला बदलून आले होते. त्यांचा एक सहायक होता, अजय म्हणून. पोरगा दिल्लीकडचा. एकदा एअर इंडियाचं विमान आलं होतं ते सुटायला काही तरी तांत्रिक कारणाने उशिर होत होता. माझे स्नेही तेव्हा नेमके दुसरीकडे होते. त्यांच्या खालोखाल म्हणून अजय सगळी धावपळ करत होता. त्या गडबडीत तो सुरक्षापरवाना गळ्यात घालायला विसरला. तसाच तो टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेर पडला टारमॅकच्या दिशेने जायला. मोजून ४ पावलं गेला नसेल तर त्याला तिथल्या रक्षकाने अडवले. परवाना गळ्यात नाही म्हणून. हा म्हणाला परवाना आहेच, मी परत माझ्या केबिनमधे जाऊन परवाना घेऊन येतो. पण त्या रक्षकाने त्याला सरळ अटकच केली. हा हातापाया पडत राहिला की अरे अटक करायची तर खुशाल करा, हे एवढं फ्लाईट जाऊ दे. पण काही उपयोग झाला नाही. बाकीच्या स्टाफने हे माझ्या स्नेह्यांना कळवले. ते तातडीने आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. अजयला पण सोडवले. पण त्यांनी त्या रक्षकाविरूद्ध त्याने काही असभ्य भाषा वापरली म्हणून तक्रार केली. एअरपोर्टच्या मोठ्या साहेबाकडे प्रकरण गेले. सुनावणीच्या वेळी त्याने त्या रक्षकाला विचारले की काय काय घडले. त्याने सोयिस्कर कथन केले. मग अजयने त्याचे म्हणणे मांडले. पण शेवटी, "एका काफिराच्या सांगण्यावर विश्वास ठेवून एका मुसलमानाला शिक्षा करता येणार नाही" असा निवाडा होऊन त्या रक्षकाला 'बाइज्जत बरी' करण्यात आले. माझे स्नेही अक्षरशः संतापाने लाल झाले होते मला हा प्रसंग सांगताना पण.

पण असे प्रसंग आणि अनुभव घडणे नविन नसले तरी तितकेसे सर्रास पण नसे हेही नमूद केले पाहिजे.

सौदी अरेबियाची अजून एक खास पैदास म्हणजे 'मुतव्वा'. हे प्रकरण इस्लामी धर्मशास्त्राशी संबंधित असलं तरी आख्ख्या मुस्लिम जगात फक्त सौदी अरेबियातच बघायला मिळतं. आपण खोबार भाग २ मधे बघितलंच आहे की राजसत्ता (अब्द्'अल अझिझ) आणि धर्मसत्ता (शेख अब्द्-अल वहाब) अरबस्तानाच्या एकीकरणासाठी एकत्र आल्या होत्या. त्यातच सत्तेची वाटणी झाली होती. त्याचंच प्रत्यक्ष रूप म्हणजे मुतव्वा. या वाटणी प्रमाणे एक धर्ममार्तंडांची समिती स्थापन झाली. तिचे इंग्रजी नाव 'कमिटी फॉर द प्रपोगेशन ऑफ व्हर्च्यू अँड प्रिव्हेंशन ऑफ व्हाइस'. इतकं जबरदस्त नाव असलेल्या कमिटीचे धंदे पण एकदम जबरदस्तच. या समितीचे सदस्य हे काही विशिष्ट धार्मिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतात. त्यांना व्यवस्थित पगार मिळतो. त्यांना पोलिसांसारखे काही अधिकार असतात. कुठेही इस्लाम विरूद्ध वर्तन होताना आढळलं तर त्या व्यक्तींवर तात्काळ आणि कडक कारवाई करायची त्यांना मुभा असते. कायद्या प्रमाणे त्यांच्या बरोबर एक पोलिस असणं बंधनकारक असलं तरी बहुतकरून तसं दिसत नाही. त्यांना कोणालाही अडवून कागदपत्र वगैरे तपासायचे अधिकार बहुधा नसावेत पण हाही नियम धाब्यावर बसवला जातो. याचं कारण म्हणजे त्यांच्या बद्दल असलेली आपल्यासारख्या सामान्य बाहेरच्यांना वाटणारी भिती. एखादा मुतव्वा समोर आला कीच अर्धं अवसान गळतं. इतकी त्यांची दहशत. त्यामुळे आजूबाजूला असे कोणी दिसले की लोक निमूटपणे रस्ता बदलून जातात.

