डूड...

on गुरुवार, सप्टेंबर ३०, २०१०

"लेडिज अँड जंटलमन, वी हॅव रिच्ड छॅट्रपॅटी शिवॅजी इंट'नॅशनल एअ'पोऽट मुंबाय. वी विल कमेन्स आऽर डिसेंट शॉर्टली. यु आऽ रिक्वेस्टेड..."

समोरच्या छोट्या स्क्रीनवर चाललेल्या टायटॅनिकमधे पार बुडालेला समीर एकदम भानावर आला. मान उंचावून दोन सीट सोडून डावीकडे असलेल्या खिडकीतून त्याने बाहेर नजर टाकली. विमान डावीकडे वळत होते. त्याबाजूला झुकल्यामुळे खाली चमचमणारा दिव्यांचा समुद्र अगदी लख्ख दिसत होता. सोळा सतरा तासाच्या प्रवासाने त्याचे अंग अगदी आंबून गेले होते. मस्त हात उंच करून त्याने आळस दिला. खिडकीच्या बाजूला शाय, आय मीन, शलाका काचेला नाक लावून खाली बघत होती. तिच्या बाजूला आई अगदी सराईतपणे घोरत होती. तिचे तोंड उघडे होते. आत्ता जर का आईचा हा अवतार मोबाईलवर शूट केला आणि नंतर तिला दाखवला तर स्वतःला अतिशय टापटीप ठेवणार्‍या आईची काय अवस्था होईल ते घोरणे आणि तोंड उघडे वगैरे, ते ही चार लोकांत, हे बघून या विचाराने समरला एकदम हसायला आलं आणि त्याच्या बाजूला बसलेले बाबा एकदम दचकून जागे झाले. चार पाच पेग तब्येतीत लावलेले असल्यामुळे ते दोन सेकंदात परत झोपले. थकवा, कंटाळा, जाग्रण सगळं एकदम धावून आलं आणि कधी एकदा या कैदेतून सुटतोय याची वाट बघत समीर स्वस्थ बसून राहिला. प्रथेप्रमाणे हवाईसुंदर्‍या आणि सुंदरे फेर्‍या मारून सगळ्यांच्या आसनांचे पट्टे वगैरे तपासत होते. खुर्च्या सरळ करत होते. तेवढ्यात चाकं बाहेर आल्याचा धप्प आवाज झाला आणि पाचच सेकंदात एक जोरदार हादरा बसून विमान लँड झाले. अगदी मागे बसलेल्या साताठ पोरांच्या टोळक्याने टाळ्या शिट्ट्या वाजवल्या आणि विमानात एकच गलका झाला.

एखाद्या गोष्टीसाठी वर्षानुवर्षे अगदी शांतपणे धीराने वाट बघावी, पण ती गोष्ट अगदी हाताशी आली की मात्र भयानक अधीरता यावी तसे झाले होते त्याला. आजी आजोबांना बघून जवळजवळ पाचेक वर्षं झाली होती. काका मामा आत्या मावश्या तर त्याहून जुन्या झाल्या होत्या. कधी एकदा घरी जातोय आणि आजीला घट्ट मिठी मारतोय असं झालं होतं त्याला. आजोबांची रिअ‍ॅक्शन मात्र माहिती होती त्याला. हळूच हसतील, डोक्यावरून हात फिरवतील आणि मग दुसरीकडे तोंड करून थोडे पुढे जाऊन चटकन डोळे पुसतील. आणि मग थेट गाडीत जाऊन बसतील. पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत आले होते तेव्हा असंच केलं होतं त्यांनी.

जोरात धावणारे विमान वेग कमी करत करत मग एका ठराविक वेगाने बराच वेळ हळूहळू चालत राहिले. बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता बहुतेक. टर्मिनल बिल्डिंगचे दिवे लखाखत होते. विमान धक्क्याला लागलं. इतके तास शहाण्या मुलांसारखे बसलेलं पब्लिक एकच झुंबड करून उठलं आणि वरच्या कप्प्यातलं सामानसुमान बाहेर काढू लागलं. यथावकाश दारं उघडली आणि विमान रिकामं व्हायला लागलं. इमिग्रेशन वगैरे सोपस्कार आटोपून बाहेर येईपर्यंत बराच वेळ लागला. समीर शलाका अगदी भिरभिर सगळीकडे बघत होते. त्यांच्यासाठी हे एक काहीतरी वेगळंच जग होतं. काहीतरी ओळखीचं पण बरंचसं अनोळखी. आजूबाजूचे लोक काय बोलतायत ते कळल्यासारखं वाटत होतं पण कळतही नव्हतं धड. एखाद्या ठार अडाणी माणसाला रस्त्यावर पाट्या बघत पत्ता शोधायला लागला तर कसं होईल, तसं वाटत होतं त्यांना. प्रत्येक गोष्ट अगदी नीट व्यवस्थित विचार करून करणारे बाबा तर अक्षरशः एखाद्या लहान मुलाच्या वरताण वागत होते. त्यांची आणि आईची एक्साईटमेंट आणि त्यापायी होणारी धांदल गडबड बघून समीरला खूपच गंमत वाटत होती.

"मॉम, व्हाय आ' यु गाइज गेटिंग सो एक्सायटेड? आय मीन, आय नो तुम्ही लोक जवळजवळ सेवन एट इयर्सनंतर येताय इंड्याला. बट यु बोथ आ' सिंपली लॉस्ट".

"शट अप सन, यु वोंट नो... द एन्टायर फॅमिली मस्ट बी वेटिंग आउट देअ' टू ग्रीट अस... गॉश... दादा, वहिनी, प्रभा... किती वर्षांनी भेटणारे मी सगळ्यांना."

आईला बोलू न देताच बाबा समीरला उत्तर देता देता स्वतःशीच बडबडायला लागले. आई तर त्याही पलिकडे गेली होती. तिला लांबूनच सगळे दिसायला लागले होते. त्यांची अवस्था बघून शलाका पण हसत होती. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात समीरने तिला कोपराने ढोसली...

"शाय, डोन्ट डिस्टर्ब देम. ईट्स देअर मोमेंट, लेट देम एन्जॉय इट."

एकदाच्या बॅग्ज आल्या आणि लटांबर बाहेर पडलं. बाहेर काका आणि चिन्मय उभे होतेच. साग्रसंगीत स्वागत झालं. बॅगा गाडीत गेल्या आणि गाडी निघाली. आई, बाबा काकांशी अखंड बोलत होते. समीर चूपचाप गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होता. इतकी रात्र झाली होती तरीही रस्ते कसे माणसांनी भरलेले होते. मूळात रस्त्यावर इतकी माणसं का? आणि ती माणसं नीट रस्त्याच्या कडेकडेने चालायचं सोडून अशी मधेच एकदम गाडीच्या बरोब्बर समोर का येतात? हा ड्रायव्हर अजून वेडा कसा झाला नाही? एका मागून एक प्रश्न समीरच्या मनात धुडगूस घालायला लागले.

एकदम त्याला आठवलं, इंड्या हॅज अ बिलियन पीपल. गॉश, इट मीन्स दॅट आयॅम अ‍ॅक्चुअली इन द मिडल ऑफ अ बिलियन पीपल. रिअली? एकदम त्याला वाटलं, पंचवीस तीस वर्षांपूर्वी रत्नाकर कुलकर्णी नावाचा एक हुशार विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेला नसता तर कदाचित आज आपण पण आज त्या रस्त्यावर चालणार्‍या लोकांमधलेच एक असतो. आपणही असेच आपल्या बापाची बाग असल्यासारखे भर रस्त्यावर बागडलो असतो. पण रत्नाकर कुलकर्णी अमेरिकेला गेला, खूप शिकला आणि यथावकाश नंदिताशी लग्न वगैरे करून तिथेच स्थायिक झाला. सॅम आणि शाय जगात प्रवेश करते झाले. रत्नाकर कामात गुरफटला आणि दोन भारतभेटींमधली गॅप वाढत गेली. पूर्ण वीस वर्षात फारतर तीन चार वेळा समीरने भारत बघितला होता. शलाकाने तर त्याहून कमी. आणि मागची ट्रिप तर खूपच जुनी. तरी बरं, मधे एकदा काका, मग मावशी, मग अजून कोणी कोणी... आणि दोन तीन वेळा आजी आजोबा, अशा नातेवाईकांच्या अमेरिकेच्या चकरा चालू होत्या.

