कारी...

on मंगळवार, नोव्हेंबर ०४, २००८

परवाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. एरवी एकटाच असतो. दिवाळीनिमित्त 'फ्यामिली' आली आहे इथे. ज्या दिवशी ते आले नेमकं त्या दिवसापासून रोज घरी जायला उशिर होत होता. दिवसभरात बायकोचा २-३ वेळा फोन येऊन गेला होता, आज लक्ष्मीपूजन आहे, आज तरी वेळेत ये घरी. त्या प्रमाणे थोडा लवकरच निघालो होतो. टॅक्सी पण मिळाली पटकन. म्हणलं आज खरंच चांगला दिवस दिसतोय. मस्त मूड होता. घरी जाऊन काय काय करायचं त्याचा विचार चालू होता. मस्त मुलींबरोबर मस्ती करायची, दाबून जेवायचं असले सुखासीन विचार चालले होते.

एकीकडे टॅक्सी ड्रायव्हर साहेबांनी पण बोलायला सुरुवात केली. इथले बव्हंशी टॅक्सीचालक पाकिस्तानी आणि त्यातल्या त्यात पठाण आहेत. पठाण लोकांची काही वैशिष्ट्य आहेत. कमालीचा गप्पिष्टपणा हे त्यापैकीच एक. बोलता बोलता त्याने बीबीसी वर 'उर्दू नशरियात' हा प्रोग्राम लावला. ही अजून एक सवय या टॅक्सीवाल्यांची. संध्याकाळी बीबीसी वर आधी उर्दू आणि मग हिंदी सर्व्हिस असते. हटकून न चुकता हे लोक हे प्रोग्राम ऐकतातच ऐकतात. उर्दू प्रोग्राम चालू होता. यामधे प्रामुख्याने पाकिस्तानकेंद्रित बातम्या आणि राजकिय / सामाजिक विषयांवर चर्चा / भाष्य वगैरे असे असते. पाकिस्तान सरकार सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे त्याबद्दल चर्चा चालू होती. त्यावर ड्रायव्हर साहेबांची 'लाईव्ह' कॉमेंटरी, 'आतषबाजी' सकट. मग प्रोग्राम आर्थिक / राजकिय मुद्यांकडून सामाजिक मुद्यांच्या दिशेने वळला. त्यानंतर जे काही ऐकले त्या प्रोग्राम मधे, खरं सांगतो, अजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर येऊ नाही शकलो आहे पूर्णपणे. माणूस सैतानाचं रूप किती सहजतेने घेऊ शकतो हे पाहून भयंकर हादरलो आहे मी. असं काय होतं त्या कार्यक्रमात?

मी पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतो.

पाकिस्तानातला सिंध प्रांत. तिथल्या खैरपूर जिल्ह्यातलं हजानशाह नावाचं एक छोटंसं खेडं. गुल शेर आणि झाकिरा बीबी ही त्याची बायको आणि त्यांची ६ मुलं, त्या गावातले एक सामान्य रहिवासी. गुल शेर चा गायीगुरं पाळण्याचा / विकण्याचा व्यवसाय. थोडीफार मालमत्ता. सुखवस्तू सधन कुटुंब. तस्लीम ही त्यांची ३ नंबरची मुलगी. दिसायला छान. स्वभावाने धीट. एका कर्मठ वातावरणात वाढत असली तरी काही स्वप्नं बाळगण्या इतपत शिक्षण आणि जगाचं भान असलेली. तिचा मामा डॉक्टर होता, ती एकदा कराचीत त्याच्याकडे गेली होती तेव्हा पासून तिला पण वाटत होतं की आपण पण डॉक्टर व्हायचं. खेड्यापाड्यात लोकांना, विशेषतः बायकांना, वैद्यकिय मदत मिळणं खूपच दुरापास्त असतं. तर आपण हेच काम करायचं. ती मॅट्रीकची परिक्षा नीट पास झाली. आपल्या आईला अक्षरओळख करून दिली, तिला स्वत:च नाव लिहायला शिकवलं.

