फेड...

on शनिवार, फेब्रुवारी २८, २००९

"राजू...."

आक्काची किंचाळी रात्रीच्या घट्ट काळोखाला चिरत गेली. इतका गाढ झोपलो होतो तरी देखिल धडपडून उठलो मी. अशा वेळी सहसा उठलो तरी मला १-२ मिनिट काही सुधरत नाही. पण आक्काच्या आवाजात असा काहीतरी विलक्षण थरार होता की मी झोपलो होतो की नव्हतो असं वाटावं इतका लख्ख जागा झालो. मी अंथरूणातून उठणार एवढ्यात आक्का परत ओरडली...

"राजू... ये रे लवकर... तो आला बघ परत. मला हाक मारतोय. राजू, नंदा... अरे कुठे आहात रे सगळे... तो घेऊन जाईल मला... त्याला समजवा... आम्ही काही घेतलं नाही कोणाचं... का असा छळवाद मांडला आहेस रे तू?"

आक्काचा नुसता आकांत चालला होता. काय चाललंय काही कळत नव्हतं. मी तिथे पोचेपर्यंत राजू आणि नंदा पण तिथे पोचलेच. आक्काला सोबत म्हणून राहिलेल्या वसुधाताई पण होत्याच. राजू, नंदा, वसुधाताई सगळेच आक्काला आवरायचा प्रयत्न करत होते. आक्का बर्‍यापैकी बेभान झाली होती. शरीराने एवढीशी आमची आक्का पण त्या तिघांना आवरत नव्हती. राजू तिला समजवत होता...

"घाबरू नकोस गं आई, आम्ही आहोत ना... कोणी काही करत नाही तुला. कोण तुला घेऊन जातो बघतोच मी. शांत हो बरं."

नंदाने तिचं डोकं मांडीत घेतलं आणि आई मुलाला मायेने थोपटते तसं हळूवार तिला थोपटायला सुरूवात केली. राजू आणि वसुधाताईंनी तिला दाबून धरलं होतं. थोड्या वेळाने हळू हळू आक्का शांत झाली आणि बारीक आवाजात हुंदके देत रडू लागली. मी आपला नुसता एखादा चित्रपट बघितल्या सारखा दारात उभा राहून बघत होतो. काही कळतच नव्हतं. आक्काच्या चेहर्‍यावरची भिती एवढी स्पष्ट होती की मी पण थिजल्या सारखा झालो होतो. थोड्या वेळाने आक्काला झोप लागली. नंदाने तिचं डोकं हळूच बाजूला ठेवलं आणि ती बाहेर दिवाणखान्यात जाऊन बसली. वसुधाताई आक्काच्या बाजूला बसल्या आणि तिच्या छातीवर हात ठेवून शांतपणे हलक्या आवाजात रामरक्षा म्हणू लागल्या...

"श्रीगणेशाय नमः
अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य,
बुधकौशिक ऋषि:,
श्रीसीतारामचंद्रो देवता..."

रात्रीच्या अबोल शांततेत त्यांच्या मंद लयीतले खर्जात म्हणलेले रामरक्षेचे पुरातन मंत्र खरंच एक वेगळीच जाणिव करून देत होते. मनाला धीर देत होते. काही तरी अनामिक गूढ असं घडत होतं पण त्या मंत्रोच्चारामुळे मात्र ती जाणिव नक्कीच कमी झाली होती. राजू तिथेच बाजूला खुर्चीत डोळे मिटून बसला होता. त्याच्या चेहर्‍यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मी पण हळूच बाहेर दिवाणखान्यात येऊन बसलो. नंदा सोफ्यावर बसली होती. माझ्या चाहुलीने डोळे उघडले तीने. क्षीणपणे हसली. मी काय बोलावं याचा विचार करत होतो, तेवढ्यात तीच म्हणाली,

"घाबरलास?"

"नाही. पण अगदीच नाही असंही नाही. खरं तर मी घाबरलोय, हादरलोय की स्वप्नात आहे... मला काही कळतच नाहीये."

"हं... स्वप्न असतं हे तर किती बरं झालं असतं रे... पण दुर्दैवाने हे स्वप्न नाहीये... वास्तव आहे."

"अगं पण हा काय प्रकार आहे? मला नीट सांगणार का? मी संध्याकाळ पासून बघतोय तुम्ही सगळे काही तरी विचित्र टेंशन मधे आहात. आणि मला असं तडकाफडकी का बोलावून घेतलं? तरी बरं एवढ्या शॉर्ट नोटिस मधे तिकिट मिळालं नाही तर आजकाल व्हेकेशन सीझन चालू आहे त्यामुळे सगळ्या फ्लाईट्स भरून जात आहेत. आणि या वसुधाताई कोण आहेत? इथेच राहतात का?" संध्याकाळपासून दाबून ठेवलेली आणि या प्रसंगामुळे शीगेला पोचलेली माझी उत्सुकता बदाबदा बाहेर पडली.

"सांगते रे... सगळं सांगते. तू एवढा परदेशातून थकून भागून आलास म्हणून संध्याकाळी काही बोललो नाही आम्ही. सकाळी बोलू निवांत असं वाटलं. पण आता मात्र सांगते सगळं."

त्या नंतर मात्र जे काही ऐकलं ते निव्वळ मतकरी, धारपांच्या कथा-कादंबर्‍यातच घडतं असं वाटायचं. प्रत्यक्षात, आपल्याच जीवनात कधी असं घडेल असं चुकूनही वाटलं नव्हतं.

नंदा सांगत होती.

"तुला माहितच आहे आमचं रूटिन. सकाळी सात वाजता जुई कॉलेजला जाते, साडेसातला राजू जातो फॅक्टरीत. मी आठ सव्वाआठ पर्यंत निघते. मग त्यानंतर दिवसभर आक्का एकट्याच असतात. मी सगळा स्वैपाक करूनच जाते. त्यांचं आंघोळ, पूजा, पोथी वगैरे चालतं बराच वेळ. मग जेवतात. दुपारी पेपर वगैरे वाचतात, टिव्ही बघतात. जुई येतेच तीन पर्यंत. मग तिचे लाड करण्यात वेळ जातो त्यांचा. चांगलंच गूळपीठ आहे दोघींचं. संध्याकाळी येतोच आम्ही दोघं. मग कधी देवळात जातात तर कधी त्यांच्या एक-दोन मैत्रिणी आहेत आमच्या सोसायटीतल्या त्या येतात.

आत्ता पर्यंत सगळं ठीक होतं रे. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना थोडं विस्मरण व्हायला लागलंय. पटकन आठवत नाही. कधी तरी आंघोळ करून येतात आणि परत त्याच पावली बाथरूम मधे जाऊन आंघोळीला बसतात. एकदा जुई घरी आली दुपारी तर दार उघडलं त्यांनी पण 'कोण पाहिजे?' असं विचारलं. आणि एकदा मी शुक्रवारच्या हळदीकुंकवाला शेजारच्या देशपांडेकाकूंना बोलावलं तर मी त्यांना नमस्कार केल्यावर आक्कांनी मलाच नमस्कार केला. त्यांनी मला 'त्यांची आई' समजणं तर आता माझ्या अंगवळणीच पडलंय." मी ऐकत होतो.

आक्का माझी आत्या, राजू माझा आत्तेभाऊ. हे नातं नुसतं नावापुरतं. मी आणि राजू सख्ख्या भावापेक्षा जास्त जवळ आहोत एकमेकांच्या. आम्ही एकत्र वाढलो, खेळलो. एकाच कॉलेजमधे गेलो. नशिबाने आमच्या बायका पण एकमेकींशी खूपच छान ऍडजस्ट झाल्या. त्या मुळे मी परदेशात गेलो तरी वर्षातून एकदा तरी एकत्र येतो, फिरायला जातो. खूप जवळ आहोत आम्ही सगळे एकमेकांच्या. आक्का मला आईसारखीच आहे. काका तसे लवकरच गेले. पण आक्काने नीट सांभाळून घेतलं. आमची मदत योग्य तेव्हा घेतली. जमेल तशी परतफेड पण केली. राजू पण धडाडीचा. शिकला व्यवस्थित. आज त्याचा स्वतःचा उत्तम धंदा आहे. फॅक्टरी आहे. ५०-६० माणसांना रोजगार देतोय तो. नंदा, सुनंदा खरं नाव तिचं, पण स्वत:ची इस्टेट एजन्सी चालवते. जुई इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. एकंदरीत सगळं कसं छान चालू आहे. आणि आता हे अचानक नविन प्रकरण...