आई, बाबा, काका यांच्या बडबडीने गाडीत नुसता गलका झाला होता. त्या सामुहिक समाधानाच्या उबेने समीर जडावत गेला आणि त्याने मस्त डोळे मिटून घेतले.

त्याला जाग आली तेव्हा गाडी पुण्यात शिरत होती. पहाट व्हायला आली होती. अजून उजाडायचे होते. रस्ते रिकामे होते. गाडी सोसायटीत शिरली. काकाचा फ्लॅट कोणता ते खालूनच कळत होते. घरातले लाईट चालूच होते. बाल्कनीत आजी आजोबा दिसले, समीर लिफ्टची वाट न बघता थेट जिन्यावरूनच पळत सुटला. मागे शलाका. घरात गोकुळच होतं. झाडून सगळे जमले होते. आजी आजोबा, अ‍ॅज एक्स्पेक्टेड, नुसते डोळ्यांनीच बोलत होते, डोळ्यांनीच हसत होते. समीर शलाकाने त्यांना मिठी मारली. गाडीतली इतर मंडळी, सामानसुमानासहित व्यवस्थित वर आले. सुरूवातीच्या गप्पाटप्पा झाल्या आणि हळू हळू दिवस सुरू झाला. पाहुणे मंडळी झोपली, घरातले इतर लोक कामाला लागले.

दुपारची जेवणं झाली आणि परत एकदा गप्पाष्टक सुरू झालं. पोरांना जवळ घेऊन आजोबा शांतपणे त्यांच्या खुर्चीत बसून सुखासमाधानाने भरल्या घराकडे बघत होते. आता महिन्याभरात साताठ वर्षांचे आयुष्य जगून कसे घेता येईल याचे प्लॅनिंग सुरू झाले होते.

"आता निवांत आराम करा बरं... काय लोळायचं ते लोळून घ्या महिनाभर, परत गेलात की आहेच परत रगाडा." आजी म्हणाली.

"कसला आराम हो आई. भेटीगाठीतच वेळ आणि जीव जाईल सगळा." नंदिताला महिनाभराचं भविष्य लख्ख दिसत होतं.

"काही नाही, मी सांगेन सगळ्यांना, ज्याला कोणाला भेटायचं त्यांनी इथे या. उगाच तुम्हाला दगदग नको आणि वेळ जातोच इकडून तिकडे जाण्यात."

"ते सगळं ठीक आहे हो, आई. पण देवदर्शनाला तर जावंच लागेल ना? तो काय येणार आहे स्वतः आपल्याकडे चालत 'घे माझं दर्शन' म्हणत?"

"व्हाय नॉट?", समीर उगाच आईला चिडवायचं म्हणून म्हणाला. अपेक्षेप्रमाणे रिअ‍ॅक्शन आलीच.

"तू गप्प बस हं समीर. तुम्हा मुलांना यातलं अजून काही कळत नाही. माहिती तर काहीच नाही. ते काही नाही. बाबा, आता महिनाभरात तुम्हीच शिकवा जरा चार गोष्टी पोरांना देवाधर्माबद्दल. आमच्यामागे घरात कमीत कमी देवापुढे दिवा तरी लागावा. बाकी सगळं स्वीकारलंच आहे मी, एवढं तरी होऊ दे." नंदिताने आजोबांना साकडं घातलं.

आजोबा गंमतीने हे सगळं बघत ऐकत होते. त्यांनी हळूच पोरांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांना वाटलं, हिलाच काहीतरी शिकवावं. अशा गोष्टी सांगून शिकवून कळत नसतात. त्या आतूनच याव्या लागतात. समीर शलाकालाही कळेल त्यांचं त्यांनाच. आपण फक्त त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणिव देत रहायची.

पण ते बोलले मात्र काहीच नाहीत, नुसतेच मंद हसत राहिले. त्या आश्वासक मुद्रेनेच नंदिताचं समाधान झालं. तिचे पुढचे बेत भराभर ठरायला लागले. फारसे कुठे जायचे नाही, पण देवदर्शनाला मात्र गावी जाऊन यायचे नक्की झाले.

"मॉम, तिथे जायलाच पाहिजे का? आय मीन, यु गाय्ज कॅन गो... मी राहतो इथेच. मला कंटाळा येईल तिथे."

"अजिब्बात नाही. आपण सगळे जायचं. आणि हे फायनल. नो आर्ग्युमेंट्स. एकदा तिथे आलास की कसं शांत वाटेल बघ." समीरला आईसमोर कधी गप्प बसायचं हे कळत होतं. तिचा चेहरा बघून, आता काही उपयोग नाही हे त्याला कळले.

***

जायचा दिवस ठरला. तयारी झाली. सगळेच जाणार होते. मोठी गाडी बुक झाली. आईला यावेळी सगळे पेंडिंग राहिलेले सोपस्कार, कुळाचार वगैरे उरकायचे होते. तिची तयारी चालू होती आणि सगळं काही नीट होईल का या टेन्शनमधे ती बुडून गेली. तिची ही धावपळ आणि टेन्शन बघून समीरला खरंच कळत नव्हतं की जिथे शांत वाटतं म्हणून जायचं तिथे जायला एवढी अशांती का? हे म्हणजे उलटंच की.

"आजोबा, टेल मी समथिंग. आपण गेलो नाही तर तो देव रागावेल का?" समीरने त्यातल्यात्यात जिथे उत्तर मिळायची अपेक्षा होती तिथे प्रश्न टाकला. बाकी लोकांनी नुसतीच दटावणी केली असती भलतेच प्रश्न विचारतो म्हणून.

"अजिबात नाही, समीर. अरे त्याला खरंतर काहीच गरज नाही या सगळ्या सोपस्कारांची. तो जिथे कुठे आहे तिथे निवांत आहे. आपली गंमत बघून स्वतःची करमणूक करून घेत असेल." आजोबा डोळे मिचकावत बोलले.

समीरला आजोबांचे फर कौतुक, ते एवढ्यासाठीच. त्यांना रागावलेले कधी बघितले नव्हतेच. आणि काहीही विचारले तरी त्यांचे उत्तर अगदी नेमके आणि गंमतीशीर असायचे. सकाळी आंघोळ करून ते पूजेला बसले की ते ज्या तल्लिनतेने पूजा करत, ते बघायलाच समीरला आवडत होते. अगदी देवाशी गप्पा मारत मारत पूजा चालायची.

"काय पांडोबा? काय म्हणताय? काल रखुमाईने पाय चेपले की नाही? की अजून रूसवा चालूच आहे? आणि तुम्ही हो मारुतराय, जरा शांत बसत जा हो."

असं चालायचं. सकाळी सकाळी मित्र गप्पा मारत बसले आहेत असं. समीरला तर वाटायचं की ते देव पण त्यांच्याशी बोलत असावेत. पण ते फक्त आजोबांनाच ऐकू येत असावं बहुतेक. त्याने एकदा त्यांना तसं विचारलंही. आजोबा काहीच बोलले नाहीत. फक्त त्यांचं ते ठराविक मिश्किल हसू आलं चेहर्‍यावर.

"पण आजोबा, मग हे आईचं जे काही चाललं आहे ते का? मला काहीतरी राँग वाटते आहे ते."