हे मुतव्वा लोक साध्याच कपड्यात असतात. पण त्यांना ओळखणं अगदी सोप्पं असतं. त्यांचा गाऊन बर्‍यापैकी आखूड असतो. डोक्यावर रिंग नसते. आणि ती परिचित खूण.... भली मोठ्ठी दाढी... इंग्रजीत अनट्रिम्ड म्हणतात तशी. सहसा त्यांच्या हातात छडी असते. साधारण पणे २-२ च्या जोडीत फिरतात. नजर भिरभिरती. अजून एक खूण म्हणजे भली मोठ्ठी काळ्या काचा असलेली 'जीएमसी' गाडी. हातातली छडी खूप बोलते. विशेषतः प्रार्थनेची वेळ झाली, अजान झाली की सगळ्यांना प्रार्थनेला जाणे भाग पाडायला ही छडी एकदम पटाईत आहे. अश्या वेळी तुम्ही मुसलमान नसाल आणि तुम्हाला एखादा मुतव्वा प्रार्थेनला जायची सक्ती करतो तेव्हा तर प्रसंग फारच गंभीर होतो. आपण सांगावं की मी मुसलमान नाही आणि तो अतिशय आश्चर्याने तुमच्याकडे एखादा विचित्र प्राणी बघावा तसं बघून अगदी स्वाभाविकपणे विचारतो, "का?" !!! आता का काय? काय सांगणार, कप्पाळ? पण नाही, मग तिथेच भर रस्त्यात ऊन्हातान्हात इस्लाम वरचे एक अगम्य प्रवचन ऐकायला मिळते. आपण आपला भार एकदा या पायावर एकदा त्या पायावर टाकत निमूटपणे ऐकत राहणे एवढेच करू शकतो. म्हणली तर गंभीर म्हणली तर विनोदी अवस्था. मग त्याचे समाधान झाले की तो सोडून देतो. आणि एखादा मुसलमान सापडला तर पायावर छडीचे फटके हाणून जबरदस्तीने जवळच्या मशिदीत बोळवण होते त्याची.

मगाशी म्हणलं तसं त्यांच्या बद्दल वाटणारी जरबच आपल्याला गप्प बसवते. परत आपल्याला तिथली भाषा वगैरे काही कळत नाही त्यामुळे चेहरा जमेल तितका निरागस ठेवून निभावून न्यावं लागतं. मला स्वतःला कधी छडी खावी लागली नाही पण हा अनुभव घेतलेले बरेच होते माहितीतले. या मुतव्वांची अजून एक खासियत म्हणजे एखादी स्त्री काही चूक करताना आढळली तर ते तिच्याशी बहुतेक सरळ बोलणार नाहीत. तिच्या बरोबर जो कोणी पुरूष असेल त्याच्याशी बोलतात, म्हणजे त्यांची छडी बोलते आधी आणि मग ते बोलतात. :) आणि स्त्रिया एकट्या पडतच नाहीत बाहेर. कमीत कमी एखादा पुरूष असतोच बरोबर. नाहीतर घोळक्याने म्हणजे ७-८ जणी एकदम बाहेर पडायच्या.

एकदा मी बायकोमुळे छडी खाता खाता वाचलो. माझ्या बायकोला मुतव्वा बघायची फार उत्सुकता लागली होती. मी तिला म्हणायचो पण, काय तुझी महत्वाकांक्षा... पण नाही. आणि खोबार हे तेलव्यापाराचे केंद्र, खूप गोरे लोक तिथे असल्यामुळे सौदी अरेबियामधले सगळ्यात लिबरल शहर होते, त्यामुळे मुतव्वांची पकड बरीच ढिली होती. त्यामुळे मुतव्वा बघायचा योग वर्षातून ५-६ वेळाच. पण एकदा आलाच तो योग तिच्या नशिबात. आणि असा आला की परत तीने नाव नाही काढले.