पण त्याच वेळी घरात काही कुरबुरी चालू होत्या. कारण नेहमीचंच. संपत्ति / जमिनजुमला वगैरे. शेर गुल आणि त्याच्या भावांमधे काही वाद चालू होते. गावातल्या काही बड्या-बुढ्यांनी शेर गुलला सल्ल दिला की तस्लीमचे लग्न तिच्या चुलतभावांपैकी एकाशी लावून दे म्हणजे वाद मिटतील. त्यालाही ते पटले. झाकिराबीबी मात्र या प्रस्तावाच्या पूर्ण विरुद्ध होती. ती पण प्रचलित समाजव्यवस्थेमुळे दबलेली एक स्त्री होती. तिला आपल्या मुलीला शिकलेलं पाहायचं होतं. डॉक्टरणीची आई म्हणून मिरवायचं होतं. पण स्वतः तस्लीमने मात्र हा प्रस्ताव स्विकारायचं ठरवलं. तिला वाटलं की खरोखर या लग्नामुळे जर का काही चांगलं होणार असेल तर देऊ आपण ही कुर्बानी. आणि चुलतभावाशीच तर करायचं आहे ना लग्न? हरकत नाही. समजवू त्याला हळू हळू आणि शिकू की अजून पुढे. झाकिराबीबीने परोपरी समजवूनही हे लग्न झालं. पण तस्लीमचे दुर्दैव असे की, एक मुलगा होऊनही परिस्थिती काही सुधारली नाही.

वाद टोकाला गेला आणि तिच्या सासरच्यांनी तिला 'कारी' म्हणून घोषित केलं. 'कारी' म्हणजे काय तर, ज्या स्त्री किंवा पुरूषावर बदफैलीपणाचा आरोप असतो ती किंवा तो. तर तस्लीमला कारी ठरवून लगेच शिक्षा पण दिली गेली. आधी गुलशेर आणि बाकी परिवाराला एका खोलीत कोंडून घातलं गेलं आणि बाहेर अंगणात सैतानी खेळ खेळला गेला. उपासमारीने पिसाळलेले कुत्रे आणले गेले आणि तिच्या आणि तिच्या जेमतेम २ महिन्यांच्या निष्पाप बाळावर सोडले गेले. आधी त्या कुत्र्यांनी त्या बाळाचे लचके तोडले आणि मग तिच्याकडे मोर्चा वळवला. ती घरभर सैरावैरा धावत सुटली. मदतीसाठी हाका मारत राहिली. कोण करणार मदत? शेवटी ती धडपडून खाली पडली, कुत्र्यांनी झडप घातली. पण तेवढ्यात तिच्या सासर्‍याला (जो तिचा सख्खा काका होता), नवर्‍याला आणि इतर लोकांना तिची थोडी दया आली आणि तिचा अजून लचके तोडून छळ होऊ न देता तिला छातीत ३ गोळ्या घालून ठार मारण्यात आले. तिचे आईबाप आणि इतर भावंडं हे सगळं हताशपणे खिडकीतून बघत होते, आक्रोश करत होते.

आता गुलशेर आणि त्याचं कुटुंब कराचीत लपूनछपून रहात आहेत. या घटनेचा जाहिर बोभाटा झालाय. तिथल्या मानवाधिकार संघटनांनी खूप गदारोळ केला आहे. त्या मुळे आता गुलशेर आणि झाकिराबीच्या जीवाला पण धोका निर्माण झाला आहे. सहसा कोणतंही सरकार असं प्रकरण दाबून टाकायला बघतं पण इथे आता ही घटना आंतरराष्ट्रिय पातळीवर गेली आहे. कर्जबाजारीच्या संकटामुळे पाकिस्तान सरकार परदेशांपुढे वाकले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी पाकिस्तानचे राष्ट्रपति आसिफ आली झरदारी स्वतः जातीने लक्ष घालून करणार आहेत म्हणे.

मागच्या वर्षी पाकिस्तानी पंजाबात पण मुख्तारन माई नावच्या मुलीचे असेच प्रकरण घडले होते. ती तथाकथित खालच्या जातीची होती. तिच्या लहान भावावर गावतल्या चौधरीच्या मुलीची छेड काढल्याचा आरोप झाला आणि पंचायतीत शिक्षा सुनावली गेली, छेडछाडीचा बदला म्हणून मुख्तारन वर 'अधिकृतरित्या' सामूहिक बलात्कार केला गेला. पण ती जिवंत राहिली. तिने लढा दिला आणि न्याय मिळवायचा प्रयत्न केला. तिला नुकसानभरपाई म्हणून बरेच पैसे मिळाले ते तिने पूर्ण पणे समाजसेवेसाठी दान केले.

पण हे नविन प्रकरण ऐकले आणि सुन्न झालो. खून आणि तोही असा? माणूस खरोखर इतका सैतान बनू शकतो? मन मानत नाहिये पण सत्य परिस्थिती दिसते आहे ना समोर. जगात एकच गोष्ट दबू नाही शकत ना खोटी ठरवली जाऊ शकत... ती म्हणजे सत्य.

