मौनराग! मौनराग!! मौनराग!!!

on शनिवार, डिसेंबर १५, २०१२

मौनराग! मौनराग!! मौनराग!!

नुसतं घुमतंय डोक्यात! एखादी गोष्ट डोक्यात घुसणं म्हणजे काय ते या मौनरागाने दाखवलं आज... परत...

मौनराग वाचलं होतं. आवडलं होतं असं म्हणणं म्हणजे अंडरस्टेटमेंट. मात्र परवा ते अचानक समोर आलं परत आणि ते ही कसं...

काही काही क्षण क्वचित येतात, अचानक येतात... पण येतात तेव्हा अंगावर कोसळतात गिरसप्प्यासारखे. त्या आवेगात ना तो क्षण राहतो ना आपण राहतो शिल्लक! त्या क्षणाचा एक भाग बनून तो क्षण जगण्यात मजा असते... आणि त्या क्षणाची महती अशी की त्याच्याशी एकरूप व्हायला, त्यात वाहून जायला स्वतः प्रयत्न करावे लागतच नाहीत. मुंबईच्या लोकलसारखं... आपण नुसतं उभं रहायचं. बाकीचं काम गर्दी करते!

मौनराग! मौनराग!! मौनराग!!!

त्यात परत 'गहकूटं विसङितम्'...

***

परवा जी. ए. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात सचिन खेडेकरने 'गहकूटं विसङितम्' सादर केलं. ४५ / ५० मिनिटे हा माणूस सतत बोलत होता. पाठांतराची कसोटीच. रंगमंचावर एकटाच. नेपथ्यही नाही फारसे. एक छोटासा प्लॅटफॉर्म, त्यावर एक लाकडी खांब, त्यात एक कोनाडा आणि त्या कोनाड्यात एक कंदील... झालं नेपथ्य. एका कोपर्‍यात एक छोटंसं स्टूल. एवढ्या समग्रीवर सचिनने नुसता एक आख्खा वाडाच नव्हे, एक आख्खा जीवनप्रवास जिवंत केला. मी तो वाडा प्रत्यक्ष बघितला... रंगमंचावर.

तेव्हा पासून जे काही चालू आहे मनात, ते असं अनावर उसळी मारून बाहेर येतंय आत्ता. त्याला थोपवणं माझ्या हातात नाहीये. गरजही नाहीये.

***

एक लहान पाच सहा वर्षांचा मुलगा. शिक्षणासाठी लांब पाठवला जातो. त्याला न विचारताच घेतलेला निर्णय. त्याचं तर घराशी अतूट नातं, ते दुरावतं. घराच्या विरहाचे दिवस 'घर परत भेटेल सुट्टीत, सुट्टीपुरतं का होईना' या आशेवर काढलेले. एका सुट्टीत मात्र कळतं की घर सोडलंय कुटुंबाने... कायमचं. हा ही त्याला न विचारताच घेतलेला निर्णय! एवढ्याशा लहान मुलाला काय कळतं हो? त्याला काय भावनाबिवना असतात का? उगाच नसते लाड!!

मात्र हा मुलगा पुढे आयुष्यभर जळत आला. कधी तरी त्या घरात जाईनच या निश्चयाने. आणि तो गेलाही... ३८ वर्षांनंतर! आणि त्या घराचा निरोप घेऊन आला. एखाद्या सुहृदाचा घ्यावा तसा. तेव्हा कुठे ती तगमग शांत झाली.

***

"आयुष्यात इतक्या घरांमधून निवास केला. प्रत्येकाची आठवण वेगळी आहे. पण घर म्हटले की हेच घर आठवत असे. ते आता उरले नाही. वडील गेले. मग आई गेली. आता घर.