"समीर, माणसाला निराकार देव जवळच वाटत नाही म्हणून त्याने देवाला आपल्यासारखं रूप दिलं, तो जवळचा वाटावा, सखा वाटावा म्हणून. आणि मग एकदा देवाला माणसाचं रूप दिलं की बाकीचे सोपस्कार आले. आणि हळूहळू मूळ हेतू बाजूला राहून भिती मात्र वाटायला लागली. पण जर का तो कृपाळू आहे, आपला मित्र आहे, आपल्याला सुबुद्धी देतो तर घाबरायचं कशाला? पण लोकांना कळत नाही. आणि या गोष्टी सांगूनही काही उपयोग नसतो. ज्याचं त्यालाच कळतं आणि वेळ यावी लागते. आपण स्वतःपुरतं नीट वागावं."

बहुतेक सगळं समीरच्या डोक्यावरून गेलं, पण आजोबांच्या आश्वासक आणि कधी नव्हे ते गंभीर झालेल्या चेहर्‍यामुळे त्याला खूप काहीतरी वाटलं. त्याला कळलं ते एवढंच की देव हा आपला फ्रेंड असतो. आणि त्याला घाबरून रहायची अजिबात गरज नसते. त्याच्या मनात आईबरोबर देवदर्शनाला जायचा तो काही विरोध होता तो कमी झाला आणि थोडीशी उत्सुकताही लागून राहिली.

***

गावाला जायचा दिवस उजाडला आणि भल्या पहाटे मंडळी निघाली. शहराच्या बाहेर गाडी आली आणि समीर शलाका इंड्याची कंट्रीसाईड बघत राहिले. पावसाळ्याचे दिवस असल्याने बर्‍या पैकी हिरवाई होती सगळीकडे. घाट वगैरे बघून तर पोरांनी गाड्या थांबवल्याच. आजूबाजूला उंडारून झालं आणि आईचा चेहरा हळूहळू विशिष्ट मोडमधे जायला लागला म्हणून मग परत गाडीत येऊन बसले.

दुपारी गाव आलं तो पर्यंत ड्रायव्हर सोडून बाकी सगळे घोरत डुलत होते. गाडी गावात शिरली आणि एक दोन ब्रेक कच्चकन लागल्यानंतर मंडळी उठून बसली. गावात स्वतःच घर असं नव्हतंच. आजोबांच्या आजोबांनी गाव सोडलेलं... आडनावात गावाचं नाव असलं तरी गावात लॉजमधे रहायची पाळी होती. काकांनी गाडी बरोब्बर नेहमीच्या ठरलेल्या लॉजपर्यंत नीट आणली. बुकिंगवगैरे आधीच झालं होतं. सगळे आत घुसले. खोल्यांचा ताबा घेतला आणि ताजे तवाने झाले.

सगळे कुळाचार, अभिषेक वगैरे दुसर्‍या दिवशी करायचे. त्यामुळे आजचा दिवस तसा रिकामाच. जेवण वगैरे झाल्यावर, दर्शनाला जायचा बेत ठरला. देवस्थान तसं आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध. बर्‍याच लांबलांबून लोक यायचे. दर्शनाला बर्‍यापैकी गर्दी होती. रांग बरीच लांब गेली होती. समीरला खरं तर त्या रांगेत उभं रहायचं जीवावर आलं. पण उगाच आईला अजून त्रास नको म्हणून तो निमूटपणे रांगेत उभा राहिला.

"आजोबा, ते टेंपलच्या वर पॉइंटेड असं स्ट्रक्चर आहे ना..."

"त्याला कळस म्हणतात बरं का..."

"हां हां तेच आजोबा, त्याच्यावरची डिझाईन्स किती छान आहेत. आणि कलर पण एकदम ब्राईट आहे. आय लाइक्ड दॅट."

"अरे जेव्हा इथे यात्रा असते ना तेव्हा दर्शनाची रांग इतकी मोठी असते की बर्‍याच लोकांना वेळ नसल्याने दर्शन मिळतच नाही. मग ते लांबूनच कळसाला नमस्कार करतात आणि परत जातात."

"का? कळसाला नमस्कार का? नमस्कार तर देवाला करतात ना?"

"समीर, नमस्कार हा खरा मनापासून असेल ना तर करायची पण गरज नसते. तो आपोआप घडतो. मुद्दाम करावा लागत नाही. ती एक भावना आहे. आपण हात जोडून त्याला मूर्त रूप देतो. पण मूर्त रूप देण्यामुळेच तो पूर्ण होतो असे नाही. ज्या क्षणी तो करायची इच्छा मनात होते त्याच क्षणी तो पोचलेला असतो. पण देवाचं दर्शन नाही तर नाही, त्याचं प्रतिक म्हणून कळसाला नमस्कार करायची पद्धत आहे आपल्याकडे. आणि देव काय फक्त देवळात असतो का? कोणतंही सत्कृत्य करताना ते देवत्व आपल्यातच असतं. फक्त त्याचं अस्तित्व सतत जाणवावं म्हणून हा सगळ खटाटोप, कर्मकांडं वगैरे."

समीर ऐकत होता. हा असा अजिबात फॉर्मॅलिटी नसलेला देव त्याला आवडत होता. आईसारखं घाबरून वगैरे नमस्कार करण्यापेक्षा हे बरं. त्याने एक ठरवलं, आत जाऊन देवासमोर उभं रहायचं आणि त्यावेळी वाटलं तरच नमस्कार करायचा. कोणालाही जुमानायचं नाही. आईलासुद्धा.

बराच वेळ झाला, रांग हळूहळू पुढे सरकत होती. समीरला मनापासून कंटाळा आला होता. प्रवास आणि इतका वेळ उभं राहिल्याने त्याचे पाय सॉलिड दुखायला लागले होते. कधी या पायावर तर कधी त्या पायावर भार देत तो उभा होता. पण एका क्षणी त्याचा पेशंस संपला आणि तो सरळ रांगेच्या बाहेर पडला.

"अरे काय झालं? आणि कुठे चाललास? जास्त लांब जाऊ नकोस. पटकन ये परत." नंदिता म्हणाली.

"आयॅम बोअर्ड, मॉम. मी जाऊन गाडीत बसतो. यु गाय्ज गो अहेड अँड फिनिश धिस बिझिनेस."

"आणि दर्शन रे?"

"बघू. त्यालाही वाटत असेल तर भेटेल तो मला. काय आजोबा?" ... परत आजोबांचं तेच गंमतीशीर हसू. समीरचा हुरूप वाढला. तो निघालाच.

मागनं आई ओरडत राहिली, पण आजोबांनी जे सांगितलेलं होतं त्याचा विचार करत समीर सरळ तिथून निघून आला. तंद्रीतच तो गाडीजवळ आला. तेवढ्यात त्याला जाणवलं की कोणीतरी त्याला काहीतरी सांगत आहे. त्याने त्या दिशेने नजर फिरवली आणि एकदम दचकलाच तो.

भारतात येऊन आठ दहा दिवस झाले असले तरी त्याचे डोळे, मन अजून इतक्या दैन्याला सरावले नव्हते. गाडीच्या मागच्या बाजूला एका कोपर्‍यात एक म्हातारा बसला होता. अगदी थकलेला, गलित गात्र झालेला. अंगावरचे कपडेही अगदीच साधे, साधे कसले फाटकेच. बाजूला एक म्हातारी. ती पण तशीच. दोघांची नजर अधू. जवळ काठी. त्या काठीला लावलेली भगवी पताका.

"पोरा, कालधरनं चालतोया आम्ही दोगं. आज पोचलो हितं. दर्सन काय हुईना रं... पोटात भुकेचा डोंब उठलाय बग. येवडा येळ लागंल आसं वाटलं न्हवतं... बरूबर काय बी नाय बग खायला. आता दम धरवत नाही म्हणून भीक मागतुया. म्हातारपण वाईट बघ... आमाला भिकारी समजून हाटेलवाला पण काही दीना रं... पोरा, काही तरी दे बाबा पोटाला."