***

पण हा 'कारी' प्रकार काय आहे? किती घटना खरोखर घडतात? हे सर्रास होतं की असले प्रकार तुरळक पणे घडतात? सिंध मधे 'कारो कारी' हा एक अतिशय प्रचलित शब्द आहे.

मूळात या प्रकाराला इंग्रजीमधे ऑनर किलिंग (मराठी प्रतिशब्द?) असं म्हणतात. बर्‍याचश्या आफ्रिकी आणि अशियाई समाजांमधे हा प्रकार अगदी सर्रास आणि राजमान्य आहे. तत्वतः जरी हे स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत घडू शकते तरी बहुतेक वेळा असे नृशंस प्रकार स्त्रियांच्या बाबतीतच घडतात. पुरूषांच्या बाबतीत मूळात आरोप होणंच नगण्य आहे आणि बहुतेकवेळा मामुली शिक्षा किंवा जबरी दंड करून त्यांना सोडलं जातं. सामन्यतः असे प्रकार मुस्लिम देशांत घडताना दिसतात तरी ही प्रथा खरोखर धर्मातीत आहे. आपल्याकडे पण असे प्रकार सर्रास घडतात. एखाद्या असहाय्य गरीब विधवेला जादू-टोणा करते म्हणून सरळ दगडांनी ठेचून मारायचे, किंवा बदफैली म्हणून आरोप करायचा आणि लगेच शिक्षा द्यायची. फिर्यादी पण आपणच, न्यायाधीश पण आपणच आणि ती शिक्षा अंमलात आणायचं पुण्य पण आपल्याच पदरात घ्यायचं. पण बोभाटा झाला की आपण त्या गावचेच नाही असं दाखवून सरळ शेपूट घालायची हाच यांचा पुरुषार्थ. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बर्‍याच वेळा इतर बायकापण यात सामिल होतात. आपल्या प्रगत महाराष्ट्रातलं खैरलांजी प्रकरण आठवा. सगळं गाव सामिल होतं. सुरेखाबाईचा गुन्हा काय तर तिने मान ताठ ठेवायची हिंमत दाखवली. ठेचलीच तिला, अक्षरशः. याच प्रथेचं अजून एक रूप म्हणजे आरोपी व्यक्तिला आत्महत्या करायला भाग पाडणे. म्हणजे काही भानगडच नाही. पुरावे नाहीत आणि मृत व्यक्ति थोडीच येणार आहे आपली कहाणी सांगायला?

आपल्या पोटच्या गोळ्याला किंवा सख्या बहिणीला, जिच्या बरोबर आयुष्य काढलं लहानाचे मोठे झालो, निर्घृणपणे मारून टाकायचं, मुंडकं उडवायचं, गळा दाबायचा म्हणजे पूर्ण सैतानीकरण झाल्याशिवाय शक्यच नाही. खरंतर अश्या सैतानांना क्षमा नाहीच नाही. पण दुर्दैवाने असे अनेक देश अजूनही आहेत, मुख्यतः मध्यपूर्वेत जिथे अश्या गुन्ह्यांना शिक्षाच होत नाही आणि असलीच तर खूप कमी आहे. जगभरात मानवाधिकारांच्या लढाई मधे 'ऑनर किलिंग' विरोधातली लढाई हा एक मुख्य भाग आहे. आजकालच्या आधुनिक जगात प्रसारमाध्यमं बलवान झाली आहेत त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे अश्या घटना तातडीने अतिशय मोठ्या समूहापुढे स्पष्टपणे आणि सहजपणे मांडता येतात. त्या मुळे जनमताचा रेटा तयार करता येतो. आणि न्यायदानात मदत होऊ शकते.

जीवनमानातला बदल हा अपरिहार्य असतो. तो थांबवू म्हणता थांबवता येत नाही. कुठे पटकन होतो कुठे भरपूर वेळ लागतो. पण जीवनमान बदलतं नक्कीच. या न्यायाने 'ऑनरकिलिंग' ची भीषण परिस्थिती पण नक्कीच बदलेल, प्रश्न इतकाच आहे की अजून किती तस्लीम, मुख्तारन, सुरेखाबाईंचा बळी जाणार आहे? 'सूनर द बेटर' हे या बाबतीत इंग्रजीतलं नुसतंच एक चमकदार वाक्य नाहीये तर प्रत्येक तस्लीमसाठी 'जीवनवरदान' ठरणार आहे.