तेवढ्यात राजू पण बाहेर येऊन बसला.

"अरे काय सांगू तुला... आधी आमच्या लक्षातच नाही आलं की असं काही होतंय. पण जेव्हा आक्काने नंदाला आई समजून नमस्कार केला तेव्हा मात्र आम्ही घाबरलो. आपल्या काटदरे डॉक्टरांकडे घेऊन गेलो तिला. त्यांचं म्हणणं पडलं की हे सगळं म्हातारपणामुळे होतंय. टेस्ट्स वगैरे केल्या, त्यात कळलं की बहुतेक हा अल्झायमर्सचा प्रकार असावा. मेंदू मधे काही तरी गडबड होते आणि स्मरणशक्ती जाते माणसाची. पण गंमत म्हणजे लहानपणचं सगळं आठवतं तिला. मोठेपणीचंच विसरते ती. कधी कधी तर ती स्वतःला शाळकरी मुलगीच समजते." राजू सांगत होता.

"अरे कधी कधी त्या 'आई' अशी हाक मारून माझ्या कुशीत शिरतात ना... खूप रडू येतं रे... ज्या बाईने इतकं केलं आयुष्यभर लोकांचं तिला असं का व्हावं... मग मी पण जवळ घेते त्यांना, कुरवाळते, की मग बरं वाटतं त्यांना. पण हे सगळं तात्पुरतं. थोड्या वेळाने आपोआप भानावर येतात त्या. तेव्हा पासून आम्ही पूर्ण दिवसभरासाठी एक मुलगी ठेवली घरात. आक्काला एकटं ठेवणं शक्य नाही." ... नंदा.

"पण मागच्या दहा पंधरा दिवसांपासून मात्र एक फारच विचित्र प्रकार घडतो आहे. आक्का एक दिवस अचानक दुपारी बारा साडेबाराला जोरजोरात ओरडायला लागली. ती कुणालातरी घालवून द्यायचा प्रयत्न करत होती. त्या मुलीने तिला विचारलं तर रस्त्याकडे हात करून ती म्हणाली, 'तो बघ कसा तिथे उभा आहे. कधीचा आपल्याच घराकडे बघतो आहे. काय पाहिजे कुणास ठाऊक.' त्या मुलीने रस्त्याकडे बघितलं तर तिथे अरे चिटपाखरू सुद्धा नव्हतं. आक्काचे हातवारे मात्र किती तरी वेळ चाललेच होते. ती पोरगी जाम घाबरली होती. जुई येईपर्यंत कशीबशी थांबली ती घरी, जशी जुई आली तशी पळूनच गेली ती, परत आलीच नाही ती... उरलेले पैसे घ्यायला पण. त्या दिवसापासून नंदा घरीच आहे. आक्काचे भास मात्र हळू हळू वाढतच चालले आहेत. आता तर ती त्या माणसाशी बोलते पण. त्याला काही तरी सांगत असते.

'आम्ही काही कुणाचं देणं लागत नाही. मी आज पर्यंत कुणाचं एक पैसाही देणं अंगावर ठेवलं नाही. तुझे एवढे पैसे कसे राहू देईन. मुकाट्याने जा इथून.'

असंच काहीतरी बोलत असते."

राजूचं बोलणं ऐकून मी पण घाबरलो. खरं तर हे सगळं आक्काला होणारे भास म्हणून सोडून द्यावं, पण मग मगाशी जाणवलेलं ते गूढ अस्तित्व, ती अनाम भावना.... ते काय होतं? का तो मला झालेला भास होता? पण ती जाणीव एवढी स्पष्ट होती की केवळ भास म्हणून झटकून टाकूच शकत नव्हतो मी. त्या जाणीवेच्या केवळ आठवणीने माझ्या अंगावर काटा आला आणि अंगावर शिरशिरी आली. माझी अवस्था राजूच्या नजरेतून सुटली नाही. तो एकदम म्हणाला,

"म्हणजे तुला पण जाणवलेलं दिसतंय 'ते' !!!"

"काय म्हणायचंय तुला, राजू? काय जाणवलंय?"

"जेव्हा जेव्हा आक्काला असे भास होतात तेव्हा मला आणि नंदाला काही तरी गूढ वाटायचं, कोणी तरी जवळ उभं आहे असं जाणवायचं. फार विचित्र आहे रे हा सगळा प्रकार. ताबडतोब जुईला तिच्या मामाकडे पाठवलं आम्ही. मी पण घरूनच काम करतोय गेले दहा दिवस. नंदाला एकटं सोडू शकत नाही आक्का जवळ. आणि आता तर ती हिस्टेरीक होते. अनावर होते. तो माणूस तिला काही तरी सांगतो आणि ही त्याच्याशी भांडते. असह्य झालंय रे हे सगळं. कोणाशी बोलणार तरी आणि? काय सांगणार लोकांना, माझी आई वेडी झाली, तिला भास होतात, असं सांगू? आणि ती भयानक जाणिव... कोणाला पटेल तरी का?

म्हणून काल फोन केला आणि ताबडतोब बोलावलं तुला. तू येशील याची खात्री होती. संध्याकाळीच बोलायचं होतं खरं तर. पण नंदा म्हणाली तू दमून आला आहेस. सकाळी बोलू. पण आता तू सगळं बघितलंच आहेस, 'त्याचा' अनुभव घेतलाच आहेस."

"राजू अरे असं काही नसतं रे... उगाच काय बोलतोस तू? एवढा शिकलेला तू..." मी स्वतःच्या भितीला बाजूला ठेवून राजूला धीर द्यायचा एक क्षीण प्रयत्न केला. प्रयत्न क्षीण होताच कारण राजू थोडासा हसून म्हणाला...

"आधी स्वतःला पटव आणि मग मला पटवून द्यायचा प्रयत्न कर. ज्याला त्या अस्तित्वाची जाणिव झाली, तो विसरूच शकणार नाही." खरंच होतं त्याचं. पण बुद्धी मात्र हे मानायला तयार नव्हती. मन-बुद्धीचा झगडा चालूच होता.

"हे बघ राजू, उद्या आपण परत जाऊ काटदरे डॉक्टरांकडे, अजून काही टेस्ट्स आहेत का ते बघू. मी पण माझ्या काही मित्रांना विचारतो. अरे आजकाल नविन नविन औषधं निघत आहेत दिवसागणिक. काही तरी उपाय नक्कीच असेल. आता मी आलोय ना... बघू काय करता येईल ते. अरे पण त्या वसुधाबाई कोण रे?"

"त्या आक्काच्या ओळखीच्या आहेत. त्यांचा गावाबाहेर एक आश्रम आहे. त्या आणि त्यांच्या बरोबर अजून ४-५ लोक असे राहतात तिथे. एक छोटंसं रामाचं देऊळ आहे तिथे. प्रसन्न ठिकाण आहे. खूप जण त्यांच्या कडे जातात. दर गुरूवारी आक्का जायची तिथे. गेले २-३ गुरूवार गेली नाही ती, म्हणून काल त्या सहज चौकशी करायला आल्या. त्यांना बघताच आक्काने त्यांचा हात घट्ट धरून ठेवला, सोडेचना. त्या पण जरा शांतच बसल्या होत्या. आक्का पण त्यांना जाऊ देईना, म्हणून मग आम्हीच त्यांना म्हणलं की शक्य असेल तर रहा इथेच आज. त्या पण अगदी मोकळेपणी राह्यल्या. म्हणूनच आज आम्ही आमच्या खोलीत झोपलो. वाटलं त्यांच्या मुळे आक्का जरा शांत झाली. आज झोप मिळेल जरा, तर हे सगळं रामायण परत घडलं."