झालं असं की एकदा तिला बरं नव्हतं, म्हणून आम्ही हॉस्पिटलमधे गेलो. मी गाडी पार्क केली आणि आम्ही हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीकडे निघालो. तिथल्या रितीप्रमाणे तिने काळा गाऊन चढवलाच होता. डोक्यावर केस झाकले जातील असा स्कार्फही घेणं आवश्यक असतं. तेही केलं होतं. चालता चालता तो स्कार्फ खांद्यावर पडला. तेवढ्यात समोरून एक बिनारिंग, आखूड गाऊन घातलेली दाढी येताना बघितली मी. हळूच बायकोला म्हणलं, "तुला मुतव्वा बघायचा आहे ना? हळूच तिकडे बघ, तो जो आहे ना तो मुतव्वा." ती पण 'आजिं म्या परब्रह्म पाहिले'च्या आनंदात तल्लीन होऊन बघत होती. तेवढ्यात ते परब्रह्म आमच्याच दिशेने यायला लागलं. मला वाटले की आम्ही त्याच्याविषयी बोललो ते त्याला कळले वाटते. हलकासा घाम फुटला. तो अगदी माझ्या समोर येऊन उभा ठाकला.

पण काही बोलायच्या आधी सभ्यपणे हसला, मग म्हणाला, "शी युवर वाइफ?"

मी, "हो". (क.. क.. क.. क.. किरण स्टाईल मधे).

तो, "कॅन यू प्लीज आस्क हर टू कव्हर हरसेल्फ प्रॉपरली?"

हुश्श!!! माझ्या लक्षात आलं की काय बिघडलं होतं. लगेच सुधारणा झाली. मी त्याला हसून दाखवलं. तो पण हसला आणि गेला बिचारा आपल्या वाटेने. त्या दिवशी माझा डॉक्टरचा खर्च फुकटच गेला, औषध न घेताच बायको खडखडीत बरी झाली. ;)

तर असे हे मुतव्वे... खास सौदी प्रॉडक्ट. पण, परत तेच, मानवाला लागू पडणारं महान तत्व त्यांनाही लागू पडतं. म्हणजे... माणूस तो माणूसच... अरे ला कारे केलं की अर्धी अरेरावी संपते. हेच मुतव्व्यांच्या बाबतीत पण सत्य आहे. आपली चूक नसेल आणि अरबी मधे थोडा शाब्दिक लढा देता आला तर त्रास कमी होतो. माझ्या पाहण्यात आलेल्या उदाहरणावरून मला हे चांगलेच कळले. झालं काय की...

सौदी मधे सगळ्या रेस्टॉरंट्स मधे 'फॅमिली' आणि 'इतर' अशी द्विवर्ण्य व्यवस्था असते. 'फॅमिली' म्हणजे स्त्रिया किंवा स्त्रिया बरोबर असलेली कुटुंबं. आणि सडे / एकटे पुरूष असतील तर 'इतर' ... सौदी भाषेत बॅचलर्स. फॅमिली भागात अश्या बॅचलर्सना सक्त मनाई. माझे बॅचलर मित्र आमच्या बरोबर फिरायला वगैरे यायला एकदम तय्यार असायचे. कारण माझी बायको बरोबर असल्याने, त्यांना फॅमिली सेक्शन मधे बसायला मिळायचं. ;)