***
यथावकाश मी घरी पोचलो, दार उघडल्या उघडल्या पोरी येऊन गळ्यात पडल्या, बाबाच्या अंगावर उड्या मारायची शर्यत लागली दोघींची. मी पण थोडा नॉर्मलला आलो. दोघींबरोबर मस्ती झाली. तो पर्यंत बायकोने लक्ष्मीपूजनाची तयारी केली. मी स्वच्छ आंघोळ करून देवासमोर बसलो. यथाशक्ति यथामति पूजा केली देवाची आणि प्रार्थना केली,

"देवा, लक्ष्मी येईल जाईल, तू मात्र माझं बोट सोडू नकोस. माझी सद्सदविवेक बुद्धी बनून माझ्या बरोबर रहा. आज मी जे काही ऐकलं तसं परत कोणाच्याच बाबतीत न घडो. आणि घडलंच तर मी जसा सुन्न झालो तशीच प्रत्येक व्यक्ति होऊ दे म्हणजे हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही."

शुभं भवतु.

***

टीपः ती न पाहिलेली तस्लीम काही डोळ्यापुढून हलत नाहिये आणि तिच्या न ऐकलेल्या किंचाळ्या अजून कानात घुमताहेत.

इंदौर...

on सोमवार, नोव्हेंबर ०३, २००८

खोबार सारखं इंदौर पण आमच्यामनातला एक कोपरा अडवून बसलं आहे. लहानपणी इंदौरला जायचा / राहायचा खूप योग आला. १९८३ साली एक दिवस बाबा संध्याकाळी घरी आले ते ही बातमी घेऊनच की त्यांची बदली इंदौरला झाली आहे आणि आई बाबा आणि माझी ताई असे इंदौरला जाणार. माझे शिक्षणाचे महत्वाचे वर्ष असल्याने मी काही जाणार नव्हतो. मला फक्त दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत इंदौरला जायला मिळणार होतं.

त्यानिमित्ताने, इंदौरला भरपूर येणंजाणं झालं. तो पर्यंत मुंबई एके मुंबई करणार्‍या आम्हाला इंदौर एक स्वर्गच वाटायला लागला होता. माझ्या (किंबहुना आमच्या सर्वांच्याच) आयुष्यातला तो एक खूपच सुंदर काळ आहे. आजही इंदौरचे नुस्ते नाव काढले तरी त्या सगळ्या जुन्या आठवणी मनात दाटायला लागतात. त्या काळी इंदौर तसं लहान आणि आटोपशीर गाव होतं. आयुष्य संथ आणि आरामशीर होतं. लोक भयंकर मोकळेढाकळे आणि आपल्याच मस्तीत जगणारे होते. पुलंच्या 'काकाजीं'सारखी माणसं पदोपदी सापडत होती. माझ्या साठी तर ते एक अद्भुतच जग होतं.

पहिल्यांदा इंदौरला गेलो ते १९८३च्या दिवाळीत. तेव्हा मुंबई - इंदौर 'अवंतिका एक्सप्रेस' गाडी नव्हती. खाजगी लक्झरी बसेस मधूनच सगळा प्रवास चालायचा. पवन ट्रॅव्हल्स, विजयंत ट्रॅव्हल्स ही नावं अजूनही आठवतात. मी रात्रभराचा / दूरचा एकट्याने केलेला हा पहिलाच प्रवास. बस मुंबई सेंट्रल मधून संध्याकाळी निघाली की सायन वगैरे करत आग्रा-मुंबई महामार्गाने वेग गाठायची. भिवंडीच्या पुढे पडघा नावाचे एक गाव आहे. ते येईपर्यंत साधारण जेवायची वेळ झालेली असायची. बहुतेक सगळ्या बसेस तिथेच थांबायच्या. ढाबा हा प्रकार पहिल्यांदा तिथेच अनुभवला. मस्त खाटा वगैरे टाकून लोक बसलेले असायचे. त्या खाटेच्या मध्यभागी एक लाकडी फळी आडवी टाकून जेवायचं. तिथली चव तर मला अजून आठवते. एका बाजूला तंदूर असायचा. मस्त गरम आणि कुरकुरीत रोट्या एकामागून एक फस्त व्हायच्या. शक्यतो डायवर / किन्नर साहेबांच्या जवळपास राहायचं म्हणजे बस चुकायची भिती नाही. जेवण वगैरे करून बस तिथून निघायची. त्या वेळी व्हीडीओ कोच हा प्रकार नुकताच सुरू झालेला होता. किन्नर साहेब मग एखादा फर्मास लेटेष्ट असा पिक्चर लावायचे. पिक्चर बघता बघता झोप लागायची. रात्री बस धुळे वगैरे मागे टाकत / कुठे तरी ५ मिनिटं थांबत भरधाव जात राहायची.