"अरे जाऊ दे रे... सगळं होईल ठीक. आता झोप बरं. मी बसतो इथेच जरा वेळ." बळजबरीने मी दोघांना झोपायला पाठवलं.

काय असेल हा प्रकार? खरंच असं काही असेल? कोण माणूस असेल तो? काय पाहिजे असेल त्याला? त्याची अशी काय वस्तू राहिली आमच्या कडे की तो ती परत मागतो आहे? मी एकदम चपापून भानावर आलो. मी तर खरंच तो माणूस आहेच असं मानून विचार करायला लागलो होतो. निग्रहाने सगळे विचार बाजूला सारले. आक्काच्या खोलीकडे गेलो. हळूच डोकावून बघितले. आक्का शांतपणे झोपली होती. वसुधाताई तिच्या बाजूला शांतपणे डोळे बंद करून बसल्या होत्या. नाईटलॅंपच्या निळसर प्रकाशात त्यांचा चेहरा वेगळाच भासत होता. चेहर्‍यावर एक प्रसन्नता होती. त्यांच्याकडे नुसतं बघून मला बरं वाटलं. ओझं जरा कमी झालं. मी अंथरूणावर येऊन पडलो. प्रवासाचा शीण, आक्काचा एपिसोड... सगळा ताण एका क्षणात माझ्यावर चालून आला आणि मी शरण गेलो.

***

सकाळी उशिराच जाग आली. नंदा-राजू उठलेच होते. माझीच वाट बघत होते. आक्का पण उठली होती. आता तर ती एकदम वेगळीच वाटत होती. रात्रीची आक्का जणू तिच्यासारखी दिसणारी पण दुसरीच बाई होती. सूर्यप्रकाशात काय जादू असते. तेच घर, त्याच वस्तू, तीच झाडं, त्याच व्यक्ति... रात्रीच्या काळोखात एखाद्या हिंस्त्र श्वापदाप्रमाणे भासतात कधीकधी. एकदा उजाडलं की मात्र सगळं अचानक मंगलमय होऊन जातं. हाही खरा आपला भासच. बदलत काही नसतं.... फक्त आपली नजर आणि आपलं मन बदलतं. पण अंधाराचा हा गुणधर्मच असावा.

राजू शांतपणे बसला होता. मीच बोलायला सुरूवात केली,

"चल तयार हो. डॉक्टरांकडे जाऊन येऊ."

"कशाला?"

"अरे असं काय करतोस? भेटून येऊ. विचारू त्यांना की अजून काय करता येईल." त्याची अवस्था बघून मला कसं तरीच झालं.

आमचं बोलणं चालू असतानाच वसुधाताईपण बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसल्या आमच्या बरोबर. राजूने आमची ओळख करून दिली. नमस्कार वगैरे झाले. वसुधाताईंनी बोलायला सुरूवात केली,

"राजू, कालची पूर्ण रात्र मी आक्कांच्या बाजूला बसले होते. मला काही तरी जाणवत होतं. काय ते नक्की अजून नाही कळलं, मी प्रयत्न करत होते, पण नीट पकडीत येत नव्हतं."

मी, नंदा, राजू.... फक्त खुर्चीतून खाली पडायचेच बाकी होतो. म्हणजे आम्ही एकटेच नव्हतो तर, 'त्या'ची जाणीव होणारे. आता मात्र डोकं कामातूनच गेलं. असह्य झालं अगदी. काही समजेचना. आजपर्यंतचं शिक्षण, विचार सांगत होते की असं काही नसतं. हे सगळे नुसते मनाचे खेळ असतात. पण मग ती जाणीव, राजू आणि नंदाला पण जाणवलं होतं ते आणि आता वसुधाताईंनी तर नुसतं त्याला अनुभवलं नव्हतं तर त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला असं म्हणत होत्या. मला हे द्वंद्व असह्य झालं, मी त्या तिरीमिरीतच त्यांना म्हणलं...

"माफ करा ताई, पण असं काही नसतं. हे सगळे मनाचे खेळ असतात. तुम्ही उगाच काही तरी यांच्या मनात भरवून देऊ नका. आधीच ते बिचारे घाबरून गेले आहेत. त्यांना धीर द्यायचा सोडून तुम्ही असलं काही तरी सांगून त्यांना अजून घाबरवताय? कधी जाताय तुमच्या आश्रमात परत तुम्ही? आता मी आलोय, मी घेईन त्यांची काळजी. तुम्ही काल इथे थांबलात त्याबद्दल धन्यवाद. या आता!!!"

वसुधाताई शांतपणे हसल्या.

"तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे. खरं तर हे सगळं गूढच आहे. मला पण अजून नीटसं कळलं नाहीये. साधना खूप लागते. मी तर अज्ञानीच आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी आक्कांना नक्की यातून बाहेर काढू शकेन. कमीत कमी 'तो' कोण आहे? त्यांना का भेटतोय? काय राहिलंय त्याचं? हे सगळं तरी आपल्याला नक्कीच कळेल. बाकी जशी तुमची इच्छा." शेवटचं वाक्य त्यांनी राजू-नंदा कडे बघून म्हणलं. बाई अतिशय हुशार आणि कॉन्फिडंट वाटत होत्या.

"वसुधाताई, हा काय बोलला त्याबद्दल माफ करा. आम्ही तुम्हाला ओळखतोय आज बरेच दिवसांपासून. तुम्ही जे म्हणताय त्यावर साहजिकच विश्वास बसणं कठिण आहे पण केवळ तुम्ही हे बोलत आहात म्हणून मी थोडा तरी विचार करते आहे. तुम्ही जर का खरंच मदत करू शकला तर खूप बरं होईल." नंदा म्हणाली.

"आपण प्रयत्न करू, नंदा. यश मिळणं न मिळणं त्या रामरायाच्याच इच्छेवर आहे."

"काय करावं लागेल आपल्याला?"

"काहीच नाही. मी काही मंत्र तंत्र जाणत नाही. की मला काही विद्या अवगत नाही. माझ्या कडे रामरायाचा अंगारा आहे. आपण तो आक्कांना लावू आणि त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करू. आपल्याला आधी आक्का काय अनुभवातून जात आहेत ते जाणून घ्यायचंय. त्यातूनच आपल्याला मार्ग सापडेल हे निश्चित्त."

ताई स्वतः आंघोळ करून आल्या. नंदाने आक्कांना आंघोळ घातली. आम्ही सगळेच आंघोळी करून देवघरात बसलो. ताईंनी फक्त एक ऊदबत्ती लावली. कसलाही बडेजाव नाही की विधी नाहीत. शांतपणे हात जोडून रामरक्षा, मारुतिस्तोत्र म्हणलं. शेवटी त्यांच्या गुरूंचं स्मरण केलं. वातावरण भावमय झालं होतं. माझा सगळा आक्षेप एव्हाना गळून पडला होता. उरला होता फक्त एक असहाय्य पण शांत आश्वस्त जीव. आपल्याला काही धोका नाही, इथे मी सुरक्षित आहे ही भावना मनात दाटली होती. सगळ्यांची बहुतेक हीच अवस्था होती. आक्का तर अगदी लहान मुलासारखी दिसत होती. तिची क्षीण कुडी जमिनीवर मुटकुळं करून पडली होती. ताईंनी आक्काला अंगारा लावला आणि म्हणाल्या,

"आक्का, कश्या आहात? बरं वाटतंय ना?"

गेले कित्येक दिवस भ्रमिष्टासारखी वागणारी आक्का शांतपणे म्हणाली,

"हो, ताई. खूप बरं वाटतंय."