तर आमच्या एका कस्टमरकडचा एक सुदानी अकाऊंटंट एका मॉल मधल्या रेस्टॉरंट मधे गेला. सोबत त्याची बायको होतीच. हा गडी एकदम बिन्धास्त. सुदान म्हणजे पूर्णपणे अरबी झालेले आफ्रिकेतले राष्ट्र. मातृभाषा अरबीच त्याची. फॅमिली एरियात जागा नसल्याने हा बायकोबरोबर 'इतरां'साठी ठेवलेल्या भागात बसला. थोड्यावेळाने एक मुतव्वा येऊन त्याच्या अंगावर ओरडायला लागला. त्याला फॅमिली भागात जायची सक्ती करू लागला. हा खमक्या, तो उलट वाद घालू लागला. थोड्या वेळाने तो मुतव्वा कंटाळला. त्याने विचारलं, "अरे इथे सगळे पुरूष तुझ्या बायकोकडे बघतील ना , तुला चालेल?" आमचा मित्र बायकोकडे वळून म्हणाला "का गं? तुला चालेल?" ती पण अमेरिकेत वगैरे शिकलेली. तिला राग होताच असल्या प्रकाराचा. ती तडक म्हणाली, "मला काही फरक पडत नाही." हे ऐकून त्या मुतव्व्याला बहुतेक फेफरं आलं असेल. बाईला प्रॉब्लेम नाही, दादल्याला पण नाही, ती व्यवस्थित अंग झाकून होती, शांतपणे दोघं जेवत होते. त्यामुळे मुतव्व्याची पंचाईतच झाली. त्यांच्या नावाने शिव्याशाप घालत गेला बिचारा. आमचा मित्र ही गोष्ट सांगताना पण जाम हसत होता.

अजून एका परिस्थितीत या मुतव्व्यांचा एकदम शक्तीपात व्हायचा. ते म्हणजे पाश्चिमात्त्य. मुख्यत्वे अमेरिकन्स आणि इतर गोरी जमात. त्यांच्या समोर अगदीच शेपूट घालून असत. पण एक मात्र खरं की मी असतानाच हे मुतव्वे हळूहळू सौदी सरकारला डोईजड झाले होते. अफगाणिस्तानात गेलेले बहुसंख्य लोक याच पंथातले होते. त्यातले बरेच लोक सोविएत पाडावानंतर परत पण आले. पण मग त्यांना बर्‍याच गोष्टी अगदी मानवेनात. संघर्ष वाढले. पेरलं तसं उगवायला लागलं. असंतोष वाढू लागला आणि त्यातूनच एकदम मोठ्ठा स्फोट होऊन बाहेर पडला 'ओसामा बिन लादेन' नावाचा राक्षस. तो तर सौदी सरकारच्याच गळ्याला नख लावायला निघाला. त्यामुळे त्याला हद्दपार केलं आणि नंतर काय घडलं हा इतिहास जगासमोर आहेच. त्या वेळेपासून सरकार पण खूप सावध झालं. सगळ्यात मोठ्ठी धरपकड मुतव्व्यांचीच झाली. अशी बातमी होती की रियाध शहराबाहेर या मुतव्व्यांच्या 'पुनर्वसना'साठी खास 'केंद्रं' स्थापण्यात आली होती. नुकतंच असंही कळलं की सरकारने काही नविन कायदे लागू करून त्यांच्या कारावायांना अजून खूपच आळा घातला आहे. पण हा संघर्ष इतका सहजासहजी संपणारा नाही. या संघर्षाचा शेवट आपण अजून नक्कीच बघितलेला नाहीये. सर्वसामान्य सौदी माणसाला हिंसा नकोही असेल पण धर्माचा पगडा पण इतकाच आहे की धर्माच्या नावाने लढणारे तथाकथित 'धर्मयोद्धे' कुठे तरी जवळचे वाटतात. तेलावर असलेली राजघराण्यातल्या मूठभर लोकांची पकड आवडत नाही. गोर्‍या लोकांचे मुक्त वावरणे नकोसे वाटते. आणि करू तर काहीच शकत नाहीत. धुमसण्याशिवाय. लोकशाही नाहीच. सामाजिक उन्नतीच्या संधीही तश्या कमीच. पण नविन राजा बराच उदार आहे असे म्हणतात. बायकांना ड्रायव्हिंग करायला परवानगी मिळणे हे आता वास्तवाच्या कक्षेत, अगदी दूर क्षितिजावर का होईना, आले आहे. खोबार तर नक्कीच बदलतंय. माझ्या परवाच्या ट्रिपमधे मी एक दोन बायका बिना बुरख्याच्या पण बघितल्या. अगदी ५ वर्षांपूर्वी ही एक अगदी अशक्य अशी गोष्ट होती. विश्वास नाही बसत. कालाय तस्मै नमः हेच खरं.