सकाळ व्हायची ती 'दुधी' मधे. दुधी हे महाराष्ट्र - मध्य प्रदेशाच्या सीमेवरचं एक छोटंसं गाव. माझ्या माळवी खाद्यजीवनाची सुरुवात खरी झाली ती इथे. पहिल्याच प्रवासात, बस पहाटे थांबली आणि जाग आली. अंधार होता, अजून उजाडायचे होते. काहीतरी ओळखीचा वास येत होता. खाली उतरलो. बघतो तर समोरच एका प्रचंड मोठ्या कढईमधे चक्क कांदेपोहे. तो पर्यंत माझी समजूत हीच की कांदेपोहे ही आपली मराठी माणसाची खास मिजास आहे. माझी मिजास मोडून पडली त्या दिवशी. इतके सुंदर कांदेपोहे क्वचितच खाल्ले आहेत मी. कांदेपोह्यांवर बारीक शेव घालून खायची खोड लागली ती तिथूनच. इंदौर मधे जवळ जवळ प्रत्येक टपरीवर एक भली मोठी कढई आणि तिच्यात पिवळ्या धम्मक पोह्यांचा डोंगर ठरलेलाच. बर्‍याच टपर्‍यांसमोर रबडीची पण कढई असायची. दुधीहून बस कुठलातरी एक घाट, महू वगैरे करत १० वाजेपर्यंत इंदौर गाठायची

माळव्यातली थंडी / गरमी दोन्ही बघितली. थंडीच्या दिवसात संध्याकाळी ६-६.३० च्या सुमारास लोकमान्य नगरातून गावात जायला बाहेर पडायचं, मस्त भटकायचं. जेल रोड, छप्पन दुकान, रेल्वे स्टेशन जवळचा बाँबे पावभाजी वाला (त्या वेळी आख्ख्या इंदौर मधे हा एकमेव पावभाजी वाला होता) अशी सगळी ठरलेली ठिकाणं होती. राजवाड्यावर मस्त 'पानीपतासे' (पाणीपुरी) मिळायचे. कचौरी तर इंदौरचीच. तळहाताएवढी मोठी. त्यात व्यवस्थित अनमान न करता भरलेलं सारण. त्याच्यावर हिरवीगार मिरचीची चटणी किंवा 'खटाई'... स्वर्गिय. त्यावेळी राजवाड्यावर जी.एफ. कचौरीवाला म्हणून एक प्रकार होता. हे साहेब संध्याकाळी ७-७.३० ला एका गाडीवर कचौरीचे दुकान थाटत असत. बरं त्यांचा माज आपल्या चितळ्यांपेक्षाही मोठा. त्यांचा ठेला ठराविक वेळच तिथे असे. ही कचौरी कशाकरता प्रसिध्द तर, तिखटपणासाठी. दोन कचोर्‍या खाऊन दाखव म्हणून पोरांच्या पैजा लागत. (जी.एफ. म्हणजे काय ते कळले नसेल तर गरजूंनी व्य. नि. करावा ;) ) उनाडक्या करत / खादाडी करत मनसोक्त भटकायचं आणि मग शेवटी सराफ्यात जायचं. घट्टंऽऽऽ रबडी (बरेच वेळा ती रबडी घरी वगैरे हाताने खाल्ली आहे आणि प्रत्येक वेळी साबण लावून हात धुवावे लागले आहेत तेव्हा कुठे हाताचा ओशट पणा कमी व्हायचा, जात नसेच पूर्णपणे) आणि इतर मालमसाला हादडायचा आणि त्या थंडगार हवेत, वार्‍यात कुडकुडत 'टेंपो' मधे बसून परत लोकमान्य नगर.

गरमी (आपल्याकडे उन्हाळा म्हणतात, इंदौरला मात्र गरमीच असते) मधे दुसरीच मजा. 'मधुशाले'ची. जागोजागी, कोपर्‍या कोपर्‍या वर मधुशाला. आधी कळलंच नाही हा काय प्रकार आहे ते. मधुशाला म्हणजे उसाच्या रसाचं दुकान. आणि तो रस सुद्धा एक माणूस तो चरक हाताने फिरवणार आणि दुसरा तो रस गोळा करत करत गिर्‍हाईकांना देत राहणार. आम्ही रात्री जेवण झालं की लोकमान्य नगराच्या गेट पाशी एक मधुशाला होती तिथे तासन् तास बसायचो. फक्त ४० पैशात एक मोठ्ठा बंपर भरून रस मिळायचा. आम्ही १-१ २-२ तास सहज तिथे टवाळक्या करायचो. माझे मित्र, ताईच्या मैत्रिणी कधी कधी मोठे लोक नाहीतर आम्ही सगळे पोरंपोरीच असे १५-२० जण तरी असायचो. माळव्यातली गरमी कडक असली तरी मुंबईसारखं उकडत नाही आणि रात्री हवा खूपच छान असते.