"मग आक्का आता आम्हाला सांगणार का? कोण येतो तुम्हाला भेटायला? काय पाहिजे त्याला? का त्रास देतोय तो तुम्हाला?"

आम्ही सगळे उत्कंठा ताणून बसलो होतो. आक्का काय बोलतेय आता? काही तरी अगम्य असं सत्य ऐकायला मिळणार. इतकं शांत वाटत असून सुद्धा 'त्या'चा विषय निघताच आक्का एकदम अस्वस्थ झाली. तरी ती मोठ्या कष्टाने बोलली,

"तो खंड्या रामोशी आहे. रोज येतो. कधीही येतो. म्हणतो 'माझे १० रूपये तुझ्याकडे उधार आहेत. मला परत कर. व्याजासकट पाहिजेत मला.' मी त्याला किती सांगते की अरे बाबा मी तुला ओळखत नाही की तुझ्याकडून कधी काही घेतल्याचं आठवत नाही. पण तो ऐकतच नाही. दुसरं काही बोलत नाही, फक्त पैशे परत मागतो."

"आक्का, अजून काही म्हणतो का तो? काही धमकी वगैरे देतो का?" बाईंनी विचारलं.

"नाही हो... धमकी वगैरे देत नाही. उलट म्हणतो की, 'मी रामोशी आहे. तुमचं मीठ खाल्लं आहे, तुझं रक्षणच करीन. तू मला सूनेसारखी आहे. मला घाबरू नकोस. पण माझे पैसे तेवढे परत कर.'"

"आक्का, तू त्याला कधी विचारलं नाहीस की तो कोण आहे? आपण कधी त्याच्याकडून पैसे घेतले होते? त्याने आपलं मीठ खाल्लं म्हणजे काय?" राजू.

आक्का बराच वेळ शांत बसली होती. जणू काही आठवायचा प्रयत्न करत होती.

"एकदा मला म्हणाला तो... तो आपल्याच गावचा आहे. गावाची गस्त त्याच्याकडे होती. एकदा तो असाच रात्री गस्त घालत असताना माझे सासरे अचानक काही काम निघालं म्हणून परगावी निघाले. घाईत त्यांचा बटवा राहिला घरीच आणि त्यांच्या लक्षात येई पर्यंत ते बरेच पुढे आले होते. तेवढ्यात त्यांना खंड्या भेटला म्हणून त्यांनी त्याच्याकडून थोडे पैसे उधार घेतले. त्या नंतर ते जेव्हा परत आले तेव्हा खंड्या आजारी पडला आणि त्याला तालुक्याला नेला होता वैद्याकडे. त्यातच तो गेला. आणि हे पैसे पण परत द्यायचे राहून गेले. आता त्याचा जीव अडकला आहे त्या पैश्यात. पैसे मिळाल्याशिवाय त्याचा जीव शांत होणार नाही म्हणतो. इतके दिवस तुझीच परिस्थिती चांगली नव्हती म्हणून तुला पैसे परत मागितले नाहीत असं सगळं तो सांगतो.

पण मी कसा विश्वास ठेवू? उगाच कोणाचेही पैसे मी कधीच ठेवले नाहीत आणि माझे सासरे पण अतिशय सज्जन होते. त्यांनी ते पैसे नक्कीच परत केले असणार."

आम्ही सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होतो. कोणाचा विश्वास बसेल? अतर्क्यच होतं.

"पण आक्का, जरी समजा आपण त्याचे पैसे परत करायचे तरी कसे करणार? तो तर जिवंतच नाहीये ना. का त्याच्या नावाने काही दान करायचं? म्हणजे त्याला शांत वाटेल?" राजू म्हणाला.

"हे बघा, " वसुधाताई म्हणाल्या, "मला असं वाटतं... आपण क्षणभर असं धरून चालू की पैसे खरंच द्यायचे राहून गेले. आणि आता तो ते परत मागतो आहे. तर एक उपाय आहे. राजू, तू स्वत: गावी जा, त्या खंड्याचे कोणी वंशज असतील तर त्यांना शोधून काढ आणि ते पैसे त्यांना परत कर. त्यांना हे सगळं सांग आणि त्यांच्या कडून 'कर्ज फिटलं' असं वदवून घ्या."

परिस्थितीच अशी होती की राजूने त्या क्षणी कोणाचंही काहीही ऐकलं असतं.

"ठीक आहे ताई. मी लगेच निघतो, पण किती पैसे परत करायचे? तो तर व्याजासकट मागतो आहे ना. काय करायचं?"

"राजू, तू एखादी मोठी रक्कम दे त्यांना. पूर्वीच्या काळी अशी उधारी असून असून किती असणार. ५-१० रुपयांचीच असेल ना? त्या काळी एवढ्या पैश्यात महिनाभर घर चालायचं लोकांचं. हजार पाचशे परत कर म्हणजे खूप झालं."

"ठीक आहे. मी निघतो लगेच."

माझा जरी पूर्ण विश्वास अजून बसत नव्हता तरी, मी आणि राजू लगेच गाडी करून निघालो. राजूचं मूळ गाव तसं जवळच होतं. २-३ तासाचा काय तो प्रवास. गाडी मीच चालवत होतो. पूर्ण प्रवासात आम्ही दोघंही गप्प होतो. माझ्या मनात आता त्या खंड्याला कसं शोधायचं हाच प्रश्न होता. आम्ही गावात पोचलो. दुपार टळत आली होती. गावात राजूचे कोणीच नव्हते आता. आम्ही चौकशी करत ग्रामपंचायतीचं ऑफिस शोधलं. सुदैवाने गावचे सरपंच तिथेच भेटले. राजूने ओळख सांगितली. आम्ही सगळी कहाणी त्यांच्या कानावर घातली.

सरपंच तसे वृद्धच होते. त्यांच्या आठवणीत तरी खंड्या रामोशी नव्हता. पण त्यांच्या माहितीचा एक रामोशी होता. गावाबाहेर रामोश्यांची वस्ती होती. त्यांनी लगोलग शिपायाला पिटाळला. थोड्या वेळात ३-४ जण आले त्याच्या बरोबर. सगळे त्याच वस्तीतले होते. सरपंचांनी त्यांच्या पैकी खंड्या रामोशी कुणाला माहीती आहे का विचारलं. कुणालाच काही आठवेना. बराच वेळ चर्चा झाल्यावर त्यांच्यातला एक जण म्हणाला,

"सरपंच, त्यो सुर्श्या हाय न्हवं का... त्याचा बा, त्याच्या बाचं नाव 'खंडेराव' लावतोय बघा."

"अरे मग बघताय काय? बोलवा त्याला पटकन."

शिपाई तसाच पळाला त्यांच्यापैकी एकाला घेऊन. थोड्या वेळाने ते आले परत, एकाला पुढ्यात घालूनच आले ते.

"हा आमचा सुर्श्या. काय रे सुर्श्या, तुज्या बाच्या बाचं नाव खंडेराव होतं ह्ये खरं का?"

"व्हय सरपंच. खंडेराव माझा आज्जा. माझा बा ल्हान आसतानाच मेला त्यो. रात्रीला गस्त घालताना जनावर चावलं आणि काही अवशिद कराय अदुगरच ग्येला तो."

हे सगळं ऐकून आम्हाला पण हुरूप आला. राजू पुढे झाला. त्याने सगळी कहाणी परत त्या सगळ्यांना ऐकवली.

"सुरेश, आता एक उपकार कर बाबा आमच्यावर. मी हे हजार रूपये तुला देतो. जे काय व्याज असेल ते सगळं यात आलं. सरपंच आणि हे बाकीचे तुझे मित्र साक्षीदार आहेत. तेवढं 'कर्ज फिटलं' असं म्हण बाबा आणि मोकळं कर आम्हाला."

"साहेब, आम्ही गावाबाहेर असलो तरी सरपंच आम्हाला मान देऊन असतात. त्ये काय म्हन्तील त्ये खरं. आमाला काय कळतंय यातलं?" सगळा प्रकारच एवढा विलक्षण की ती माणसं पण चक्रावून गेली होती.