पण असं सगळं असलं तरी तिथलं आमचं जीवन अगदीच रंगहीन किंवा कळाहीन असं मात्र अजिबात नव्हतं. बंधनं असली तरी आपण काहीतरी मार्ग काढतोच. आमचा बर्‍याच लोकांचा एक चांगला ग्रुप होता. आम्ही सणासुदीला एकत्र भेटायचो. धमाल करायचो. गाणी वगैरे व्हायची. एखाद्याचं घर मोठं असेल तर मस्त दांडिया वगैरे पण खेळायचो, नवरात्रीला. माझ्याच घरी चांगला १० दिवस दणकून गणपती पण बसवला होता. रोज गर्दी व्हायची आरतीला. आयुष्यात कधी देवासमोर हात जोडले नसतील असे लोक पण हौसेने येऊन उभे रहायचे आरतीला. बंधनात जगताना बंडखोरीचा आनंद मिळत असावा बहुतेक त्यांना. एरवी सुद्धा एकत्र भेटून धमाल चालयची. तासनतास गप्पा मारणे हा पण एक ठरलेला कार्यक्रम. विशेषतः विकेंडला. या गप्पातून वेगवेगळे मजेशीर किस्से ऐकायला मिळायचे. सौदी माणसांबद्दलचे / देशाबद्दलचे विनोद तर खूपच आहेत. त्यातले काही देतो इथे:

सौदी माणसं एका बाबतीत विलक्षण प्रसिद्ध. अतिशय जिगरबाज ड्रायव्हिंग. कुणाच्या बापाला भीत नाहीत. १२-१२ वर्षांची पोरं पण बिन्धास्त गाड्या उडवतात. त्यातून तिथले स्थानिक टॅक्सीवाले तर विचारूच नका... एकदम उडन खटोला. त्याचा हा किस्सा. एक गोरा एकदा रियाध विमानतळावर उतरतो आणि टॅक्सीत बसतो. टॅक्सी निघते. थोड्या वेळाने रेड सिग्नल येतो. टॅक्सीवाला शिस्तीत सिग्नल क्रॉस करून जातो. गोरा घामाघूम. अजून एक रेड सिग्नल. परत तेच. गोरा टाईट. तिसर्‍यांदा परत तेच. रेड सिग्नल, गाडी सुसाट. गोरा जवळ जवळ बेशुद्ध. तेवढ्यात अजून एक रेड सिग्नल येतो आणि टॅक्सीवाला क्रॉस करनार एवढ्यात सिग्नल ग्रीन होतो. टॅक्सीवाला जीवाच्या आकांताने ब्रेक मारून थांबतो. गोरा आधी टॅक्सीच्या बाहेर उडी मारतो. आणि मग त्या टॅक्सीवाल्याला विचारतो. "बाबारे, हा काय प्रकार आहे. सगळे रेड सिग्नल तोडलेस. इथे मात्र ग्रीन असून सुद्धा कचकचून ब्रेक मारलास. का?" टॅक्सीवाला म्हणतो... "मग, उजवीकडून एखादा टॅक्सीवाला येत असेल तर." !!!!!

अजून एक विनोद म्हणजे सौदी मधली व्हिसा सिस्टिम. तिथे व्हिसावर हा माणूस काय कामासाठी आला आहे हे लिहिलेले असते. त्याला प्रोफेशन म्हणतात. प्रत्येक कंपनीला व्हिसाचा कोटा प्रोफेशन प्रमाणे आणि राष्ट्रियत्वाप्रमाणे ठरवून दिलेले असतो. सगळी नोकरभरती त्यात बसवावी लागते. त्यामुळे असे होते की घ्यायचा आहे भारतिय मॅनेजर पण कंपनीकडे भारतिय मॅनेजरचा व्हिसा नाहीये मग दुसरा जो काही भरतिय व्हिसा उपलब्ध असेल तो घ्यायचा माणसाला आणायचं. त्या मुळे बरेच वेळा व्हिसा प्रोफेशन एक आणि माणूस काम भलतंच करतोय असं दिसायचं. माझ्या ओळखीचा एक जण एका कंपनीत जी.एम. होता पण व्हिसा होता कूकचा. त्यामुळे त्याला बायकोला तिकडे नेताना त्रास झाला. कारण तो जरी जी.एम असला तरी सरकारदरबारी तो 'लेबर कॅटेगरी' असल्याने बायकोला आनता येत नव्हते. तर असाच किस्सा....