आम्ही मुंबईचे (माझ्या बाबांना शेजारपाजारचे लोक बंबई वाले सेठ म्हणायचे) त्या मुळे भाज्यांच्या किंमती वगैरे मुंबईच्याच सवयीच्या. नविन असताना एकदा दुपारी दारावर भाजी वाला आला. आईला काहितरी हवं होतं म्हणून आईने त्याला हाक मारली. भाव विचारले, टोमॅटॉ ५० पैशे किलो म्हणाला. आई फक्त आनंदाने नाचली नाही एवढंच. तिने चक्क ५-६ किलो टोमॅटो घेतले. मस्त सॉस करू वगैरे. शेजारच्या काकू त्यांच्या घराच्या ओट्यावरून बघतच होत्या. त्यांची लगेच कॉमेंट, 'तुम्ही काय बाई, मुम्बई वाले, परवडतं तुम्हाला.' आईला काही कळेना. तेव्हा काकूंनी खुलासा केला, 'अहो, गावात / मंडईत जा, ३०-३५ पैश्याच्यावर कोणी घेणार नाही. तुम्ही चांगले ५० पैशे देऊन घेतले चक्क.' आमचा सगळा आनंद एका क्षणात वार्‍यावर उडून गेला. इंदौर मधे असे पर्यंत आईने कोथिंबिर / आलं वगैरे कधी विकत घेतलं नसेल, भाजी घेतली की बचकाभर कोथिंबिर न मागता पडायचीच पिशवीमधे.

इंदौरची भाषा हाही काही एक औरच प्रकार आहे. ना धड हिंदी ना धड मराठी. एकदा आमच्या शेजारचा मुलगा संध्याकाळी आला आणि माझ्या आईला म्हणाला 'काकू, आई है क्या? बाबा आये है ऑफिसमेसे.' :) भाषिक ठेचा तर पदोपदी लागत होत्या. एखादा अत्रे / करमरकर नावाचा पोरगा अतिभयंकर आणि अतिशय कष्टाने मराठीत बोलत असेल हे माझ्या साठी काहितरी विचित्रच होतं. सवय झाली हळूहळू पण सुरुवातीला मात्र भयंकर वाटायचं. बरं त्या बोलीवर खास माळवी संस्कार आहेत. कोणताही इंदौरी माणूस 'हो' म्हणणार नाही. त्यांच्या भाषेत 'हाव' म्हणतात. (हा शब्द उच्चारात 'हाव' आणि 'हाउ' या मधे कुठेतरी येतो). 'मे आ रिया था / जा रिया था' असे सूरमा भोपाली छाप उच्चार.

अशा या इंदौरने एक खूप मोठा ओरखडा पण दिला आहे मनाला. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. पूर्ण देशात हिंसाचार भडकला. असं म्हणतात दिल्लीच्या खालोखाल इंदौर मधे शीखांचं शिरकाण झालं. इंदौर मधे शीखांची वस्ती खूपच आहे. एक खूप मोठा आणि सुंदर गुरुद्वारापण आहे तिथे. त्या दिवशी आई आणि ताई गावात गेल्या होत्या. अचानक गडबड सुरू झाली. लवकर घरी जाऊया म्हणून त्या गुरूद्वारापाशी टेंपो पकडायला म्हणून आल्या. त्याना हे शीखांचं वगैरे माहितच नव्हतं. त्या तिथे पोचेपर्यंत एक मोठा जमाव पण तिथे जाळपोळ करत आला. त्या भागात बरीच दुकानं शीखांची असावित. तो जमाव ती दुकानं जाळत होता. अचानक त्यांच्या ताब्यात एक शीख सापडला. त्या जमावाने त्याला खूप मारलं आणि शेवटी त्याच्या गळ्यात टायर टाकून अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळला. तो पळायला लागला तर त्याला काठ्यानी ढकलून ढकलून पाडलं. मी नंतर नुसतं ऐकलं तर खूप त्रास झाला. प्रत्यक्ष बघणार्‍यांची अवस्था तर कल्पनेपलिकडे झाली होती.