राजपुत्र सिद्धार्थाला बोधी प्राप्त झाली तेव्हा तो हर्षभराने उद्गारला, "सब्बा ते कासुका भग्गा, 'गहकूटं विसङितम्'". देहरूपी घराची सगळी सामग्री मोडली. घर कायमचे तुटले फुटले. मी मुक्त झालो. जन्ममरणाच्या फेर्‍यातून माझी सुटका झाली. तृष्णा, वासना, इच्छा, संस्कार इत्यादींच्या लिप्ताळ्याने ग्रासलेल्या मानवी जीवनाच्या भोक्तव्यातून मी सुटलो.

माझी जीवनाकडून एवढी मोठी आध्यात्मिक अपेक्षा नव्हती. तृष्णा, वासना, इच्छा, संस्कार मनाला चिकटून आहेतच. आणि ते आहेत म्हणूनच एक घरही मला हवे होते. मला ह्या कुठल्याही गोष्टींपासून मुक्ती नको होती. जे घर होते असे वाटले त्याचा सहवास प्रत्यक्षापेक्षा कल्पनेतच जास्त आला. पण त्यालाही इतके दिवस स्वप्नात जखडून ठेवून त्याचा आज अखेर निरोप घेतला. माझेही घर मोडले. पण मला आनंद नाही झाला सिद्धार्थ गौतमा!"


***

दीडेक तास मी एका तरल अवस्थेत होतो. म्हणावी तर जागृती म्हणावं तर काही तरी अगम्य अवस्था... एक संधिप्रदेश. कबीर म्हणतो तसं, 'हद अनहद के बीच मे रहा कबीरा सोय'.

त्याच अवस्थेत तो घरासारख्या सुहृदाचा घेतलेला 'निरोप' कुठेतरी खोल गेला, ट्रिगर झाला त्याचा आणि काही काही आठवत गेलं.

***

निरोप. एक अटळ घटना. Eventually, it all ends! Everybody, everything parts! आपल्यालाही ते माहित असतं. तरीही आपण माज करत राहतो. कोणत्या तरी तत्त्वज्ञानात, 'हे सगळं सोडायचं आहे हे माहित असूनही आपण माज करत राहतो हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे' असं भाष्यही आहे बहुतेक.

आजवर खूप निरोप घेतले. काही ठरवून... बरेचसे अनिच्छेने... अगतिकतेने.

***

आयुष्यातला पहिलाच निरोप घेतला तो वयाच्या पाचव्या वर्षी. अतिशय प्रेम करणार्‍या आजोबांचा. तो ही त्यांनी आग्रहाने घडवून आणलेला. योगी पुरूष. आयुष्यभर कर्मयोग जपला आणि अखेरी अखेरीस भक्तियोग. त्यांना मृत्यू कळला होता. स्पष्टपणे दिसला होता. त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. मला मात्र समोर येऊ नाही दिले. अडकला तर याच्यातच जीव अडकेल म्हणले. म्हणून शेवटच्या क्षणी हा समोर नको. त्या वयात 'निरोप घेतलाय आपण' हे कळायलाच काही वर्षे गेली. तो पर्यंत मी याच आशेवर की येतील कधी तरी परत!

***

सचिन खेडेकर पूर्ण ताकदीने सगळं मांडत होता. घर दाखवत होता, त्या मुलाचा भावप्रवास दाखवत होता... आणि एका क्षणी 'You can never go home again!' हे वाक्य आलं.

मला खोबार आठवलं.

***

अल-खोबारला गेलो. आयुष्यातले सोनेरी दिवस सुरू झाले. आणि एक दिवस संपलेही. निरोप घेतला. किंबहुना परिस्थितीवश तो घ्यावा लागला. लादला गेला. निरोप अटळ आहे याची परत जाणिव झाली. ही जाणिव होणं आणि हे अटळत्व हळू हळू पचत जाणं हा एक प्रवास आहे. जितका लवकर संपवाल तितकं सुख भाग्यात... खोबार सोडावं लागणं हा माझ्या या प्रवासातला एक मोठा टप्पा होता. खूप त्रास झाला होता. आजही झाडाचं रोपटं उपटवत नाही. घरात कुंड्यांमधलं तण माळी उपटतो, ते आवश्यक आहे हे माहितही आहे. मात्र मी अस्वस्थ होत असतो खोल कुठेतरी. कारण मातीत रूजल्यावर तिथून उपटून फेकलं जाणं काय आहे हे मी अनुभवलं आहे. साक्षात. ते कसं विसरलं जाईल?