समीरला काहीच कळलं नाही. गावाकडची भाषा त्याला कळलीच नाही. पण त्या म्हातार्‍याच्या नजरेतले भाव त्याला व्याकुळ करून गेले. म्हातार्‍याने पोटावरून हात फिरवलेला त्याला कळला आणि त्याला अंदाज आला की हा खायला मागतो आहे. तो पटकन गाडीत शिरला. आजीने मागच्या बाजूला फराळाचा डबा ठेवलेला होता तो त्याला दिसला. त्याने आख्खा डबा त्या म्हातारा म्हातारीच्या समोर ठेवला. दोघांनी अगदी थोडं खाल्लं आणि ढेकर दिली.

"आजोबा, अजून खा ना. आम्ही खूप स्नॅक्स आणले आहेत बरोबर."

"लेकरा, आजोबा म्हन्लास, बरं वाटलं. हाटेलवाला भिकारी म्हन्ला आन तू आजोबा म्हन्तूस. चांगल्या घरचा दिसतूस. द्येव तुजं भलं करंल रं बाबा. म्हातारा म्हातारी किती खानार आमी? बास झालं. प्वॉट भरलं आन मन बी."

दोघं उठले, समीरने हात दिला. तिथून जायच्या आधी म्हातारीने समीरच्या केसांमधून हात फिरवला. स्पर्शाची भाषा समीरला समजावून सांगावी लागली नाही. आतून अर्थ आला. नकळत समीर वाकला आणि त्याने दोघांना नमस्कार केला. म्हातारा म्हातारी चालू पडली... समीर काही तरी वेगळ्याच तृप्तीच्या तंद्रीत हरवला... तेवढ्यात त्याचं लक्ष एकदम देवळाच्या कळसाकडे गेलं... त्याचा एक हात आपोआप उंचावला. तंद्रीतच तो म्हणाला,

"अ‍ॅट लास्ट वी मेट, डूड, अ‍ॅट लास्ट..."

हे सगळं लांबून बघत असलेल्या आजोबांच्या चेहर्‍यावर मात्र गंमतीशीर हसू नव्हतं... त्यांनी हळूच तोंड दुसरीकडे करून पटकन डोळे टिपले. आणि मग परत तेच गंमतीशीर प्रसन्न हसू त्यांच्या चेहर्‍यावर परत आलं.

ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽ

on गुरुवार, जुलै २२, २०१०

माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची. मग आमची वरात निघायची तिच्यामागे. खरं तर मलाही तिच्याबरोबर विठोबाच्या देवळात जायला आवडायचं. बाकीच्या देवळांमधून अंगारा किंवा कुंकू लावायचे तिथले पुजारी. पण एकादशीला विठोबाच्या देवळात गेलं की तिथले बुवा काळा काळा बुक्का लावायचे कपाळाला. आणि अगदी तालासुरात तिथे किर्तन चालू असायचं. ते मोहमयी वातावरण अनुभवत तासचेतास तिथे काढलेले आठवत आहे.

आमच्या घरी वातावरण धार्मिक असलं तरी कर्मकांडांचं स्तोम किंवा कसलीच बळजबरी नव्हती. पण साबुदाण्याची खिचडी, किंबहुना उपासाचे सगळेच पदार्थ आवडत असल्याने एकादश्या आणि चतुर्थ्या कधी येतात त्या आम्हाला बरोब्बर माहिती असायचं. एखादे वेळेस आजी विसरली तर आम्ही आठवण करून द्यायचो. पण खरी वाट बघायची ती आषाढी एकादशीची. त्या दिवशी घरात अगदी कंपल्सरी उपास असायचा. अगदी स्वर्गिय चंगळ असायची.

अशीच एक एकादशी येऊ घातली होती. मी साधारण साताठ वर्षांचा असेन. आजीच्या बोलण्यात पालखी शब्द दोन तीन वेळेला आला. मला पालखी म्हणजे साधारणसे माहित होते. पूर्वीच्या काळी राजेमहाराजे पालखीत बसत आणि त्यांचे नोकर त्या पालख्या खांद्यावर उचलून त्यांना इकडे तिकडे फिरवत. पण आजीच्या बोलण्यात काही वेगळेच संदर्भ येत होते. वारी, पालखी, पंढरपूर वगैरे. काही तरी धार्मिक संदर्भात बोलणे चालले होते हे नक्की. शेवटी आजीला विचारले तेव्हा मला ही एकंदर चालत वगैरे पंढरपूरला जायची पद्धत कळली होती. आळंदीहून ज्ञानोबाची आणि देहूतून तुकोबाची पालखी निघते आणि मजल दरमजल करत आषाढीच्या बेतास पंढरीत पोचतात. गावोगावाहून अशाच दिंड्या निघतात. लोक दिवसचे दिवस चालत पंढरीला जातात. असं सगळं तिने मला अगदी रंगवून सांगितलं. मला तर हे सगळं अगदी अद्भुतच वाटायला लागलं होतं. पण खरी गंमत अजून पुढेच होती. ती अशी...

आमच्या घराण्याचा आणि या पंढरीच्या वारीचा अगदी गाढ आणि प्राचीन संबंध आहे. आम्ही 'कार्यकर्ते' सगळे सोलापूर जवळच्या कुर्डूवाडीचे. खरं तर कुर्डूचेच म्हणले पाहिजे. कुर्डूवाडी हे स्टेशन आहे. आणि तिथून साधारण ३-४ मैलांवर कुर्डू गाव आहे. गावात कार्यकर्त्यांची बरीच घरं आहेत. काही नांदती तर काही ओसाड. आमचे घर त्या ओसाड क्याटेगरीत. आमच्या पणजोबांपासून गाव सुटले ते परत कोणीच गेले नाही त्या वाड्यात. पण दर चार वर्षांनी तो वाडा अगदी जुजबी डागडुजी होऊन का होईना पण उभा राहतो. आमच्या घरातली मंडळी, अगदी चुलत, आत्ते, मामे सगळं गणगोत... तिथं जमतात. चार दिवस वाडा गजबजतो आणि परत शांत होऊन पडून राहतो.

प्रसंग असतो, संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या पालखीच्या आगमनाचा.

आमच्या कार्यकर्त्यांच्या भावकीत आता बर्‍याच शाखा उपशाखा झाल्या आहेत. पण चार मुख्या शाखा आहेत. आणि पालखीच्या स्वागताची आणि मुक्कामातील सर्व व्यवस्थेची जबाबदारी दर चार वर्षांनी आमच्या घरात असते. आमचे घर म्हणजे, आमच्या (बहुधा) खापर पणजोबांचे वंशज. पालखीचं वर्ष म्हणजे सगळ्या नातेवाई़कांनी एकत्र येण्याचं वर्ष. कधी मधी भेटणार्‍या आज्या, आजोबा, काका, मामा, भावंडं यांच्याबरोबर दोन दिवस घालवायचं वर्ष.

हे सगळं मला कळलं तेव्हा बहुधा माझ्या जन्मानंतरची दुसरी पालखी असावी आमच्या घरातली. तेव्हा काही जाणं झालं नाही. पण नंतर १२ वर्षांचा असताना मात्र अगदी झाडून सगळे गोळा झाले होते. तेहा हा पालखी सोहळा पहिल्यांदा बघितला. त्यानंतरही जमेल तसे जमेल तितके लोक पालखीला जातात. माझे काही काका आमचं पालखीचं वर्ष नसलं तरी मदतीला वगैरे म्हणून जातात. मला नाही जमत. पण २००८ साली पालखी आमच्या कडे होती तेव्हा ठरवलंच होतं की या खेपेस पोरींना घेऊन जायचंच जायचं. ज्या वयात मला या सगळ्याचं अप्रूप वाटत होतं त्या वयात आता माझ्या पोरी आहेत. ती सगळी गंमत त्यांना दाखवायचीच. चुलत भाऊ तर पार अमेरिकेतून येणार होता. सगळेच जण असेच कुठून कुठून येणार होते.