पण हा प्रसंग एक सोडला तर माझ्या मनावरचं इंदौर नावाचं गारूड कायम राहिल शेवटपर्यंत. आता इंदौरला जाणं होतं क्वचित. ओळखूसुध्दा येणार नाही इतकं बदललं आहे. ते आता एक शहर झालं आहे. सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. जिथे आम्ही रहात होतो तो भाग तर आपला वाटतच नाही आता. १०-१५ मिनिटं गल्ल्यागल्ल्यातून फिरलो तेव्हा घर सापडलं. दुसरेच कोणीतरी रहात होते तिथे. एकदा वाटलं दार वाजवावं, घर आत जाऊन बघावं पण पाऊल पुढे नाही पडलं. जे माझ्या मनात कायम घर करून राहिलेलं घर आहे ते मला तिथे दिसणार नाही याची खात्रीच होती. माझ्यापुरतं माझं इंदौर माझ्याजवळ आहेच की. लोकांसमोर काय हात पसरायचे.

जी. एं.च्या 'कवठे' मधली कमळी दामूला म्हणते, 'अरे बाग छान नव्हती. आम्ही छान होतो'. थोर माणूस, माझ्या मनातल्या भावना त्यांनी कितीतरी आधीच लिहून ठेवल्या आहेत.

*****

आज अचानक हे सगळे आठवायचे कारण म्हणजे भोचक भाऊंचा माझ्या हिंदीचा बोलु कवतिके हा एक मस्त लेख.

आणि एक कारण म्हणजे आमच्या मधुशाला गँग पैकी एका मुलीचा नुकताच कँसरमुळे झालेला मृत्यू. खूप चटका लागला होता. भोचकभाऊंचा लेख वाचला आणि....

माझाही अनुभव...