मात्र या खोबारला परत जायचंच कधी तरी असा निश्चयही होता. ते सोपं नव्हतं. ज्या देशाचा व्हिसा मिळणं कर्मकठीण अशा देशातलं ते गाव. पण नियती खूप मजा मजा करत असते. गाव सोडल्यानंतर साताठ वर्षांनी अचानक ध्यानी मनी नसताना मी खोबारला पोचलो. मात्र ते माझं गाव नव्हतंच. मला ते भलतंच वाटू लागलं. अनोळखी. राहत्या घराचा जो रखवालदार सलाम ठोकत होता त्याने आत जाऊ नका असं नम्र पण ठाम शब्दात सांगितलं. त्याचं काही चूक नव्हतंच. अतिशय सैरभैर झालो.

मात्र नंतर सावरलो... घर, गाव माझ्या मनातच आहे हे लक्षात आल्यावर... मी भलतीकडेच शोधतोय हे लक्षात आल्यावर.

गाव तर आहे तिथेच आहे.....
नकाशातलं नकाशात,
मनातलं मनात.

( http://www.misalpav.com/node/5989 )

***

निरोप घेऊनही निरोप न घेता राहता येतं याची ट्रिक सापडली मला. आता काही काही निरोप नकोसे वाटत असले तरी पचतात मात्र! प्रवासाचा टप्पा!

***

Who the bloody hell says, You can never go home again!

You can!

You bloody well can! Just need to correct the approach!

***

अजून एक निरोप मला सतत खुणावत असतो. खुणावत असतो. म्हणजे, त्याचं भान सतत असतं मनात. अटळ, अमर, काँकरर ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्ज.... शेवटचा निरोप....

कसा असत असेल तो निरोप?

काय असतं त्या क्षणी मनात?

कसा असतो तो?

किंबहुना, कसा असेल तो?

शाळेच्या पहिल्या दिवशी आईला चिकटून बसलेल्या भेदरलेल्या पिल्लासारखा... की अतिशय सुंदर जेवण झाल्यावर, 'आता पुरे! पोट भरलं! तृप्त झालो! अन्नदाता सुखी भव!' असं म्हणत पानावरून उठून शांतपणे हात धुवून वामकुक्षीला जाणार्‍या आजोबांसारखा? माहित नाही...  पण कळेलच की एक ना एक दिवस.

***

समोर चंद्रकांत कुलकर्णी 'जातस्य हि ध्रुवो मृत्यु:' वाचत होता. And I, for one, could not have agreed more with Mr. Elkunchwar! He was putting my thoughts to words... splendidly...

***

पण मग त्या मृत्यूचे काय? मरणेच्छा, बिट्ट्या वगैरे ह्यांचे काय? तर मी काही आता उठून मृत्यूच्या दारात आपणहून जाऊन उभा राहणार नाही हे नक्की. जन्मभर त्याच्यावर प्रेम केले, त्याची वाट पाहिली. आता मीहून काही करणार नाही. मलाही काही अभिमान आहेच की नाही? इतके दिवस त्याने केला, आता मी करीन. प्रेमात असे चालतेच. दोस्त आहे तो आपला. त्याला असेच वागवले पाहिजे. मग कळेल. मग येईल झक्कत. जातो कुठे? आहे कोण त्याला तरी? येईल जेव्हा यायचे तेव्हा. जसे यायचे तसे. दारात उभा राहून ओशाळे हसेल तेव्हा आपण त्याला क्षमा करून टाकू व रवीबाबूंचे गाणे अगदी सुरात म्हणून दाखवू :

आजि झॉडेर राते तोमार ऑभिशार
प्रानशखा बाँधू रे आमार

***

मौनराग! मौनराग!! मौनराग!!!

बाहेर मौन... आत कल्लोळ... मौनराग!!!