पालखी आमच्या कुर्डूला पंचमी किंवा षष्ठीला येते. पण आमची तयारी मात्र बरेच दिवस आधीच सुरू होते. आता आमचं घर असं तिथे नसल्यामुळे सगळंच सामान जमवण्यापासून सुरूवात असते. आमचे काही ज्येष्ठ काका / काकू वगैरे खरंच उत्साही आहेत. दहा बारा दिवस आधी जाऊन वाड्याची साफसफाई करून घेणे, धान्य भरून ठेवणे, येणार्‍या लोकांच्या रहण्याची व्यवस्था करणे वगैरे कामे अगदी नीट प्लॅनिंग करून पार पडतात. हळूहळू लोक जमायला लागतात आणि वाडा तात्पुरता का होईना परत नांदता होतो.



मोठमोठ्या चुलींवर तेवढीच मोठी पातेली दिसायला लागतात. गप्पांचे फड रंगतात. चहाच्या फेर्‍यांवर फेर्‍या होतात. एखादी आजी आमच्या सोलापूरची खास शेंगादाण्याची (नॉन-सोलापुरी लोक शेंगदाण्याची चटणी म्हणतात, पण सोलापूरात मात्र शेंगादाण्याचीच चटणी म्हणतात. :) ) चटणी बनवते आणि जास्तीत जास्त दोन दिवसात तिचा फडशा पडतो.

... आणि बघता बघता पालखीच्या आगमनाचा दिवस येऊन ठेपतो.

पालखी किंवा एकंदरीतच वारी हा प्रकार अगदी जबरदस्त शिस्तशीर आणि अगदी अचूक व्यवस्थापन असलेला असतो. पालखी यायच्या आदल्या दिवशी पालखीच्या व्यवस्थापकांकडून आगाऊ निरोप येतो. त्याही बरेच आधी पालखी नक्की पंचमीला येणार की षष्ठीला येणार ते पण कळवलेले असते. तर आदल्या दिवशी पालखी साधारण किती वाजेपर्यंत येईल, किती माणसं आहेत वगैरे तपशील कळवले जातात. त्याप्रमाणे सगळी तयारी घेतली जाते. आमच्या तिकडे जोडगहू म्हणून गव्हाचा एक प्रकार आहे. पालखीला त्या जोडगव्हाच्या खिरीचा नैवेद्य असतो. ते ठरलेलेच आहे.पण इतक्या लोकांसाठी खीर करायची, ती पण गुळाची हे एक अवघड कामच असते. वाड्याच्या परसात एक भलं मोठं चुलाण तयार करून त्यावर एक अजस्त्र कढई चढवली जाते. खीर पूर्ण पणे तयार व्हायला साधारण पाच सहा तास तरी लागतात. तो पर्यंत ते सगळं मिश्रण सतत ढवळत रहावं लागतं. खूप ताकद लागते. शिवाय हा सगळा स्वयंपाक सोवळ्यात असतो. तीन चार काका लोक यात तज्ञ आहेत त्यांची ड्युटी तीच. शिवाय भावकीतले अजून काही जाणते लोक मदत करू लागतात. एवढ्या सगळ्या लोकांच्या मेहनतीवर ती खीर एकदाची तयार होते.

मग वाट बघणे सुरू होते. सुवासिनी नटतात. बाप्ये लोक ठेवणीतले कपडे घालून उगाच इकडे तिकडे करत असतात. पोरांना हे गाव, वाडा वगैरे सगळं अगदी परिकथेतल्या अद्भुत जगासारखंच वाटत असतं त्यामुळे त्यांचे काही काही उद्योग चाललेले असतात. आजोबा वगैरे दारासमोरच्या मंडपात बसून गपांचे गुर्‍हाळ घालतात. आज्या घरातल्या सुनांचे विश्लेषण करत बसतात. पण हे सगळे वरवरचे. अगदी आतून कधी एकदा पालखी येते आहे याचीच घालमेल चालू असते सगळ्यांच्या मनात.

साधारण सहा सात वाजता सांगावा येतो, पालखी यायलीय हो... एकच गोंधळ होतो. सगळे जण गावाच्या वेशीकडे जायला निघतात. पालखीच्या स्वागताचा मान कार्यकर्त्यांचा. आमच्या घरातले सर्वात मोठे आजोबा नाहीतर काका पालखीला सामोरे जातात. घरातल्या सवाष्ण्या पालखीला पंचारती करतात. पालखीचा थाट तर काय विचारावा. चांदीचा पत्रा लावलेली, त्यात मधोमध नाथांच्या पादुका विराजमान, अशी ती पालखी अगदी भालदार चोपदार आणि छत्रचामरांच्या समवेत दिमाखात येत असते. तुतार्‍या शिंगं फुंकली जातात. एकच कल्लोळ.

पण मला आजही आठवते आहे, अगदी लख्ख आठवते आहे, मी पहिल्यांदा हा सोहळा बघितला तेव्हा मला अगदी खोलवर स्पर्शून गेलं होतं ते हे वैभव थाटमाट नव्हे, तर पालखीच्या संगतीनं चालणारे साधे सुधे वारकरी. टाळांच्या गजरात, मुखाने भजन किर्तन हरिनाम गात अगदी तल्लीन झालेले वारकरी. डोक्यावर तुळशी घेतलेल्या बाया, गळ्यात जाड जाड टाळ मिरवणारे बाप्ये, अंगावर अगदी साधे मळके, क्वचित फाटके कपडे असलेले वारकरी. त्या दिवशी भरपूर पाऊस पडून गेला होता. गावातले मातीचे रस्ते. घोटा आत जाईल एवढा चिखल. पाय रूतत होते. पण त्या सगळ्या पासून खूप दूर, नाथांच्या मानसिक सान्निध्यात देहभान हरपलेले वारकरी. आयुष्यात बरंच काही विसरलो / विसरेन, पण तो क्षण, जेव्हा मला या वारकर्‍यांचं पहिल्यांदा एवढं जवळून दर्शन झालं तो क्षण, मात्र मी मरेपर्यंत विसरणंच शक्य नाही. मला जेव्हा भान आलं तेव्हा मी त्या तालावर पावली घालत असल्याचं माझ्या लक्षात आलं. आजही ते आठवलं की अंगावर रोमांच येतात.

इकडे पालखीला खांदा द्यायला एकच धावपळ होते. प्रत्येकालाच ते भाग्य हवं असतं. पालखीच्या मार्गावर पायघड्या घालत असतात. ती लांबच्या लांब कापडं इतकी शिताफीने बदलली जातात की बघत रहावं. पालखी कुठंही अडत नाही. पालखी हळू हळू मार्ग काढत नागनाथाच्या, कुर्डूच्या ग्रामदैवताच्या देवळात मुक्कामी पोचते. पालखी बरोबर पैठणच्या संस्थानाचे लोक आणि नाथांचे वंशज वगैरे मानकरी असतात. त्यांची व्यवस्था अगदी उत्तम केलेली असते. पालखीच्या बरोबरच्या सगळ्याच वारकर्‍यांची कुठे ना कुठे सोय ठरलेली असते. मुक्कामाला आल्यावर पालखी खाली उतरवली जाते आणि नाथांच्या पादुका बाहेर काढून त्या एका चौरंगावर ठेवल्या जातात.



आता सुरू होतो तो पूजेचा सोहळा. आमच्याच घरातल्या एखादं जोडपं, सहसा मधल्या चार वर्षात लग्न झालेलं जोडपं यजमान म्हणून बसतं पूजेला. अगदी षोडषोपचार पूजा होते. चांगली एक दोन तास चालते. सगळ्यांना मनसोक्त दर्शन घडतं.