"सुर्श्या, पैक्यावर कोणाची किती वासना आसंल त्ये सांगनं कठीन हाय गड्या. खंडेरावचा जीव आडकला आसंल त्या पैक्यापायी. आपन कसं सांगनार? तू एक काम कर. हे पावने म्हन्तात तसं घे तो पैका आनि मोकळं कर त्याना कर्जातून. पन तो पैका घरात न्हेऊ नको... देवळात नाही तर कोना गरजवंताला टाक आनि ह्ये समदं इसरून जा."

राजूने १००० रूपये सुर्श्याच्या हातावर ठेवले. सुर्श्या 'तुमचं कर्ज फिटलं' अस त्याला म्हणाला. सरपंच आणि इतर साक्षी होते. त्यांनी माना डोलावल्या आणि आम्ही उठलो. सरपंच म्हणाले, "आता कुठे जाता? तिन्ही सांजा झाल्यात, थोडा वेळ थांबा. वेळ टळून जाऊ दे, मंग जा. न्हायी तर हितंच मुक्काम करा रातचा आनि सकाळी जा."

आम्हाला घरी पोचायची घाई झाली होती. मी तर कंटाळलो होतो. थोड्याश्या अनिच्छेनेच मी हे सगळे करत होतो. कसला बायकांचा खुळचटपणा असंच वातत होतं. हो नाही करता करता, थोडा वेळ थांबून निघू असं ठरलं. सरपंचांनी चहा नाश्ता मागवला. तेवढ्यात राजूचा मोबाईल वाजला... घरून होता फोन. मीच घेतला फोन, नंदा होती फोनवर.

"काम झालं ना आत्ताच?"

"हो आत्ताच झालं. आपण ठरवलं तसंच सगळं केलं. पण तुला कसं कळलं?"

"अरे, आक्का झोपल्या होत्या, आम्ही दोघी बाहेर बसलो होतो. तेवढ्यात इतक्या दिवसांनी आज पहिल्यांदा आक्का स्वतःहून चालत बाहेर आल्या. थेट बाथरूम मधे गेल्या. डोक्यावर पाणी घेतलं आणि बाहेर येऊन म्हणाल्या,

'नंदा, फिटलं गं बाई एकदाचं... खंड्या येऊन पाया पडून गेला... आता परत नाही येणार म्हणून निरोप घेऊन गेला.'

हे ऐकून लगेच तुला फोन केला."

मी सुन्नपणे ऐकत होतो, हातातून फोन गळून पडला होता, डोळ्यात पाणी होतं.

माझं खोबार... भाग ७

on शुक्रवार, फेब्रुवारी १३, २००९

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६

*************

मला माझ्या वास्तव्यात खूप वेगवेगळे अनुभव आले ह्या धर्माचरणाचे, अतिरेकी तसेच समजूतदारही. कधीही 'स्टिरिओटाईप' / 'पूर्वग्रहदूषित' विचार करू नये हे मी शिकलो. पण त्याबद्दल पुढे...

*************

जसं जसं माझं क्षितिज विस्तारत गेलं तसं तसं मला विविध देशातले लोक भेटत गेले. ज्या राष्ट्रांबद्दल आजपर्यंत नुसतं ऐकलं होतं तिथले लोक भेटायला लागले, नुसतेच भेटले नाहीत तर काही माझे चांगले मित्र बनले. इजिप्त, पॅलेस्टाइन, लेबनॉन, जॉर्डन, सिरियन, बांग्लादेशी... अनेक. पण ज्या लोकांबद्दल सर्वसामान्य भारतिय माणसाला अपार द्वेष मिश्रित कुतूहल असतं ते.... आपले सख्खे शेजारी, पाकिस्तानी. हे तर बरेच भेटले. पहिल्या काही भागात जसं मी लिहिलं होतं, खोबार विमानतळावर जी काही माझी वाईट अवस्था झाली होती तेव्हा मला पाकिस्तानीच भेटले होते आणि मला त्यांचा काय आधार वाटला होता!!! आणि पुढे बरेच पाकिस्तानी भेटले, सगळ्याच प्रकारचे, त्यातून त्यांची मानसिकता कळत गेली. प्रत्येक समाजात सगळ्या प्रकारची माणसे असतात हे सत्य माझ्या मनावर ठासलं गेलं. असे बरेच भेटले तरी लक्षात राहिलेले काही प्रसंग.

आमचा अजून एक क्लायंट होता. हा क्लायंट म्हणजे, सौदी अरेबियाच्या लष्कराचं एक भलं मोठ्ठं हॉस्पिटल होतं. त्याचं नाव "किंग फाहद मिलिटरी मेडिकल हॉस्पिटल". हे एक भलं मोठं संस्थानच होतं. खूप मोठा परिसर, जागोजागी दिसणारे लष्करी गणवेशातले लोक, गंभीर वातावरण यामुळे मनावर नेहमीच एक दडपण असायचं. पण ज्या विभागात माझं काम असायचं तिथे मला एक अगदी तरूण पाकिस्तानी पोरगा भेटला, अफझल. असेल फारतर २२-२३ वर्षांचा. दिसायला एकदम रुबाबदार आणि त्याला एकदम छानछोकीत रहायची आवड. त्याच्या बरोबर अजून दोघे... एक श्रीलंकन आणि दुसरा फिलिपिनो. त्या सगळ्यांचा बॉस एक ब्रिटिश नेव्ही मधला निवृत्त ज्युनियर कमिशंड ऑफिसर. (हा काय बोलायचा ते मला शेवट पर्यंत कळले नाही. अतिशय बेकार ऍक्सेंट आणि 'सालंकृत' इंग्रजी भाषा. कधी कळलंच नाही. तो श्रीलंकन मला नंतर नीट समजवून सांगायचा. आणि गंमत म्हणजे त्या श्रीलंकन पोराचं ड्राफ्टिंग त्या ब्रिटिश माणसापेक्षा खूपच चांगलं होतं. :) )

भाषिक आणि भौगोलिक जवळीकीमुळे अफझलची आणि माझी पटकन गट्टी जमली. तोही गप्पिष्ट, त्यामुळे हळूहळू विषय सापडत गेले आणि आमच्या मनमोकळ्या गप्पा व्हायला लागल्या. त्याचे वडिल पण तिथेच काम करत आणि तो त्यांच्याच बरोबर एकाच क्वार्टर मधे राहायचा. त्याची आई आणि बहिण पाकिस्तान पंजाब मधे एक गुजरात म्हणून शहर आहे तिथे असायचे.

अफझल कोणत्याही त्या वयातल्या साधारण भारतिय मुलांसारखाच होता. त्याला चित्रपटांचं भयंकर वेड. अर्थात भारतिय चित्रपट. (तो म्हणायचा की ज्याला पाकिस्तानी चित्रपट आवडतात तो माणूस पाकिस्तानीच नाही. ;) ) मी मुंबईचा आहे असे कळल्यावर त्याचा जो काही चेहरा झाला होता तो मी कधीच विसरणार नाही. अक्षरशः भारावून वगैरे बघत होता माझ्याकडे. त्याला खरंच असं वाटत होतं की मुंबईत फिल्मस्टार वगैरे असे गल्लोगल्ली हिंडत असतात. आपण सहज त्यांना भेटू शकतो. (अगदी असेच प्रश्न मला १९८४ साली इंदौर मधे पण विचारले गेले होते.) खरंतर त्याने पहिल्याच संभाषणात माझी विकेट घेतली होती.