on रविवार, नोव्हेंबर ०२, २००८

बरोब्बर १ वर्षा पूर्वी मला आफ्रिकेला जायचा योग आला. तशी ती माझी आफ्रिकेची पहिलीच ट्रिप असल्याने मी एकदम खुशीत होतो. नैरोबीला राहणार होतो ३ च दिवस पण एक पक्कं ठरवलं होतं काहिही झालं तरी तिथलं झू बघाच्चं म्हणजे बघाच्चंच. काम खरं म्हणजे २ च दिवसाचं होतं आणि तिसरा दिवस विमानची वेळ सोयीची नव्हती म्हणून पदरात पडला होता. म्हणजे सगळं व्यवस्थित जुळून येत होतं.
गेल्या गेल्या पहिलं काम काय केलं असेल तर कंपनीच्या ड्रायव्हरला मस्का मारायला सुरुवात केली. नाहीतर आम्हाला टॅक्सी भाड्याने (टारू वाला भाड्या नाही :) ) घेऊन झू वगैरे बघायला जावे लागले असते. ते काही परवडले नसते. आमचा ड्रायव्हर, जॅक त्याचे नाव, म्हणजे एकदम जेंटल जायंट (६ फूट ६ इंच उंची आणि वजन १०० कि. च्या खाली गॅरंटीड नसणार, एक्स केन्यन आर्मी बॉक्सिंग चँप). त्याच्या साठी दुबई ड्यूटी फ्री मधून 'खाऊ' (खरं म्हणजे 'पिऊ') नेलंच होतं. मग काय, प्रोग्राम ठरला आमचा.
ठरल्या प्रमाणे आम्ही तिघं जणं जॅक बरोबर झू मधे गेलो. नैरोबीचे झू खूपच मोठे आहे. तिथे सगळे वन्यप्राणी वेगवेगळ्या ठिकाणी मोकळे सोडले आहेत. पिंजरे वगैरे काही नाहित. आपणही मोकळेच असतो. पिंजरेवाल्या गाडीत नाही. फक्त प्राण्यांच्या आणि आपल्या मधे खूप मोठे खोल खंदक खणलेले असतात आणि त्या खंदकात तारा वगैरे टाकून जाळ्या केलेल्या असतात ज्या मुळे ते प्राणी आपल्या जवळ येऊ शकत नाहीत. तर, आम्ही फिरत फिरत, एका ठिकाणी एक चित्त्याची मादी आणि तिची २ पिल्लं ठेवली होती तिथे आलो. आम्ही अगदी कुतूहलाने शोधत असताना, अचानक तिथला केअरटेकर आला आणि म्हणाला, 'डु यू वाँट टू मीट देम? टच देमच?' ... आम्ही तिघंही तो प्रश्न आमच्या मेंदूंपर्यंत पोचायच्या आधी 'यस्स्स' म्हणून बसलो. मग आम्हाला कळलं की आपण काय बोललो आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. पण आता माघार कसली? जॅक पण होताच समोर, तो आमची गंमत बघत होता. मग विचार केला 'दे धडक, बेधडक'. जो होयेंगा वो देखा जायेंगा. आणि त्या केअरटेकरची पण काहितरी वट असेलच ना चीत्त्यांवर? मग काय घाबरायचे? 'हर हर महादेव'. तो केअरटेकर आम्हाला एका छोट्याश्या जाळीतून आत घेऊन गेला. तिथे साधारण १२ फूट बाय १२ फूट ची एक जाळीदार खोली होती. म्हणजे पिंजरा हो. त्याने आम्हाला त्या पिंजर्‍यात कोंडले आणि म्हणाला थांबा इथेच, मी आलोच चीत्त्याला घेऊन. आम्ही मस्त पैकी इकडे तिकडे बघत शिट्ट्या वगैरे वाजवत उभे होतो. २-३ मिनिटात केअरटेकर साहेब आले की खरंच त्या चीत्त्याला घेऊन. कल्पना करा १२ बाय १२ च्या बंदिस्त जागेत आम्ही ३ क्षुद्र मानव, एक 'महा'मानव, तो केअरटेकर आणि ती चीत्त्याची मादी.
तेवढ्यात माझा एक मित्र पचकलाच, 'फिडींग टाईम काय असतो हो या प्राण्यांचा?' 'होतच आला आहे आता, साहेब. खरं म्हणजे फिडींग साठीच मी आत चाललो होतो, तुम्ही दिसलात म्हणून विचारलं की येता का आत?' - केअरटेकर. खरं सांगतो मंडळी, परवा पेठकर काकांनी कुठे तरी प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे काळ्जाचं पाणी पाणी होऊन ते तुंबायला लागलं होतं आणि पटकन जिथून जागा मिळेल तिथून बाहेर पडेल असं वाटायला लागलं होतं.
केअरटेकर साहेबांनी त्या बयेला एका कोपर्‍यात खाली बसवलं आणि म्हणाले, 'या एक एक करुन'. आमची थोडी ढकलाढकली झाली, तर तो केअरटेकर म्हणतो कसा 'प्लीज बी काम, अदरवाईज शी मे गेत एक्सायटेड'. मग कसाबसा धीर करुन आम्ही एक एक करुन जवळ गेलो. त्या खाली बसलेल्या चित्तीणीच्या अंगावरुन छान हात वगैरे फिरवला. काय अनुभव होता म्हणून सांगू.... मिपाच्या भाषेत... ज ह ब ह र्‍या. तिचा तो फरकोट, थोडासा मऊ, थोडासा खरखरित. आणि तो जनावरांच्या जवळ येणारा एक विशिष्ट वास.
मी हात फिरवत असताना, एकदम तीने मान उचलून माझ्याकडे रोखून बघितलं. अथांग हिरवे डोळे म्हणजे काय असते ते मला त्या दिवशी कळलं. एखादे हिंस्त्र जनावर साधारण एखाद फूटावरून तुमच्या डोळ्यात डोळे मिसळून बघतं... आहाहाहा, काय फिलींग असतं, भिती तर वाटतेच पण आपण काहितरी जबरदस्त करतो आहे असेही एक थ्रिल जाणवत होतं. मला जिम कॉर्बेटची आठवण आली. त्याने असं लिहिलं आहे की वाघ कधी कधी सावजाला संमोहित करुन त्याची शिकार करतो असं कुमाउंमधले स्थानिक लोक म्हणतात. आईच्यान् सांगतो मंडळी, खरं असणार ते. असला खोल हिरवा रंग कधीच नाही बघितला मी.
त्या दिवशी आम्ही आत जाताना ढकलल्या सारखे गेलो होतो, पण बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. बाहेर आलो तेव्हा उगाचच नाचावेसे वाटत होते. बराच वेळ आम्ही चूपचाप होतो. मग एकदम फोन काढला आणि पहिला फोन माझ्या मुलीला केला. तिचा तर विश्वासच बसत नव्हता. मला माहित होतं की तिचाच काय तुमच्या पैकी पण कित्येकांचा विश्वास बसणार नाही. म्हणूनच हे व्हिडिओ शूटींग केलं आहे। :)

http://www.youtube.com/watch?v=CSuW1BTKjP0



बिपिन.