नाथांची थोरवी आठवत, त्यांच्या आयुष्यातल्या घटना आठवत, तसं वागायचा प्रयत्न करायचा संकल्प करत नाथांच्या चरणी डोकं ठेवलं जातं. पादुका तर केवळ संकेतस्वरूप. जो पर्यंत संतांच्या जीवनातून आपण शिकत नाही तो पर्यंत तो नमस्कार नुसताच त्या पादुका नामक धातूच्या अथवा लाकडी वस्तूला असतो. त्या वस्तूची तेवढीच किंमत.

आता मात्र खूप उशिर झालेला असतो, आणि लोकांना परत सकाळी लवकर उठून पुढच्या मुक्कामाकडे जायचं असतं. घरातली ज्येष्ठ मंडळी, काका काकू वगैरे, नाथांचे उत्तराधिकारी जिथे मुक्कामाला असतात तिथे त्यांना जातीने जेवायला बोलावणं करायला जातात. तिथे परत थोड्या गप्पा होतात. विचारपूस होते. वर्षभराने भेटी होत असतात. जुने जाणते ख्याली खुशाली विचारतात एकमेकांची. उत्तराधिकार्‍यांच्या पत्नीच्या हातून कुंकू लावून घ्यायला सवाष्ण्या झुंबड करतात. लेकरांना त्यांच्या पायावर घातलं जातं. इतकं दमून आल्यावरही उत्तराधिकारी आणि त्यांच्या पत्नी शांतपणे आणि हसतमुखाने हे सगळं कौतुक करत असतात, करून घेत असतात. एकदाची मंडळी हलतात आणि आमच्या दारासमोरच्या मांडवात खाशी पंगत बसते. प्रत्येक वारकर्‍याचे जेवणाचे घर ठरलेले असते. मुख्य मंडळी आणि मानकरी आमच्याकडे असतात. गावातली प्रतिष्ठित आणि इतर पदाधिकारी मंडळी पण या मानाच्या पंगतीत सामिल असतात. आग्रह कर करून खीर वाढली जाते. खास पोळीचा बेत असतो. अजूनही तिकडे गव्हाची पोळी म्हणजे सण, एरवी भाकरी. जेवणं उरकतात. उशिर बराच झालेला असतो. सगळी आवरासावर करूण मग घरचे लोक जेवायला बसतात. पालखीचा मुख्य ताण गेलेला असतो. पण अजून सकाळचा निरोप समारंभ बाकीच असतो. म्हणून निजानिज लवकर होते.

भल्या पहाटे सूर्योदयाच्या सुमारास पालखी परत सज्ज झालेली असते. गावकरी परत एकदा पालखी भोवती जमतात. सवाष्णी नाथांना ओवाळतात. पालखीच्या मानकर्‍यांच्या बरोबर असलेल्या सवाष्ण्यांची खणानारळाने ओटी भरली जाते. इशारा होतो आणि पालखी झटदिशी परत एकदा भोयांच्या खांद्यावर अदबशीर तोलली जाते आणि पुढच्या गावची वाट धरते. गावकरी चार पावलं पुढे जाऊन सोबत करतात आणि मग मागे फिरतात. वारकर्‍यांच्या पावलाखालची माती कपाळाला लावत, पालखी गेली त्या दिशेने नमस्कार करत सगळे परत घराकडे परततात.

दर चार वर्षांनी उपभोगायला मिळणारा सोहळा संपलेला असतो. कोणतंही गडबडीचं मंगलकार्य उरकल्यावर येतो तसा एक निवांतपणा, तो कंटाळवाणा नसतो, पण अगदी शांत निवांत वाटत असतं असा, सगळीकडे पसरलेला असतो. आवराआवरी सुरू होते. कधी तरी चार वर्षांनी गाव बघितलेले आम्ही आणि आमची पोरं गावाजवळ आमचं शेत आहे तिथे जायला उत्सुक असतो. पालखीच्या नंतरचा दिवस शेतात घालवायचा हे ही ठरलेलं असतं. सगळं काही साग्रसंगीत होतं.



आणि संध्याकाळ होते. बहुतेक लोक त्याच दिवशी निघतात. नोकर्‍या, पोरांच्या शाळा असतात. जड पावलाने सगळे निघतात. पाया पडणं वगैरे सुरू होतं. म्हातारे कोतारे पोरांना लाडाने जवळ घेतात आणि पोरं तिथून सुटायला धडपडतात. मी पण सगळ्या आजी आजोबा काका काकू समोर वाकतो. मागच्याच पालखीच्या वेळी, माझ्या आजोबांच्या पिढीतले शेवटचे आजोबा, बाबांचे काका अगदी व्यवस्थित तब्येत असूनही निघताना नमस्काराच्य वेळी बाबांना अगदी अचानक म्हणाले होते, "ही माझी शेवटची पालखी." आणि थोड्याच दिवसात ते गेले. ते सगळे काळजात अगदी रूतलेले असते. न रेंगाळता तिथून काढता पाय घेतो, गाड्या निघतात.

रस्त्यात सगळीकडे वारकरीच दिसत असतात. लहान रस्त्यावर गाडीसमोर अचानक एक अशीच छोटीशी दिंडी येते... त्यांना वाट करून द्यायला म्हणून गाडी बाजूला लावतो. दिंडीतले वारकरी माझ्याकडे बघून म्हणतात,

"ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽऽ...."

मी पुढचं बोलायच्या आतच माझी मुलगी नवीनच शिकलेलं ... "हाऽऽऽरी विठ्ठल" म्हणते. मी चमकतो. पण त्याच क्षणी, कार्यकर्त्यांच्या घरात पालखीची सेवा करायला पुढची पिढी तयार होते आहे या समाधानात गाडी परत गियर मधे टाकतो आणि पुढच्या पालखीपर्यंत परत ऐहिक जगात परत येतो.

***

मनोगत: परवा मीमराठीवर प्रसन्नने (पुणेरी) वारी वगैरे वर लिहिलेले वाचले आणि बर्‍याच दिवसांपासून आमच्या गावच्या पालखीवर लिहायचे मनात होते ते परत वर आले. राजे म्हणाला की नुसता प्रतिसाद देण्यापेक्षा एखादा वेगळा लेखच टाका म्हणून खास त्याच्या विनंतीला मान देऊन हे लिहायचा प्रयत्न केला आहे.

&%^$@# !!!

on गुरुवार, फेब्रुवारी २५, २०१०

दचकायला काय झालं? .... ते शीर्षक तसंच आहे.... &%^$@# !!!

चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलंच असेल... &%^$@# !!! म्हणजे काय ते. ज्यांच्या आलं नसेल त्यांच्या लवकरच येईल. :)

तर झालं काय... नुकताच सौदी अरेबियामधे जाण्याचा योग आला होता. दिवसभर कस्टमरकडे राबराबून मी माझ्या एक दोन सहकार्‍यांबरोबर गेस्टहाउसकडे परत चाललो होतो. ऑफिसमधून बाहेर आलो आणि टॅक्सीला हात केला. टॅक्सी थांबली. आखाती देशात सहसा टॅक्सीवाले पाकिस्तानी किंवा भारतियच असतात. तसे असले तर गप्पा मारत प्रवास होतो. पण त्या दिवशीचा टॅक्सीवाला नेमका येमेनी होता... टॅक्सी सुरू झाली. गडी भलताच गप्पिष्ट होता. त्याची अखंड बडबड सुरू झाली. त्याचं अस्खलित आणि माझं मोडकं अरबी... पण बोलणे भाग होते. रियाधमधला अगाध ट्रॅफिक... प्रचंड मोठ्या हायवे वरून ताशी १००+ किमीच्या वेगाने खेळलेल्या आट्यापाट्या, खोखो, हुतूतू वगैरे प्रकारांमुळे हार्ट अ‍ॅटॅक येऊ न द्यायचा असेल तर मन असं गुंतवणं भागच असतं.