मला म्हणाला "आपके मुंबई मे मुझे एक बार आना है." मी म्हणलं, "जरूर ये. तुला मुंबईची काय माहिती आहे?" पठ्ठ्याने मला जुहू बीच, गेटवे ऑफ इंडिया, फिल्मसिटी वगैरे नावं तिर्थक्षेत्राच्या नावासारखी म्हणून दाखवली. पुढे लगेच तर त्याने बाँब टाकला. मला म्हणतो, "यार, आप मुझे थोडी हेल्प कर सकते है? मुझे ना रानी मुखर्जी बडी अच्छी लगती है. मुझे एक बार उसके साथ डिनर पे जाना है. कुछ कर सकते है? मै कितना भी पैसा खर्च करने के लिए तैयार हूं." मी अक्षरशः ४ फूट उडालो. त्याला विदारक (नाही तर काय) सत्य परिस्थितीची कल्पना देता देता माझी हालत खराब झाली. :)

मग हळूहळू आमचे विषय वाढत गेले. मला इतक्या जवळून भेटलेला हा पहिलाच पाकिस्तानी. मला पहिल्यापासूनच पाकिस्तानी लोकांबद्दल कुतूहल आहे. कसे आहेत तरी कसे हे लोक? त्यांचे विचार कसे असतात? भारताबद्दल नक्की काय वाटतं त्यांना? द्वेष, मत्सर, असुया, भिती, साम्यत्वाची जाणिव? काय नक्की? अफझल बरोबर बोलताना, त्याच्याकडून पाकिस्तानातल्या त्याच्या पूर्वायुष्याबद्दल ऐकताना काही पदर उलगडत होते. मग एकदोनदा त्याच्या क्वार्टरवर त्याने जेवायला बोलावलं. मला काय प्रकारचं जेवण आवडतं असं त्याने विचारल्यावर, "शाकाहारी काहीही" हे माझं उत्तर ऐकून तो फारच चिंताक्रांत झाला. मी कोणत्याही प्रकारचं 'गोश्त' खात नाही हे त्याच्या दृष्टीने फारच अगम्य होतं. माणूस मांसाहाराशिवाय जगतो ही कन्सेप्टच त्याला पटत नव्हती. मोठ्या मुष्किलीने त्याला समजवलं. मग नंतर कित्येक दिवस तो मला शाकाहार वगैरे बद्दल निरनिराळे प्रश्न विचारून भंडावून सोडायचा. मग तो कधी कधी धर्माबद्दल वगैरे बोलायला लागला. हिंदू धर्माबद्दल वगैरे मी काही सांगावं असं तो सूचित करायचा पण मी या बाबतीत अगदी स्पष्ट होतो. सौदी अरेबिया सारख्या देशात धार्मिक किंवा राजकारण वगैरे बाबतीत तोंड उघडायचं नाही. मी काहीतरी बोलून विषय बदलून टाकायचो. तर असा हा अफझल.

एक दिवस तो जरा खूपच मूड मधे होता आणि त्याच्या कॉलेज मधील भानगडी वगैरे बद्दल बोलायला लागला. गडी बराच रंगेल होता. बरीच प्रकरणं करून चुकला होता. किंबहुना अभ्यास वगैरे सोडून उनाडक्या, मारामार्‍या, पोरी फिरवणं वगैरे हेच त्याचं मुख्य जिवितकार्य होतं असं म्हणलं तरी चालेल. अश्याच एका प्रकरणात, प्रकरण 'फारच पुढे' गेलं आणि त्या मुलीचे भाऊ याच्या मागे लागले. हा १०-१५ दिवस दुसर्‍या गावी लपून बसला. मग मात्र त्याच्या आईने त्याच्या बापाला सांगितलं की "बेऔलाद" मरायचं नसेल तर अफझलला तुमच्या कडे बोलवून घ्या. मगा बापाने खटपटी करून त्याला नोकरी लावली आणि खोबारला आणलं. या सगळ्या गोष्टी तो अतिशय अभिमानाने सांगत होता. मी पण सगळं शांतपणे ऐकत होतो. त्याचं बोलून झाल्यावर मी त्याला विचारलं, "तू मुसलमान आहेस ना?" तो हो म्हणाला. मग मी म्हणलं, "आत्ता ज्या ज्या गोष्टी तू करत होतास म्हणून सांगितलंस, त्या तुझ्या धर्माप्रमाणे योग्य होत्या का?" हे ऐकल्यावर तो एकदम तोंडात मारल्यासारखा गप्प बसला. मी त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघतच होतो. मी पण तो विषय जास्त न वाढवता सोडून दिला. तो दिवस तसाच गेला. दुसर्‍या दिवशी मी तिथे गेल्यावर थोड्या वेळाने तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला,

तो: "आपसे एक बात पूछनी है."
मी: "हां, हां, पूछो."
तो: "नही, जाने दिजिये. शायद आप बुरा मान जायेंगे."
मी: "ठीक है. जाने दो."

तो गेला. थोड्या वेळाने परत आला आणि हाच संवाद रिपिट करून गेला. असं ३-४ वेळा झालं. मग मात्र मी त्याला नीट बसवलं आणि मनात काय आहे ते स्पष्ट बोल असं सांगितलं. मी मनावर घेणार नाही असंही आश्वासन दिलं.

तो: "कल मैने आपको जो भी कुछ बताया, उसके बाद आपने मुझसे एकही सवाल पूछा और मै चूप हो गया."
मी: "तो फिर?"
तो: "बुरा ना मानियेगा... आप प्रॉमिस करें."
मी: "यार, हम दोस्त है और तू फिक्र ना कर."
तो: "आप हिंदू है ना?"
मी: "हां, बिल्कुल."
तो: "तो फिर आपके इतने अच्छे और नेक खयालात कैसे है?"

आता मला हसावं की रडावं तेच कळेना. काय सांगू या बाबाला? बरं याला असं का वाटतंय की मी हिंदू असूनही चांगले विचार बाळगतो!!! मी त्याला थोडंफार समजवलं. तेव्हा तो पुढे म्हणाला की "हमे तो स्कूल मे बचपनसे जो भी सिखाया जाता है हिंदूओ और भारत के बारे मे, आप तो बहुतही अलग है." मग मी त्याच्या कडून थोडंफार त्यांना काय शिकवतात ते ऐकलं. फक्त वेडच लागायचं शिल्लक होतं मला. वाईटच. पाकिस्तानात भारतद्वेषाचं बाळकडू इतकं पद्धतशीर पणे दिलं जातं हे आपल्याला माहितच नसतं. पुढे मी पाकिस्तानी अभ्यासक्रमातली एक दोन इतिहासाची पुस्तकं मुद्दाम मिळवून चाळली. त्यांच्या आणि आपल्या इतिहासात बराच फरक होता. प्राचीन सिंधू संस्कृती नंतर एकदम बौद्ध धर्मच आणि मग एकदम अरब आले आणि लोकांना चांगलं जगायला शिकवलं. मधला सगळा काळ हा "जाहिलियत". म्हणजे अधर्म, अनाचार वगैरे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पण असाच. एकदम १८० डिग्री टर्न नसला तरी चांगला १२० डिग्री पर्यंत तर नक्कीच टर्न होता. सामान्य पाकिस्तानी माणूस हे शिकत मोठा होतो. पण मोठा होताना त्याला भारताबद्दल सारखं कळत असतं. हिंदी सिनेमे बघत असतात ते. त्यात दाखवलेलं काही शाळेत शिकवल्या बरोबर १००% जुळत नसतं. पण ते मान्य करायची तयारी तर नसते. आणि मग यातूनच भारताबद्दल असुया, द्वेष वाटते. समाजमन तसं असतंच आणि आजूबा़जूचं. बरं भारत हा कितीतरी मोठा देश, पाकिस्तान त्या मानाने लहान, ७१ मधे भारताच्या मदतीने झालेलं पाकिस्तानचं विभाजन या सगळ्याचा सल सर्वसामान्य पाकिस्तानी माणसाच्या मनात ठसठसत असतो. प्रत्येक बाबतीत त्यांची स्पर्धा भारताशीच. पाकिस्तानी बर्‍याच अंशी भारतकेंद्रितच असतात.