एकदा रियाध झू मधे एक नविन वाघ आणला. पहिल्या दिवशी त्याला जेवायला केळी दिली गेली. वाघ बेक्कार वैतागला. पण बिचारा प्रवासातून दमून भागून आला होता म्हणून जे मिळालं ते खाल्लं. दुसर्‍या दिवशी परत तेच. समोर हाऽऽऽ केळ्यांचा ढीग. वैतागला बिचारा. पण असेल काही स्थानिक पद्धत म्हणून गप्प बसला. तिसर्‍या दिवशी मात्र असं झालं आणि हा चवताळला. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडायला लागला. तिथला कीपर धावत आला. "काय रे, काय झालं तुला ओरडायला?" वाघ म्हणाला, "अरे मी वाघ आहे वाघ. मला केळी कसली देतोस?" कीपर शांत पणे म्हणाला, "तू असशील वाघ... पण तुझा व्हिसा माकडाचा आहे. तुला केळीच मिळतील." !!!!!

आणि हा मला सगळ्यात जास्त आवडलेला.... एक जण दुसर्‍याला म्हणतो... "सौदी अरेबिया इज द सेकंड बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड." दुसरा हैराण. "व्हिच इज द बेस्ट प्लेस देन?" पहिला म्हणतो... "रेस्ट ऑफ द वर्ल्ड" !!!!!

*************

मंडळी, खोबारने मला खूप काही दिलं. आयुष्यात पहिल्यांदा दूर भिरकावून दिल्यासारखा झालो होतो, मला आधार दिला. आसरा दिला. आप्तस्वकियांच्या आधाराशिवाय जगायला शिकवलं. माझी बायको आणि मुलगी तिथे आले तेव्हा कुटंबाची जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर असणे म्हणजे काय हे दाखवून दिलं. निरनिराळे लोक भेटले, नाना देशीचे नाना तर्‍हा असलेले नमूने बघितले, आपल्या स्वभावाला शक्य आणि आवश्यक तेवढी मुरड घालून त्यांच्याशी कसं जमवून घ्यायचं ते कळलं. एक नविन संस्कृती / भाषा जिच्याबद्दल लहानपाणापासून सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकून एक वेगळीच प्रतिमा मनात निर्माण झालेली असते, तिच्याबद्दल खूप काही शिकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं.... माणूस नावाचा अनाकलनिय आणि अतुलनिय प्रकार हा एका विशिष्ट पातळीवर सगळीकडे सारखाच असतो हे थोडंफार समजलं.

तर मंडळी असं हे माझं खोबार. वेगवेगळ्या रंगांचं. मला जे दिसले त्यातले जमले तेवढे रंग तुमच्या पुढे ठेवायचा प्रयत्न केला. जमलं की नाही हे तुम्हीच ठरवा. मी मात्र माझ्यासाठीच लिहित होतो. माझ्या मनात घर करून बसलेल्या खोबारचं ऋण उतरायचं होतं. कोणाबरोबर तरी वाटायचं होतं. ते झालं. खरं तर खोबार हे एक रूपक आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात असं एक खोबार येतं. कोणाला ते आपल्या राहत्या घरीच सापडतं... कोणाला कॉलेजच्या हॉस्टेलवर, तर कोणाला घरापासून हजारो मैल दूर परक्या देशात परक्या मातीत. पण आपापलं खोबार सापडणं हे महत्वाचं. मला ते 'अल खोबार' नावाच्या गावात सापडलं. तुम्हाला?

ऐकायला आवडेल मला...

सफळ संपूर्ण.