माझ्या बरोबर माझा आयुष्यात पहिल्यांदाच भारताबाहेर, ते सुद्धा थेट सौदी अरेबियामधे आलेला एक सहकारी होता. तिथल्या एकंदरीत कडक नियम / शिक्षा वगैरे बद्दल त्याचं इंडक्शन भारतातच झालं होतं. तो अगदी गप्प गप्प असायचा... न जाणो आपण हिंदीत का होईना पण काही चुकीचं बोललो तर लफडं व्हायचं उगाच... म्हणून तो कायम गप्प. पण आमच्या गप्पा चालू झाल्यावर त्याला पण मूड आला.

ड्रायव्हरसाहेब अगदी दिलखुलास माणूस निघाले. त्यांचं बोलणं अगदी धबाधबा. रस्त्यावरील इतर ड्रायव्हरांबद्दलचा त्यांचा आदर आणि प्रेमभाव अगदी ओसंडून वाहत होता. तेवढ्यात एका गाडीने आमच्या गाडीला अगदी सराईत कट मारत ओव्हरटेक केले. झाले... पुढची पाच मिनिटे आमच्या टॅक्सीत नुसता कल्ला झाला... मला अरबी फारसे येत नाही पण त्या पाच मिनिटात त्या दुसर्‍या चालकाच्या कोणकोणत्या नातेवाईकांची आणि अवयवांची आठवण निघाली होती हे कळण्याइतपत नक्कीच कळते.

गडबड शांत झाल्यावर माझा सहकारी हळूच विचारता झाला.

'काय झालं?'

'काही नाही रे... घाबरू नकोस. तो अगदी नॉर्मल आहे.'

'पण तो असा अचानक चिडला का?'

'अरे, त्या दुसर्‍या गाडीने आपल्याला ओव्हरटेक केले ना... म्हणून हा जरा स्वतःला मोकळा करत होता.'

'काय बोलला तो?'

'*&^%$@# !!! असं म्हणाला तो'

'म्हणजे? शिव्या दिल्या त्याने? त्या पण असल्या? आणि इतकं चिडून?'

'हो. सहसा शिव्या अशाच देतात. आणि असल्याच देतात.'

माझा मित्र दोन मिनिटं विचारात पडला आणि मग हळूच मला म्हणाला...

'सर, इथे शिव्या देणं अलाऊड आहे?'

'!.!.!.!.!' ... मी स्पीचलेस. अगदी नि:शब्द वगैरे.

शक्य असतं तर मी त्याला 'अलाऊड आहे' हे डेमो देऊन सांगितलं असतं इतका वैतागलो मी. अरे सौदी अरेबिया झालं म्हणून काय झालं? मानवाच्या जन्मसिद्ध अधिकारात मोडणार्‍या 'शिव्या देणे' या प्रकाराबद्दल एवढं अज्ञान? मी त्याला नीट समजवलं... अर्थात शिव्या न देता. खूप कंट्रोल केलं तेव्हा मी स्वतःला.

खरं म्हणजे शिव्या हा मानवतेला लाभलेला आणि पुढे नेणारा एक अनमोल ठेवा आहे. जरा विचार करा...

तुम्ही अश्याच एखाद्या प्रसंगात सापडला आहात. कॉलेज लाईफ मधला पहिलाच रोझ डे... (आपापल्या प्रेफरंसप्रमाणे) आवडती व्यक्ती समोरून येत आहे. तुमच्या हातात गुलाब. ती व्यक्ती जवळ यायची वाट बघत तुम्ही अगदी उत्कंठेच्या टोकावर उभे. ती व्यक्ती जवळ येते... तुम्ही गुलाब पुढे करणार एवढ्यात..... दुसराच कोणी तरी येतो... आख्खा रेडरोझचा गुच्छच्यागुच्छ त्या व्यक्तीला देतो... ती व्यक्तीपण तो गुच्छ अगदी हसून आणि लाजून वगैरे स्वीकारते... तुमचा पत्ता कट झालाय तुमच्या लक्षात येतं... आणि... आता जस्ट विचार करा हं... शिव्या हा प्रकार अस्तित्वातच नसता समजा, तर तुम्ही नक्कीच त्या नको तिथे नको तेव्हा कडमडणार्‍याचा खून केला असता. पण तसं होत नाही (बहुतेक वेळा तरी... टार्‍याची ग्यारंटी नाही... ). तुम्ही चरफडता, हात (एकमेकांवर) चोळता... एक शंभरेक शिव्यांची लड लावता आणि गुलाबासाठी दुसरं एखादं डेस्टिनेशन शोधायला चालू पडता... थोडक्यात काय तर... यु मूव्ह ऑन. खलास. सिंपल. विषय संपला.

हेच नेमकं शिव्यांचं महत्व आहे.

माणसाच्या मनातल्या भावनांचा निचरा न होणं हे मनोविकाराचं एक प्रमुख कारण आहे. प्रत्येक वेळी तो निचरा आपल्याला पाहिजे तसा नाही होऊ शकत. आपण समाजात राहतो. समाजाची काही एक चौकट असते. त्या चौकटी बाहेर पडणं कधी कधी खरंच हितावह नसतं आणि कधी कधी आपल्यात तेवढा दम नसतो. तिथे शिव्या कामी येतात. व्यक्त किंवा अव्यक्त म्हणजेच उघड नाहीतर मनातल्या मनात तरी आपण चार शिव्या हासडतो (हासडलेल्या शिव्या दिलेल्या शिव्यांपेक्षा अधिक फायदेशीर आणि गुणकारी असतात) आणि भावना तुंबू देत नाही. शिव्या अनादी आहेत. शिव्या अनंत आहेत. प्राण्यांना स्वत्वाची भावना नसते असं म्हणतात. पण जेव्हा पासून मानवाला उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव झाली तेव्हा पासून 'व्यक्त होणे' ही एक फार मोठी, किंबहुना सगळ्यात मोठी भावनिक गरज बनली. भाषा वगैरे नंतर बनल्या पण शिव्या मात्र त्या आधीही असणारच. शिव्या भाषेवर अवलंबून नाहीत. शिव्यांची एक स्वतंत्र भाषा आहे. मौखिक भाषा त्यात दुय्यम आहे, नसली तरी चालावी अशी. नाही तर एखाद्या मुक्या माणसाची पंचाईत. पण असे असले तरी, शिव्या या कोणत्याही भाषेच्या अगदी मूळ वैशिष्ट्यांपैकी असतात. सर रिचर्ड बर्टनला बर्‍याच भाषा यायच्या. तो जिथे जाईल तिथली भाषा शिकायचा. अगदी पारंगत होत असे तो. तो म्हणतो, "कोणतीही भाषा शिकायची युक्ती म्हणजे सर्वप्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकायच्या. बाकीची भाषा आपोआप येईल."

शिव्या मुख्यत्वे जरी त्या देणार्‍याच्या मानसिक समाधानासाठी असल्या तरी बरेच वेळा त्या ज्याला दिल्या जातात त्याच्यापर्यंत पोचल्या तर त्यातले समाधान द्विगुणित होते. म्हणजे, एखाद्या बाईने लाखो रूपयाचे दागिने घालायचे आणि घरात दारं खिडक्या बंद करून अंधार्‍या खोलीत कोंडून घ्यायचे. मग कशाला घालायचे ते दागिने? तसेच जर का शिव्या दिलेल्या पोचल्या नाहीत तर मजा किरकिरा व्हायचा संभव असतो. यासाठी देहबोली अतिशय आवश्यक असते. शिव्या देतानाचा आवेश / मुद्रा / हातवारे बरोब्बर जमले पाहिजे. शब्दांवरचे आघात जमले पाहिजेत. त्यामुळे, कधी कधी अगदी साध्या साध्या शिव्या पण खूप इफेक्टिव्ह बनतात. अन्यथा अगदी घणाघाती शिवी पण मिळमिळीत होऊ शकते. तो इफेक्टच महत्वाचा असतो. अशी एक नीट दिलेली शिवी कमीतकमी हजारवेळा तरी कानफटवण्याच्या बरोबरीची असते.