पाकिस्तानातले सिंधी, पंजाबी, पठाण, मुहाजिर वगैरे मधले अंतर्गत वाद कळले. पंजाबी माणूस सिंध्यांबद्दल कधीच चांगलं बोलणार नाही आणि पंजाबी दिसला की सिंधी माणसाने शिवी घातलीच समजा. मुहाजिर आणि सिंधी म्हणजे विळ्याभोपळ्याची मोट बांधलेली. फाळणी नंतर युपी बिहार मधून बहुसंख्य मुस्लिम पाकिस्तानात स्थलांतरित झाले. ते बहुतेक सगळे कराची मधे स्थायिक झाले. त्यामुळे कराचीत सिंधी एकदम अल्पसंख्य झाले. (बघा 'भय्या' प्रॉब्लेम तिथे पण आहेच. ;) ) मग त्यांच्यात मारामार्‍या झाल्या. पाकिस्तानच्या चळवळीत बहुतेक हे युपी बिहार वालेच म्होरके होते. पण पाकिस्तान झाल्यावर आधी बंगाली आणि मग पंजाबी बहुसंख्य झाले आणि हा मुहाजिर वर्ग एकदम पोरका झाला. एका मुहाजिराने (त्याचे आजोबा बुलंदशहरचे, अजूनही नातेवाईक चिक्कार आहे त्या भागात) माझ्यापाशी काढलेले उद्गार, "पाकिस्तानके लिये कुर्बानीया दी हमारे बापदादाओंने, और ये *** मक्खन खाके बैठ गये."

पण एवढं सगळं असलं तरी भारताचा विषय निघाला की बहुतेक पाकिस्तानी एकदम पाकिस्तानीच असतात. अजून एका बाबतीत एकजात सगळे पाकिस्तानी एकदम सेंटी असतात, काश्मिर. बलुची, पठाण वगैरे स्वतः पाकिस्तानला शिव्या घालतात पण काश्मिर मधे भारताने खूप अत्याचार केले आहेत आणि सर्वसामान्य काश्मिरी कसा बरबाद होतो आहे या बाबतीत मात्र एकदम पाकिस्तानी विचार. मी पण कधी कधी मुद्दाम वाद घालायचो. मजा यायची खेचायला.

***

जवळून भेटलेलं अजून एक पाकिस्तानी कुटुंब म्हणजे आमच्या बिल्डिंग मधले अख्तरसाब, त्यांची बायको सीमाभाभी, मुलगा बिलाल आणि दोन मुली. अख्तरसाब म्हणजे अतिशय सज्जन माणूस. तितकाच उत्साही. खूऽऽप वर्षं सौदी अरेबियामधे राहिलेला माणूस. त्या वेळी एका खूप मोठ्या आर्थिक अडचणीतून जात होते ते. पण आमच्या बिल्डिंग मधलं सगळ्यात जास्त उत्साही जोडपं. (आमच्या बिल्डिंग मधे ४८ फ्लॅट्स पैकी जवळ जवळ ४०-४२ मधे भारतिय. पाकिस्तानी २ च. एक कोरियन सडाफटिंग. बाकीचे इजिप्शियन वगैरे. त्यामुळे सगळे आम्हाला दबून असायचे. आम्ही सुद्धा फार डोळ्यात येणार नाही या बेताने सगळा दंगा करायचो. दिवाळीत पूर्ण आठ मजल्यांवर जिन्यांमधून आणि दारांसमोर पणत्या लावल्या होत्या. होळी मधे बर्‍यापैकी रंग वगैरे पण खेळली होती पोरं.) आणि गंमत म्हणजे आमच्यात एकमेव पाकिस्तानी म्हणजे हे अख्तरसाब आणि कुटुंब. दिवाळी वगैरेंच्या तारखा यांना पाठ असायच्या. सगळ्या आयोजनात हे एकदम पुढे.

पाकिस्तान भारताबरोबर शेजारधर्म पाळत नसला तरी अख्तरसाबनी शेजारधर्म पुरेपूर पाळला. एकदा असं झालं की घरातला गॅस सिलिंडर संपला. मी संध्याकाळी घरी आल्यावर गाडी घेऊन जाऊन नविन सिलिंडर आणला. (तिथे सिलिंडर डेपो मधून आपल्यालाच आणावा लागतो.) बिल्डिंगच्या दारासमोर पार्किंग नव्हतं, सिलिंडर जड, म्हणून २ मिनिटं तशीच डबल पार्किंगमधे लावली गाडी. मी उतरून सिलिंडर काढे पर्यंत पोलिस साहेब आलेच तिथे. रंगेहाथ पकडल्यावर काय सोडतात ते मला. योग्य तो आदर सत्कार करून एक ट्रॅफिक व्हायोलेशन तिकिट (अरबी शब्द: मुखालिफा) ठेवला माझ्या हातात. काहीही न बोलता गेले ते. आता अरबी वाचता येत होतं तरी ते छापिल नसलेलं हस्ताक्षरातलं अरबी काही मला वाचता येइना. त्या मुळे खिश्याला किती मोठी चाट बसणार आहे ते कळेना. काय करावं हा विचार करत असताना, एकदम अख्तरसाबना वाचता येईल असं वाटलं. त्यांच्या घरी गेलो तर ते नेमके रात्री उशिरा येणार असं कळलं. म्हणून गप्प बसलो. रात्री १० वाजता बेल वाजली. बिलाल सांगत आला होता की "डॅडी आ गये है, आप को बुलाया है." सीमाभाभीनी इतक्या उशिरा ते आले तरी आवर्जून माझ्या प्रॉब्लेम बद्दल सांगितलं होतं त्यांना. मी लगेच गेलो तर हा माणूस कपडे वगैरे न बदलता माझीच वाट बघत होता. मला बघताच ते उठले आणि म्हणाले, "चलिये मेरे साथ." इतक्या उशिरा त्यांच्या ओळखीचा एक पंजाबी गॅरेजवाला होता त्याच्या घरी घेऊन गेले मला. (हे गॅरेजवाले पोलिसांच्या खाजगी गाड्यांची कामं फुकटात करून देतात त्यामुळे पोलिस पण यांची लहान मोठी कामं करून देतात बिनबोभाटपणे.) त्याला झोपेतून उठवून माझी "माझा शेजारी, भावासारखा आहे" अशी ओळख करून दिली. मला मुखालिफा मिळाला म्हणून सांगितलं. त्याने तो कागद घेतला माझ्याकडून आणि कोणत्या एरियात किती वाजता मुखालिफा मिळाला ते विचारलं. एक फोन केला आणि त्या वेळी त्या भागात कोण पेट्रोलिंगवाले ड्युटीवर होते ते विचारून घेतलं. नशिबाने तो पोलिस याच्या महितीतला निघाला त्यामुळे त्याने तो कागद ठेवून घेतला आणि मला "आप बेफिक्र रहे. कल सुबह आपका काम हो जायेगा. कंप्यूटरपे ये चढेगाही नही." असं सांगितलं. मी जायला उठलो तसं त्याने मला हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणाला, "आप पहली बार आये है, हमारे अख्तरसाब के छोटे भाई है, ऐसे कैसे जा सकते है. बैठिये." तेवढ्यात आतून हाक आली. हा माणूस आत गेला आणि २ मोठ्या बश्यांमधून काहीतरी खायला आणलं. मला ते नक्की काय आहे ते कळेना. माझा चेहरा पाहून अख्तरसाब म्हणाले, "हलवा है. बेफिक्र खाइये." त्या बशीत शुद्ध तूपात थबथबलेला उत्कृष्ट असा बदामाचा शिरा होता. केशर वगैरे टाकलेला. वरतून अक्रोड वगैरे चुरून घातलेले. पण ते तूप इतकं की घशाखाली उतरेना. खानसाहेबांच्या भितीने कसंबसं घशाखाली उतरवलं.