शिव्यांचेही बरेच प्रकार असतात. काही शिव्या शारिरीक संदर्भात असतात. यामधे अवयवांचे संदर्भ अथवा एखाद्या शारिरीक व्यंगाचा संदर्भ इत्यादी येते. काही शिव्या नातेसंबंधांवर आधारलेल्या असतात. तर काही शिव्या प्राणीजगताशी संबंधित असतात. धार्मिकतेच्या संदर्भाने पण शिव्या दिल्या जाऊ शकतात. या प्रकारच्या शिव्या जरा जास्तच खोल जखम करतात. कित्येक वेळा शिव्या या केवळ 'दूषण' न राहता 'शाप' या सबकॅटेगरी मधे पोचतात. अशा शिव्या, शिव्या दिल्याजाणार्‍या व्यक्तीच्या भविष्याकाळातील अवस्थेबद्दल अघोरी भाष्य करतात. काहीही असले तरी समोरच्याला व्यथित करणे हा उद्देश सफल करण्याच्या दृष्टीनेच सगळ्या कृती होत असतात.

भारताच्या संदर्भात बोलायचे तर जातीवरून दिलेल्या शिव्या अतिशय तीव्र असतात. इतक्या की केवळ या प्रकारच्या शिव्यांबद्दल एक कायदाच अस्तित्वात आला. भारतातील जातिय व्यवस्थेचा नृशंस इतिहास याला कारणीभूत आहे. एखाद्या माणसाला जातिवाचक शिवी देताना ती शिवी ज्याला दिली जात आहे त्याला त्या शब्दामागे हजारो वर्षांचा अन्याय एकवटल्याची जाणिव होत असते आणि म्हणून तो एखादा शब्द खोल जखम करून जातो. त्या माणसाच्या आत्मसन्मानालाच धक्का देऊन जातो.

सुरूवातीला म्हणलं तसं शिव्या मुख्यत्वेकरून मनातील भावनांना वाट करून देणे याकरिता असतात. सहसा राग आल्यावर जरी शिव्या वापरल्या जात असल्या तरी बरेच वेळा आनंदाच्या वेळीही पटकन आपल्या तोंडात शिव्या येतात. तुमचा एखादा शाळेतला जीवलग मित्र शाळा सुटल्यावर दुरावतो... वर्षानुवर्षे भेट होत नाही. एखाद दिवशी अचानक भेटतो... पूर्वीचे प्रेम, दोस्ती उफाळून येते... दोघेही अगदी मनापासून आनंदित होतात तेव्हा ते म्हणतात.... "भो***... अरे आहेस कुठे? साल्या, किती वर्षांनी भेटतो आहोत आपण!!!" .... आता इथे त्या शिव्यांचा शब्दार्थ पूर्णपणे लुप्त होऊन केवळ भावार्थ तेवढा उरतो. आणि तो एकमेकांना बरोब्बर कळतो. सांगावा लागत नाही. जिथे सांगायची गरज पडावी तिथे असे शब्द येतच नाहीत तोंडातून.

महाराष्ट्र संतभूमी आहे असे म्हणतात. मराठी भाषेच्या जोरदार शिवीवैभवाच्या प्रभावातून इथले संतही सुटले नाहीत. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांबद्दल कित्येक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दर्शनाला गेल्यावर त्यांनी शिव्या घातल्या तर तो विशेष कृपाप्रसाद आहे असे समजले जायचे म्हणे. गाडगेबाबा पण रोखठोक आणि शिव्या वापरून बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते असे कुठे तरी वाचल्याचे आठवते आहे. यादी फार मोठी आहे.

पण मला खरं विचाराल तर सगळ्यात मोठी शिवी कोणती म्हणाल तर मी एकच सांगेन... दुर्लक्ष. होय... दुर्लक्ष करण्यासारखा दुसरा अपमान नाही कोणाचा. शिवीचे उद्दिष्ट्य जे आहे ते समोरच्याचा अपमान करणे हे होय. आणि समोरच्या माणसाची दखलच न घेणे या सारखा अपमान सगळ्यात जास्त झोंबणारा असतो. शिवाय ही शिवी निर्विवादपणे १००% सगळ्या सभ्यतेच्या आणि कायद्याच्या नियमात बसते. ही शिवी दिली म्हणून कोणावर गुन्हा नोंदवला गेला आहे असे ऐकिवात नाही. बिन्धास्त देऊ शकतो. किमान (म्हणजे अगदी शून्य) शब्दात, कमाल अपमान करणारी अशी ही शिवी आहे.

पण दुर्लक्षाच्या बाबतीत एक गंमतीदार विरोधाभास आहे. मूळात शिव्या या मनातील भावनांचा निचरा करण्यासाठी दिल्या जात असल्या तरी, त्याच भावनांवर पूर्णपणे नाही तरी खूपसा ताबा मिळवल्याशिवाय ही शिवी देता येत नाही. याबाबतीत लहानपणी शाळेत शिकलेली महात्मा गांधींची गोष्ट अजूनही लक्षात आहे...

एकदा एका माणसाने गांधीजींना खूप निंदा करणारे पत्र लिहिले. त्यात त्यांना शिव्याही भरपूर घातल्या होत्या. ते पत्र मिळाल्यावर गांधीजींनी त्याला लावलेल्या टाचण्या काढून घेऊन ते पत्र परत पाठवले... त्यासोबत एका कागदावर हे ही लिहिले... "तुमचे पत्र मिळाले. वाचले. त्यातले मला हवे असलेले, उपयोगी असेलेले ठेवून घेतले. नको असलेले तुम्हाला परत करतो आहे."

मला सांगा, त्या पत्रलेखकाला सणसणीत कानाखाली बसल्यासारखं नसेल वाटलं? नक्कीच वाटलं असणार.

तर, अशा या शिव्या. आता या लेखाकडे दुर्लक्ष करून तुम्ही मला शिव्या घलणार नाही अशी अपेक्षा करतो. ;)

ती

on शनिवार, फेब्रुवारी १३, २०१०

अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.

तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. समोरच, तो हसत हसत मस्त पहुडला होता मांडीत. तिला एकदम हसूच आलं. एवढंसं कार्टं पण बरोब्बर सगळं मनासारखं करून घेतं... एकदम लबाड पण गोड आहे. कायम हिच्याच कडेवर. तिने सारखं याच्याशी खेळायचं. मस्ती करायची... तिलाही ते खेळणं आवडलंच होतं.

तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.

आत्ता सुद्धा जवळ एक चांदी पडली होती... तीच पकडायचा प्रयत्न चालला होता त्याचा. ते जमत नव्हतं... म्हणूनच मग त्या लाथा आणि ढुशा. मस्त वार्‍याच्या झुळकीमुळे छान वाटत होतं. तिने त्याला थोडं घट्ट जवळ ओढून घेतलं. टोपडं नीट केलं. पण सराईतासारखी तिची नजर आजूबाजूला भिरभिरतच होती. वेळ चुकवून चालत नाही हे तिला माहित होतं... शिवाय आत्ताशी कुठे चालू होत होता तिचा दिवस. अजून आख्खी संध्याकाळ जायची आहे.

तशात, एकदम बाजूला वेगाने पळणार्‍या गाड्या मंदावल्या... त्यासरशी ती उठलीच... सिग्नल पिवळा... ती भक्ष्यावर झडप घालताना शेवटच्या क्षणी संपूर्ण अंग ताठ करणार्‍या वाघासारखी पूर्ण फोकस्ड... पुढच्या सगळ्या अ‍ॅक्शन्स ठरलेल्या... किती वेळात सिग्नल लाल होणार... गाड्या थांबे थांबे पर्यंत किती सेकंद लागणार... सगळं सरावाचं...

सिग्नल लाल... तिने पूर्ण ताकदीने त्याच्या ढुंगणावर चिमटा काढला... तो कळवळला... आकांत सुरू...

त्याला काखेला मारून ती पहिल्याच गाडीसमोर तोंड वेंगाडून हात पसरून उभी राहिली...