तेवढ्यात त्याचे भाऊ वगैरे येऊन बसले आणि गप्पा सुरू झाल्या. तेव्हा नुकताच काश्मिर मधे काहीतरी प्रकार घडला होता. आणि मी भारतिय म्हणल्यावर साहजिकपणे गाडी आलीच काश्मिरवर. मी आपलं नुसतं हसून वेळ मारून नेत होतो. तेवढ्यात त्यातला एक पंजाबी दुसर्‍याला म्हणाला, "ये कश्मिरी बडे *** है. सामने साप और कश्मिरी आये तो मै साप को छोड दूंगा. कश्मिरी को नही." आणि तेवढ्यात माझ्याकडे वळून म्हणाला, "फिरभी हम कश्मिर लेके रहेंगे जनाब. याद रखियेगा." तर असं हे त्यांचं काश्मिरवेड. हा प्रश्न सहजासहजी सुटणार नाही हे यावरून लक्षात येईलच.

एक पाकिस्तानी माजी सैनिक माझ्या पहिल्या क्लायंटकडे ड्रायव्हर म्हणून होता. युसुफ त्याचं नाव. पंजाबी, गोरापान, उंची असेल सव्वासहा फूट. तो काही वर्षं सियाचीनला होता. अर्थात विरूद्ध बाजूने. त्याला दंडावर गोळीपण लागली होती. "दुश्मन की गोली खायी है. फिरभी डरा नही." असं अभिमानाने सांगायचा. पण कधीही मला उशीर झाला आणि टॅक्सी नाही मिळाली तर खूप लांब मला सोडायला यायचा. तिथेच चेल्लप्पन नावाचा मल्याळी माजी भारतिय सैनिक क्लेरिकल कामं करायचा. आणि हे दोघे जानी दोस्त. पण समोर आले की हातात काही तरी पेन किंवा फूटपट्टी घेऊन एकमेकांना गोळी मारायची ऍक्शन करायचे आणि मग मिठी मारून हसायचे. नियति तरी किती विचित्रच. कोण कधी कुठे कसा भेटेल काही भरवसा नाही. काही वर्षांपूर्वी सियाचीनला भेटले असते तर कदाचित खर्‍या गोळ्या घातल्या असत्या एकमेकांना.

असे नाना नमूने बघितले. पण हे सगळं झालं पाकिस्तानी लोकांबद्दल. आपले भारतातलेच मुस्लिम पण खूप जवळून बघितले. भारतात असताना मुस्लिम मित्र होते थोडे पण कधी खूप जवळून संबंध नव्हता आला. तो इथे आला. किती प्रकार. हैद्राबादी, मँगलोरी, तमिळ, मल्याळी (मलबारी), बंगाली, आपले कोकणी मुसलमान (मोहंमदखान देशमुख, नइम माजगावकर अशी टिपिकल नावं). त्यांचे आपापसातले हेवेदावे. ब्राह्मण विरुद्ध इतर, कोब्रा विरूद्ध देशस्थ हे जसे टोकाचे वाद आहेत तसेच हैद्राबादी विरूद्ध कोकणी, मलबारी विरूद्ध तमिळ अशी तेढ असते. (पुढे असे प्रकार किरिस्तांवात पण असतात हे कळले, गोवन, मँगलोरी, वसईचे, मल्याळी असे किती तरी प्रकार. इतकंच काय गोव्यात सारस्वत ख्रिश्चन पण आहेत. साहजिकच स्वतःला उच्चवर्णिय समजतात. :) ) या वरून लक्षात आलं माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो असाच वागतो. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला सारले की माणसातला माणूस दिसतो आणि तो चांगला असेल तर संबंध ठेवा नाहीतर संपवा.

असं सगळं असलं तरी, सौदीतल्या कट्टरपणाबद्दल, विशेषतः अरब मुसलमानांच्या कट्टरपणाबद्दल नुसतं ऐकलंच होतं. एक ते 'देहांत शासन' प्रकरण सोडलं तर तसा धार्मिक कट्टरपणा आणि अतिरेकी वागण्याचा प्रत्यक्ष कधीच त्रास झाला नव्हता.

पण एकदा काय झालं....

क्रमशः

गाव...

on मंगळवार, फेब्रुवारी १०, २००९

कवितेबद्दल थोडंसं

काही वर्षांपूर्वी मी एका गावात काही वर्षं राहिलो होतो. माझ्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर कालखंड मी तिथे घालवला. पुढे मी ते गाव सोडलं. पण त्या आठवणी काही जाणार नाहीत. परवा अचानक तिथे परत जायचा योग आला. पण गाव जरी तेच असलं तरी मी तिथे अनोळखीच ठरलो. मधे खूप दिवस गेले होते. ओळखीचं कोणी नव्हतं. आज अचानक हे लिहावंसं वाटलं.

***

एक आहे गाव,
त्याचं असंच काहीतरी नाव.

तसं आहे ते नकाशात,
पण खरं तर ते आहे माझ्याच मनात.

पहिल्यांदा जेव्हा गाव पाहिलं होतं,
तेव्हा खूपच अनोळखी वाटलं होतं.

असं वाटलं, आपण कुठे आलो?
मूळापासून तर नाही ना तुटलो?

मग रडलो, धडपडलो,
स्वतःच स्वःला समजवत राहिलो.

मी केलं खरं गावात घर,
पण गावानेच केलं मनात घर.

कालचक्र फिरत होतं,
भराभर पुढे जात होतं,
जाताना सोनं देत होतं.

असाच एक दिवस आला,
गावातला शेर संपला.

नाइलाज होता, खूप जड गेलं,
पण गाव सोडावंच लागलं.

***

कालचक्र फिरतच होतं,
भराभर पुढे जातच होतं.

आता... मी गावात नव्हतो,
गाव मात्र तिथेच होतं....
नकाशातलं नकाशात,
मनातलं मनात.

परत गावात जायचे बेत करायचो,
आणि येणार्‍या आठवणी दाबून टाकायचो.

पण आठवणी कसल्या लबाड,
आणि खरं म्हणजे मन हे आठवणींचंच झाड.

***

परवा मात्र गंमतच झाली,
परत गावाला जायची संधी मिळाली.

मानातल्या मनात मोहरलो,
तडक गावात दाखल झालो.

सगळं कसं तस्संच होतं,
गाव होतं तस्संच होतं,
तरीही सारखं वाटत होतं
काही तरी चुकत होतं

त्याच गल्ल्या तेच रस्ते,
पाय माझे भटकत होते,
मन मात्र अडखळत होते,
काय चुकतंय शोधत होते,
पण शोधूनही काही कळतच नव्हते.

माग मात्र मी नाद सोडला,
मनाचा घोडा मोकळा सोडला,
आणि एकदम जादू झाली,
सगळी ओळख पटू लागली.

गावाने मला कुशीत घेतलं,
मलाही छान उबदार वाटलं,
काय चुकत होतं एकदम समजलं,
मीच चुकीच्या ठिकाणी गाव शोधलं.

गाव तर आहे तिथेच आहे.....
नकाशातलं नकाशात,
मनातलं मनात.

http://www.misalpav.com/node/5989

*******************************************

शनिवारी मला खोबारला जाऊन बरोब्बर १० वर्षं झाली. योगायोग असा की नेमका त्याच दिवशी अजिबात ध्यानी मनी नसताना अचानक मी परत खोबार मधे पोचलो... जवळ जवळ ६ वर्षांनी!!! खूप वेळ एकटाच पायी भटकलो. सगळ्या खुणा शोधल्या. एक दोन मित्रांना भेटलो, संध्याकाळी परतलो. नंतर दोन दिवस दुसर्‍याच ठिकाणी होतो. काल परत यायला विमानात बसलो आणि अचानक हे शब्द बाहेर यायला लागले. लिहायला काहीच नव्हतं. मग विमानात, विमान लागलं तर वापरायची एक कागदी पिशवी असते, ती घेतली आणि सगळं लिहून काढलं.

कवितेच्या तंत्राबद्दल यमक आणि जाणवणारी लय इतकं सोडलं तर बाकी काही कळत नाही मला. तेवढं मात्र जरा नीट केलं. बाकी सगळं जसं सुचलं तसंच आहे.